*कॅलेंडर….*

    

     खर तर लिहायला थोडासा उशीरच झाला.. डिसेंबर महिना सुरू होताच आपल्याला सर्वांना आवर्जून खरेदी करावी लागणारी व नियमितपणे आपल्या डोळ्यासमोर असावी अशी गोष्ट म्हणजे कॅलेंडर…दिवाळी संपताच नवीन कॅलेंडरची विक्री सुरू होते… प्रत्येकाला क्षणोक्षणी, दररोज हवी असणारी गोष्ट म्हणजे कॅलेंडर..

एके सकाळीच “नवीन वर्षाचे कॅलेंडर, महालक्ष्मी, भाग्योदय कॅलेंडर….” असा आवाज कानावर पडताच मी गॅलरीत जाऊन पाहिले तर एक अगदीच म्हातारे,अपंग आजोबा, ज्यांना एक एक पाऊल मोठ्या कष्टाने टाकावे लागत होते…असे सायकलला दोन्ही बाजूला कॅलेंडरच्या पिशव्या अडकवून, कॅलेंडरची विक्री करत होते… मी थोडा वेळ खाली जाईपर्यंत तर ते दूर गेले होते….मी पळत जाऊन त्यांना गाठले आणि थांबवून कॅलेंडरची किंमत विचारली… त्यांनी पन्नास रुपये सांगितले.. मी पैसेच नेले नव्हते..आधी मला त्यांना थांबवायचे होते.. त्यांना तिथेच थांबवून धावत जावून पैसे आणले आणि कॅलेंडर विकत घेतले…. कॅलेंडरवर किंमत बघितली तर ती 55 रुपये होती.. मी त्यांच्याकडून कॅलेंडर घेईपर्यंत आजूबाजूच्या दोघे तिघीजणी आल्या व त्यांनी कॅलेंडर विकत  घेतली.. ही सकाळी सकाळी झालेली विक्री पाहून त्यांच्या चेहऱ्यावर थोडे समाधान दिसले…..

हळूहळू एक एक पाऊल ते लंगडत- लंगडत सायकल आणि स्वतःचा बॅलन्स करत होते .. कानाला घातलेली लोकरीची साधीशी टोपी आणि अंगावर असलेली साधीशी कपडे असे त्यांचे पहाटेपासूनच  थंडीत विक्रीचे काम चालू होते…मला त्यांच्याजवळ कॅलेंडर खरेदी करून बरे वाटले..

आपणही दरवर्षी कॅलेंडर खरेदी करतो,पण ते मॉल,दुकान अशा ठिकाणी खरेदी करतो.ते अशा ठिकाणी न खरेदी करता एखाद्या गरजू ,अपंग व्यक्तीजवळ खरेदी केले तर त्यांनाही दोन पैसे मिळतील आणि त्यांच्या चेहऱ्यावर असलेले समाधान आपल्याला कायमस्वरूपीसाठी आत्मिक समाधान देऊन जाईल.

  आपल्या सर्वांनाच या जगातून एक दिवस निरोप घेऊन निघून जायचे आहे.जाताना तर कोणी पैसे, दागदागिने ,संपत्ती सोबत नेत नाही,परंतु जिवंत असताना तरी अपंग, वृद्ध असून  शारीरिक कुवत नसताना सुद्धा, कधी लहान वयात परिस्थितीमुळे कष्ट करून खाण्याची वेळ काही  जणांवर येते…असे असताना सुद्धा अशा कष्ट करणाऱ्या हातांना एक संवेदनशील मनाने, आपण जर त्यांचा विचार केला, तर आपल्यालाही त्याचे समाधान मिळेल आणि समोरच्यालाही जीवनाचा आनंद क्षणभर का होईना घेता येईल…

   मी गेली तीन-चार वर्षे अशाच व्यक्तीकडून कॅलेंडर विकत घेत आहे.प्रत्येक वेळी दुकानात गेले की नवीन कॅलेंडर दिसतात पण उदबत्ती, कॅलेंडर अशा रोजच्या वापराच्या काही वस्तू  विकायला रस्त्यावर  येणाऱ्या गरीब, अपंग , गरजू , वयस्कर माणसांना नेहमी संवेदनशील मनाने वागणूक द्या…त्यांच्याकडे त्या वस्तू आपण विकत घेतल्या तर त्यांना काही फार मोठा मोबदला मिळतो असे नाही पण त्यांना जो काही दोन-चार रुपयांचा किरकोळ मोबदला मिळतो त्याच्यावर त्यांची दिवसाची उपजीविका अवलंबून असते…. मंदिराच्या दरवाजात बसलेला भिकाऱ्याला आपण दोन पाच दहा रुपये सहज जाता जाता देऊन जातो… की जो कसलेच कष्ट घेत नाही… परंतु अपंग असून, शारीरिक कुवत नसताना गरीब असताना सुद्धा…. कधी बालवयात असताना सुद्धा परिस्थिती पुढे हतबल न होता स्वाभिमानाने जगणाऱ्या माणसांना अशा पद्धतीने त्यांच्याकडे आपण खरेदी केली….तर त्यांचा स्वाभिमान, त्यांचा आत्मसन्मान जपला जाईल आणि आपल्यालाही त्या गोष्टीचे समाधान , आनंद मिळेल…..

परमेश्वराने आपल्या पदरात खूप काही दान न मागताच टाकले आहे… त्याचा उपयोग, विनियोग चांगला केलाच पाहिजे.. पण थोडी सहानुभूती म्हणून ,माणूस म्हणून सुद्धा एखाद्या गोष्टीचा विचार करता आला पाहिजे की,जे खरच परिस्थिती पुढे हतबल न होता,कष्ट करत आहेत…याच हातांना आपण सुंदर हात म्हणावे का….???? मित्रांनो नवीन वर्ष सुरू होतंय, जुन वर्ष संपत आहे….नवीन वर्षात असेच काही नवे संकल्प करूया,…. चांगल्या गोष्टी छोट्या- छोट्या ज्या आपण सहज जाता जाता करू शकतो…. त्यामुळे एखाद्याची खूप मोठी मदत होऊ शकते तर अशा चांगल्या गोष्टी नक्कीच करण्याचा प्रयत्न करूया…..

  • सुसिमा थोरात.
  • 25/12/2025

@All rights are reserved.

*तयासी जीवन ऐसे नाव….*

आज मी खूप बदललेय, परिस्थितीत मिळालेल्या चटक्यांनी, वेदनादायी अनुभवांनी, होरपळून गेलेल्या क्षणांनी, करपलेल्या या माझ्या काळजाने मला जगात जगायला शिकवले…
जेवढ्या आपण समोरील माणसांकडून अपेक्षा ठेवू तितके अधिक दुःख वाट्याला येते .. प्रेम आयुष्यात प्रत्येकाला मिळतेच असे नाही.. पण तरीही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणे म्हणजे, तिच्यावर हक्क गाजविणे नाही.. तर तिला समजून घेवून , त्या व्यक्तीचे आयुष्य आनंदी बनविणे, म्हणजे खरे प्रेम असते…..
समोरच्या व्यक्तीशी वाद घालून, तिने आपल्याला समजून घ्यावे ही अपेक्षा ठेवून, दुःख करत बसण्यापेक्षा शांत राहून आपले आयुष्य सुखात जगणे आता मला बरे वाटते…. 
शांत राहणे म्हणजेच मौन यासारखा परीस नाही… कोणताही गहन आणि कठीण प्रश्न मौनात सोडविण्याची ताकद असते…
आणि खर वास्तविक पाहता , जे आपले आहे आणि आपल्या नशिबात आहे ते कसेही करून मिळतेच.. पण जे आपले नव्हतेच ते ओरबाडून आपले बनविण्यात ही काही अर्थ नाही..
खूप बदलून घेतल मी स्वतःला…
म्हणजे आयुष्यात आलेल्या बऱ्या वाईट प्रसंगांनी .. मला खऱ्या अर्थाने दुनियादारी दाखवली …. मला जगायला शिकवलं.. प्रारब्ध जे चटके देईल ते सोसायला शिकवलं…
आयुष्यात भेटणारी माणसं .. खरचं आपली कोण आणि परकी कोण हे ओळखायला शिकवलं… वेळ सर्व काही शिकवून गेली… यापुढेही जाईल…
काही माणसांचं आयुष्य म्हणजेच पेटणारा धगधगता वणवा असतो… त्या  वणव्यात उभ आयुष्य जळून जातं…काही वेळा आपणच प्रत्येक गोष्टीला जबाबदार असतो असेही नाही… परिस्थिती तशी निर्माण होते की काहीच पर्याय उरत नाही….पण आपल्यावर वेळ येते, संकट येतात .. आणि खूप काही शिकवून जातात…
  या सर्व गोष्टी आणि प्रसंग हेच आपले खरे गुरू असतात…
जे आपल्याला जगण्याचं.. म्हणण्यापेक्षा आत्मसन्मानाने जगण्याचे तत्त्वज्ञान शिकवतात…..
आता कशाचे काही वाटत नाही… कोणाबद्दल असुया नाही, घृणा नाही, द्वेष नाही , कोणावर कसली जबरदस्ती नाही, अपेक्षा नाही आणि प्रेमही नाही… शांत राहून आयुष्यात जे घडेल ते निर्विकार भावनेने पाहणे आणि आयुष्यात येणारा निवांतपणा अनुभवने… कशाचीच अगदी कशाचीच अपेक्षा न करता.. तटस्थपणे आयुष्याकडे पाहणे अगदी निर्विकारपणे…

  • सुसिमा थोरात.
  • ११/१२/२०२५

@All rights are reserved.

@Image source – Google.

*व्रत हरतालिकेचे….*

आज तिने फक्त लांबूनच रस्त्यावरील हरतालिकेच्या मूर्तीला हात जोडले…. दोन्ही हाताला दोन मुले घेऊन रस्त्याने ती चालत होती… रस्त्याच्या एका बाजूला हरतालिकेच्या रंगीत व न रंगवलेल्या छोट्या-छोट्या मूर्ती विकणारा बसला होता… नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले तिने हात जोडले आणि ती पुढे निघाली….

दिसायला ती सुंदरच होती….  नाकी डोळी एकदम नीटस… काळेभोर लांब, दाट केस…. कपाळ भाग्यशाली होत तिच…. रेखीव भुवया, पाणीदार आणि भावनाप्रधान असणारे डोळे…. हाताची लांब सडक बोटे…पायात ही लक्ष्मी होती तिच्या…गोरी नाजूक त्वचा ….बघता क्षणी कोणालाही भुरळ पडावी असे लावण्य तिच्या पदरात देवाने घातले होते….चार चौघीत अगदी उठून दिसायची…आयुष्य मात्र तिचे कधीच चार चौघी सारखे सामान्य तिच्या वाट्याला आलेच नव्हते….

लहानपणीपासून कधी आई-वडिलांचे प्रेम मिळाले नाही… साथ मिळाली नाही…अभ्यासात हुशार असूनही तिने परिस्थितीवर मात करून स्वतःच्या मनासारखे नसले तरी शिक्षण घेतले… तरी ती थांबली नव्हती…जगराहाटीप्रमाणे पाहुणे बघायला आले… हुंडा काही मागितला नाही म्हणाल्यावर.. नातेवाईकांनी लगेच सोपस्कार उरकले … याद्या करून घेतल्या….लग्न पार पडले…ती आनंदात होती .. आता आपण खूप सुखी राहू या आशेवर .. पण त्यानंतर तिची पूर्ण निराशा झाली…. तिचा जोडीदार तिला म्हणावा असा जीवाभावाचा भेटलाच नाही…. होणारा मानसिक त्रास, वाट्याला  आलेली अवहेलना….आणि अपमान,खूप सगळं मनस्ताप ती सहन करत होती…. या सगळ्यात एक मूल पदरात पडले.. …तिच्या नवऱ्याचे पापाचे माप भरले…..एका आजारात तिच्या जोडीदाराचा दुर्दैवी मृत्यू झाला….

माहेरचा कसलाच आधार नसताना…. सासरच्यांनी तिला घराबाहेर काढले….तिच्यावर आभाळ कोसळले… नवरा मेलेल्या स्त्रीला… स्वतः मेले तरी समाजाला तिची दया येत नाही….सर्व संकट तिच्या पुढे दत्त म्हणून उभा राहतात …त्यावेळी तिच्यासाठी माहेर – सासर अशी सर्वच दारे बंद होतात….म्हणावी अशी नोकरीही नव्हती..

अर्थार्जनाचे काही साधन नसल्याने ती पार कोलमडून गेली होती.. आणि अशा सगळ्या परिस्थितीत पदरी असणारे मूल या सगळ्यातूनच वाट काढत धाडसीपणाने तिने चांगली शिक्षिकेची  नोकरी मिळवली….मुलाचे चांगले पालनपोषण करायला तिने सुरुवात केली….. थोडे दिवस असेच सूर बसतो न बसतो तोच….एक व्यक्ती तिच्या आयुष्यात आली… तिचे सौंदर्य, कष्टाळूपणा , नोकरी पाहून त्याने तिला लग्नासाठी मागणी घातली…. मुलाला सांभाळतो “सर्व जबाबदारी घेतो”..असे वचन दिले… तिला असे एकटीला जगण्याचा कंटाळा झाला होता… तरी देखील तिने त्या प्रस्तावाचा जाणीवपूर्वक विचार केला…. ठीक आहे ,सगळी जबाबदारी घेतच आहे तर आपण दोघं मिळून काम करू… नव्याने संसार उभा करू ….  या आशेवर तिने त्याच्याशी लग्नाला होकार दिला…. छोटेखानी लग्न उरकले…पण आता तिची खऱ्या अर्थाने फरफट झाली ..त्याने दिलेली वचन त्यांने दिलेले शब्द या सगळ्याला तो विसरला होता …त्याला फक्त तिच्या पैशांशी मतलब होता तिने पैसे कमवून आणायचे आणि ह्यांनी काढून घ्यायचे आणि नको तिकडे उडवायचे…. ती हतबल झाली .. सुखाचा जीव पुन्हा नव्याने तिने दुःखात  घातला…पोटच्या मुलावर होणार अन्याय तिला सहन होईना … तिला स्वतःला सुद्धा तिने मिळवलेले पैसे वापरता येत नव्हते …..त्याचा उपयोग करून एक चांगले आयुष्य तिला  जगता येत नव्हते…..दुसऱ्या लग्नामुळे फक्त तिच्या वाट्याला एक फरफट आली होती… आणि दुसरे लग्न म्हणून तिच्यावर पराकोटीचा अन्याय ती व्यक्ती तिच्यावर करत होती…. अशातच एक मूल तिच्या पदरात पडले…पुन्हा अजून एक जबाबदारी वाढली ….ती सुन्न झाली ..अशा पद्धतीने जगण्याचे मोल ती हरवून बसली .. .. एक एक दिवस तिला नको नको होत होता…जगण्याने तिला एवढे छळले होते.मरण या सगळ्यातून तिची सुटका करणार होते…. पण दोन लहान मुले त्यांची जबाबदारी टाकून ती मरू शकत नव्हती….

हरतालिकेचे निर्जळी व्रत लहानपणीपासून ठेवून आज तिच्या  वाट्याला हे सौभाग्यसे लेण आलं होतं… अशा या मिळमिळीत सौभाग्य पेक्षा ढळढळीत वैधव्य  तिच्यासाठी वरदान ठरल होत…. परंतु त्यानंतर ही तिची याच्यातून सुटका नव्हती…

ढळढळीत वैधव्याने देखील तिच्या जगण्याची उंची अधिक वाढवली होती…. नोकरीमध्ये तिला म्हणावसं मान सन्मान मिळत होता… मुलांना ती मायेने वाढवत होती… तीच त्याची आई आणि बाप होती… कोणत्याच नातेवाईकांनी तिला कसलाच मानसिक, आर्थिक आधार दिला नव्हता….. एकाकी पणे तिची झुंज सुरू होतीच… त्यात दुसऱ्या लग्नाचा भयंकर मोठा शाप तिला मिळाला …तिथे नव्याने तिची फसवणूक झाली… पुन्हा नव्याने ती दुसऱ्या परक्या माणसं सोबत मुलांसह भरडली जावू लागली …. विधवा बाई  केली…म्हणून सासर ही पोटाशी धरणारे नव्हते …समाजाबरोबर परिस्थितीबरोबर ती क्षणोक्षणी  कोसळत होती…. पुन्हा स्वतःला सावरत होती… आई-वडिलांचा आधार नाही….. चांगला जोडीदार नाही…. चांगला जोडीदार मिळावा म्हणून लहानपणीपासूनच निर्जळी उपवास ठेवणारी ती….. आज नीतीच्या या न्यायापुढे हतबल झाली होती …उपवास, तापास, पूजा,देवधर्म याच्यावर चा सगळा विश्वासाच उडाला होता तिचा .. फक्त डोळ्यात अश्रू घेवून ती जगत होती.. पश्र्चातापाचे कढत अश्रू तिला क्षणोक्षणी जाळत  होते…जेवढा माणूस प्रामाणिक,जेवढा मेहनती ,जेवढा समजूतदार त्या मानाने तेवढे अधिक दुःख आणि विपरीत परिस्थिती, संघर्ष त्याच्या वाट्याला येतो….एकाकी झुंजू तिच्या वाट्याला आली होती….हे सगळं ती अनुभवत होती…

उभ्या जगात तिच्याशी हक्काचे आपले  म्हणणारे असे कोणीच नव्हते…. पण तरीही लहान बाळाला पुरेशी समज नसल्याने त्याला पोटाशी धरून त्याला घडवण्याचे काम ती करत होती…  त्यांच्या मोठे होण्याची ती आतुरतेने वाट बघत होती…. जेणेकरून ती तिच्या जबाबदारीमधून थोडी निवांत झाली… असती आज हरतालिकेच्या मूर्तीनी त्या निमित्ताने सर्व जीवनपट, भूतकाळ  तिच्यासमोर उभा केला होता……ती असहाय होती .. ना जगू शकत होती. … ना मरू शकत होती ….

  • सुसिमा थोरात.
  • 27/08/2025.
  • @All rights are reserved.
  • @Image source – google.

प्रेम टिल्लू – पिल्लूच…

बोहल्यावर चढण्याआधी वावरत होती स्वप्नांच्या दुनियेत ती,

जिवलग भेटला या भावनेने खूपच आनंदात होती ती.

लग्नाआधी घेतलेल्या आणाभाका फोल सगळ्या ठरल्या होत्या,

टिल्लू – पिल्लूच्या प्रेमाच्या आता खुणा सुद्धा उरल्या नव्हत्या…

आय लव यू लग्नापूर्वी क्षणोक्षणी जप ऐकवत होता,

आता मात्र त्याचा मागमूस सुद्धा उरला नव्हता.

आय लव यु च आय हेट यू मंगलाष्टकांनीच केलं होतं.

टिल्लू – पिल्लूच  प्रेम आता संपून सगळं गेल होत…..

दिले होते वचन त्यांने सुखी तिला ठेवण्याचे,

प्रत्येक सुखदुःखात,पावलोपावली साथ दिला देण्याचे.

आता प्रत्येक क्षणी हृदय तिचे अपमानाने जळत होते,

टिल्लू पिल्लुचे प्रेम त्याचे तीळभर सुद्धा उरले नव्हते….

पिल्लू जेवल का रोज तीनवेळ चौकशी लग्नाआधी व्हायची,

नंतर मात्र बायको झाल्यावर तिला भाकरीच नव्हती द्यायची.

लग्नाआधी अमिषे दाखवून फोन, msgs तासन तास चालू असायचे,

टिल्लू – पिल्लुच्या प्रेमाचे ते खोटे रुपडे खूप गोड वाटायचे….

सुखाच्या क्षणांची वाट बघत आशेवर ती जगत होती,

नीच, बेअक्कल शब्द ऐकून घरे तिच्या काळजाला पडत होती,

राणी सारखी ठेवतो तुला सांगून हात तिचा धरला होता,

टिल्लू पिल्लू च्या प्रेमासाठी आत्मसन्मान तिने विकला होता….

आज तिला कळले होते प्रेम तिच्यासाठी नव्हतेच उरले,

शिव्यांच्या लाखोलिने काळीज मात्र तिचे चिरले.

अपार कष्ट सोसून  लेकरांना मात्र जीवापाड ती जपत होती,

टिल्लू पिल्लूच्या खोट्या प्रेमाने नाव तिच्या आयुष्याची उलटली होती…..

  • सुसिमा थोरात.
  • 17/08/2025

@All rights are reserved.

@Image source – Google.

Featured

*माझ्या गावचा धडा*

*कवयित्री – श्रीम. सुसिमा म्हाळसाकांत थोरात.

*कवयित्री परिचय – १) शिक्षकांसाठी घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग व यश संपादन.

२) विज्ञान प्रदर्शनात सहभाग व यश संपादन.

३) एक उत्तम लेखिका व कवयित्री स्वतःचा ब्लॉग आहे.

४) शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या अंमलबजावणी.

*शाळेचे नाव – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आंधळी.

तालूका – पलूस, जिल्हा  – सांगली.

*कवितेचे नाव – माझी शाळा

*इयत्ता – दुसरी*

*माझी शाळा*

गावाबाहेर नदीकाठी,

आहे माझी शाळा,

घडवी चिमुकल्या मुलांना,

देई प्रेम नी लावी लळा.

रोपे सुंदर शोभेची,

डोलती  शाळेभोवती,

फुलपाखरे रंगीबेरंगी,

आहेत माझे सोबती.

मंजुळ गाणे गाते येरळामाई, 

सुखावे साऱ्या गावाला,

पिंपळ मोठा धरी सावली पुढे,

देई गारवा शाळेला…

बालचमू ज्ञान घेती,

हसती, बागडती आनंदाने,

ज्ञान  चांगले वागण्याचे,

शिक्षक देती मोदाने…

*शब्दार्थ

लळा – प्रेम

सोबती – मित्र

मंजुळ – मधुर

मोद – आनंद

*स्वाध्याय*

१)माझी शाळा कुठे आहे?

२) शाळेभोवती कोण डोलत आहे?

३) मंजुळ गाणे कोण गात आहे?

४) शाळेला गारवा कोण देत आहे?

*स्वतःचा नवा इतिहास घडव…!*

तू स्त्री म्हणून मिळेल दुय्यम वागणूक तुला,

खचून कधीच तू जाऊ नको,

कितीदा वाटेत असतील काटे तुझ्या,

काट्यातून रक्ताळल्या पावलांनी,

तुझी स्वतःची वाट स्वतःच बनव,

स्वतःचा नवा इतिहास घडवं….

क्षणोक्षणी तुझ्या स्वाभिमानावर बलात्कार होईलच,

तुझ्या मनावर,शरीरावर अत्याचार होईलच,

नराधमांनी भरलेले जग सारे हे,

त्याच अत्याचाराला तुझी प्रेरणा बनव,

स्वतःचा नवा इतिहास घडव….

वाट्याला आलेल्या अपमानाच्या धगधगत्या ज्वालेत स्वतः कधीच जळू नको ,

भेटतील तुला आजूबाजूला तुला नाउमेद  करणारे लोक,

त्याच अपमानाला तुझी प्रेरणा बनव,

स्वतःचा नवा इतिहास घडव…..

पुरुषी अहंकाराच्या असंख्य इंगळ्या उठता, बसता तुला नांग्या मारतील,

होतील मरणप्राय वेदना तुला,

त्याच असह्य वेदनांना तुझी ताकद बनव,

स्वतःचा नवा इतिहास घडव…..

सीता,तारा ,मंदोदरी, द्रौपदी,जिजाई, येसू ,झाशी ,सावित्री नाचवले समाजाने रिंगणात यांनाही ,

त्यांच्या कहाण्यांना आदर्श बनव,

स्वतःचा नवा इतिहास घडव…

संकटे कोसळतील तुझ्यावर असंख्य,

ती तुझी परीक्षा पाहण्यासाठी, तुला घडवण्यासाठी, त्यांना घाबरू नको,

संकटावर मात कर,झुगारून बंधने सारी, स्वतःला आत्मनिर्भर बनव,

स्वतःचा नवा इतिहास घडव….

  • सुसिमा थोरात.

    08/03/2025

@All rights are reserved.

*स्वतःचा नवा इतिहास घडव…!*

*नाते अनोखे जोडीदाराचे…*

खरंतर या विषयाची कुठून सुरुवात करावी..? हेच समजत नाही… आजकालच्या या धकाधकीच्या जगात दूरापास्त होत चाललेली गोष्ट म्हणजे प्रेम,जिव्हाळा, आदर …याचबरोबर …एकमेकांसाठी केला जाणारा त्याग, एकमेकांची काळजी, एकमेकांची आठवण आणि त्या सुंदर आठवणींची केलेली साठवण……

जगात माणसं जन्माला येताना हजारो नाती सोबत घेऊन येतात… पण माणसाच्या या सर्व रक्ताच्या नात्यापेक्षा,सर्वात जवळचे आणि परमेश्वराने निर्माण केलेले सर्वात जवळचे सुंदर अनोख, मखमली, रेशमी नातं म्हणजे जोडीदाराच….अर्थात पती आणि पत्नी चे…

प्रत्येक सुखदुःखात पावलोपावली एकमेकांच्या सोबत उभा राहण्यासाठी,आपलीच पाठ आपण थोपटू शकत नाही… दुःखात आपल्याच खांद्यावर आपण डोकं ठेवून आपण रडू शकत नाही…आपले दुःख जगात परक्याना सांगू शकत नाही ..म्हणून…यशात आपली पाठ थोपटन्यासाठी..अपयशात शेजारी  बसून पाठीवर हात फिरवण्यासाठी…..एकमेकांचे दुःख वाटून घेण्यासाठी…एकमेकांच्या जखमावर फुंकर घालण्यासाठी…, पावलोपावली येणारा संघर्ष नव्या उमेदीने झेलण्यासाठी…आनंदाने एकत्र जगण्यासाठी, संसाराचा पसारा आवरण्यासाठी आणि एकमेकांना सावरण्यासाठी…….हातात हात घेवून उभे आयुष्य वादळातही चालण्यासाठी…

न सांगता, न बोलता एकमेकांचे दुःख समजून घेण्यासाठी, एकमेकांना जपण्यासाठी…. परमेश्वरांना तयार केलेले हे सुंदर नातं.. एकमेकांना मनाने हृदयाने जोडले गेले… हे तीळा – तांदळाचं नातं आयुष्यातल्या दोन्ही टप्प्यावर अगदी क्षणाक्षणाला सोबत करते.. अंधारात चालताना काहीच दिसत नसते तेंव्हा दिव्याप्रमाणे प्रकाश दाखवणारे हे नाते असते… बाकी सगळी  नाती आपल्याला परक करू शकतात,करतात…सोडूनही  जातात… पण हे एक नातं आपण जेवढे जास्त जपू तेवढं ते अधिकच बहरत जातं, अधिकच घट्ट होत जात…..जोडीदाराच्या नात्याची वीण तेव्हाच अधिक घट्ट होते, जेव्हा ते प्राण- पणान जपलं जातं…वेळोवेळी एकमेकांना समजून घेऊन विश्वासाने सांभाळला जातं …आपल्या जोडीदाराची भक्कम साथ आपल्याला असेल तर आपण जगात कोणत्याही संघर्षाला तोंड देऊ शकतो….

असे हे अनोख नातं परमेश्वराची निर्मिती आहे…त्याच सौंदर्य आणि पावित्र्य जपणे, त्यास जपून टिकवणे यातच त्या नात्याची सार्थकता आहे…एवढ्या  तेवढ्या छोट्या छोट्या गोष्टींनी त्याला सुरुंग  लागावा…  असे नाते असेल तर ते टिकतच नाही त्यासाठी साधना लागते तपश्चर्या लागते तेवढाच त्याग ही असावा लागतो ….. तिथे दोघांच्याही अनुभवाचा कस लागतो…

जोडीदाराचे नातं हे देवा- ब्राह्मणांचा साक्षीने, पवित्र मंगळसूत्राच्या, पवित्र धाग्याने बांधलेले असते… त्याची सर कोणत्याच नात्याला येत नाही… तरुणपणाचा बहर संपू लागला की, जोडीदाराच्या नात्याची खरी किंमत आणि गरज समजते… काहीही झाले तरी सुखदुःखात आपल्या जोडीदारास सारखा जिवलग, आपल्या वेळेला मदतीला धावून येणारा,आपल्या जवळचा त्याच्यासारखा दुसरा कोणीच व्यक्ती नसतो …..

आजकाल या पती पत्नी च्या नात्यामध्ये तेवढे प्रेम, आपलुकी,आदर,काळजी आपल्याला पहायला मिळत नाही… किरकोळ कारणावरून वेगळे होण्याचे प्रमाणही वाढले …आहे या सर्व गोष्टींमध्ये मुलांची फरपट होते…त्यांची आबाळ होते… एकमेकांच्या वादांमुळे मुलांची आयुष्ये उद्वस्त होतात….त्यांच्यावर संस्कार कोण करणार? त्यांना कोण शिस्त लावणार?? जर आई वडिलांना च शिस्त नसेल…मुलांचे बालपण हे नवरा बायकोच्या वादात कुस्करले जाते… त्यांना मॉरल सपोर्ट मिळतच नाही… त्यामुळे पर्यायाने त्यांच्या आयुष्याची वाताहत होते…या सर्वांचा विचार दोघांनी करायला हवा..एकमेकांना समजून घ्यायला हवे….एकमेकांशी प्रेमाने बोलण्यासाठी, जोडीदाराच्या पाठीवरून मायेने आधाराचा  हात फिरवण्यासाठी कोणतच कमीपणा नाही….पैसे लागत नाहीत…

म्हणून या स्पर्धेच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या जोडीदाराला जीव लावा,त्याला जपा तरच, आयुष्य सुंदर होईल…. मित्रहो आयुष्याचा सोहळाच करायचा असेल तर जोडीदार चांगला भेटायला हवा… तरच तो आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सुगंधाने, सुवासाने,आनंदाने आणि सुखाने भरून टाकेल….भरभरून जगवेल आणि जगुही देईल…. त्यामुळे परमेश्वराची देणगी असलेले हे सुंदर,रेशमी नाते माणूस म्हणून प्राण पणाने  जपा……काळीज जपा……

– सुसिमा थोरात.२८/०१/२०२५

२८/०१/२०२५

@All rights are reserved.

*स्वागत नववर्षाचे….*

सरत्या, जुन्या वर्षाला, निरोप आपण देवू,

येत्या नववर्षाला, कवेत आपण घेऊ..

देऊ सोडून रुसवे, फुगवे,

राग,लोभ अन कडू अबोले..

घडले भले बुरे जे काही,

विसरून आपण जाऊ..

येत्या नववर्षाला, कवेत आपण घेऊ..

गोडव्याचे सारे क्षण आठवू,

कुपीत ह्रदयाच्या जपून ठेवू,

घाव काळजावरचे जखमांचे,

बुजवून आपण टाकू,

येत्या नववर्षाला कवेत आपण घेऊ…

धन आरोग्याचे जपून ठेवू,

कुणासवे ना तंटा वाढवू,

मांगल्याचे अन सुखाचे तोरण दारी बांधू,

येत्या नववर्षाला कवेत आपण घेऊ…

नवी स्वप्ने, संकल्प नवे घेऊन,

आले नववर्ष समृद्धी घेवून,

आशीर्वाद बाप्पाचा घेऊन,

सुखात आपण न्हावू ,

येत्या नववर्षाला कवेत आपण घेऊ…

  • सुसिमा थोरात.
  • Image source – Google
  • @All rights are reserved.

*अगतिकता….*

आज मला तिच्या डोळ्यातल्या चमकेने आणि धाडसाने भारावून टाकले होते….मी ऐकत होते, ती सांगत होती, काळा सावळा चेहरा,सरळ नाक, विस्कटलेल्या थोड्या दाट पण मध्यम भुवया….डोळ्यात चमक असणारे तेजस्वी डोळे,तपकिरी छोटीशी टिकली… हलकीशी केशरी रंग असणारी साडी चापून  चोपून नेसली होती…पिन अप केले नव्हते, पण पदराने सर्व अंग झाकून घेतले होते,.. गडद शेवाळी रंगाचा कोपराच्या थोडा वर ब्लाउज…… शेतात मजुरी करून काळवंडलेले हात- पाय… पायात थोडी मोठी जाड जोडवी, हिरव्या कळकट झालेल्या बांगड्या… काखेला चार वर्षाचे पोर सर्दीने बेजार झाले होते….

तिचे बोलणे ऐकून माझे  डोके सुन्न झाले…..ती भरभरून सांगत होती ..” मॅडम पोरगा अभ्यास करत नाही, आजोबाच्या मागे फिरतो… आजोबाने नुसतं लाडवून ठेवले त्याला”.. किती मारलं? तरी ऐकत नाही … नवऱ्याने  लय मारल बघा मला मागच्या आठवड्यात….सासू – सासरे  तमाशा बघत उभे होते… त्यांनी अडवलं सुद्धा नाही नवऱ्याला… रोज दारू पिवून येतीती आणि मारतीती….पोटाला तीन पोरी त्याचा पाठीवर झालेली दोन मुले त्यापैकी एक मोठा माझ्या पहिलीच्या वर्गात पहिली शिकत होता.. दोन वर्षांपूर्वी शिलाई मशीन घेतली, नवऱ्याने घरातून बाहेर काढलं, त्या मशीनच्या जीवावर लय पैसे मिळवलं…. सगळं घर मीच व्यक्ती चालवती…बाजार आणती… हे काहीच पैसे कमवत नाही, किरकोळ कमावतात तेही दारुत उडवतात..”…

असे खेड्यातले चित्र मला फारसे काही नवीन नव्हते… बाईच्या नशिबाची ही हळवी कर्मकहाणी होती… पाच नॉर्मल डिलिव्हरी सरकारी दवाखान्यात झाल्यानंतर कसली जपणूक नाही..पहिल्या तीन मुली…..मुलांना जन्म देण्यापासून, सांभाळण्यापासून, पैसे मिळवून, ज्वारी आणून त्यांना भाकरी करून वाढेपर्यंत आणि त्यांचा सर्व अभ्यास .. सर्व गोष्टींची काळजीपूर्वक विचार करून वागणारी, या जगातील एकमेव त्यागमुर्ती म्हणजे आईच असू शकते…

मला तिच खूप कौतुक वाटलं… मी माझीच नाही, तर सर्व स्त्रियांची तुलना तिच्यासोबत केली…. ती म्हणाली,” काम करून मिळालेले, पोरींचे काही पैसे बँकेत ठेवती” मोठी पोरगी नववीत शिकत होती… बचत गटात भरती… घरात ठेवत नाही नाहीतर, ते भांडून, घेऊन दारू पिऊन येतात…”

शिवीगाळ करणारा, मारहाण करणारा, पाच पाच बाळंतपणं अंगावर लादनारा ,व्यसनी नवरा… नातवंडाला चांगले वळण लागून न देता, वंशाचा दिवा म्हणून, लाडाने बिघडवणारे सासू सासरे…. पोटाला पाच लहान मुले,  वंशाला दिवा पाहिजे म्हणून पाच वेळा मरणप्राय यातना,कळा सोसणारी ही माय ..

तिचं गाऱ्हाणं ऐकताना डोळ्याच्या कडा आपोआपच ओल्या झाल्या….. मुलांना जन्म देण्याची एकच जबाबदारी तिच्यावर नव्हती, पैसे कमावून त्यांना ज्वारी आणून भाकरी करण्यापासून ,त्यांच्या आजारपणाची, त्यांचा अभ्यास, त्यांच्यावर चांगले संस्कार करून, त्यांना आधार देणे यासाठी रात्रंदिवस ती झिजत होती….. चार वर्षाच पोर घेऊन मजुरीला जात होती… कपडे शिवत होती… गोधड्या शिवत होती..आलेले पैसे काटकसर करून बँकेत ठेवत होती…

या सर्व गोष्टी पैकी एकाही गोष्टीची काळजी तिच्या नवऱ्याला किंवा तिच्या सासू-सासर्‍यांना नव्हती.. ती सांगू लागली, “आई-वडिलाकडे गरीबीच हाय सगळी मॅडम..!!  तिकडे तर कशी जावू पोरी, पोर घेवून “.. तिचा स्वर भिजलेला होता, तिच्या या अगतिकतेचा, पुरेपूर फायदाच सासरच्या लोकांनी उठवला होता, उठवतच होते… तिच्या शरीरावर होणारे वार आणि मनावर होणारे वार याची मोजदादच करता येत नव्हती… लग्न करून सात जन्माची साथ देतो, सांभाळतो, म्हणून वचन देऊन लग्न करून घरची लक्ष्मी म्हणून घरी आणणाऱ्या नवऱ्याने त्यापैकी कोणतच वचन पूर्ण केलेले नव्हतं… तिची आर्थिक जबाबदारी, मानसिक जबाबदारी, तिची भावनिक जबाबदारी, तिची शारीरिक जबाबदारी,  मुलांच्या जबाबदारी यापैकी कोणत्याच जबाबदारीची त्याला जाणीव नव्हती… त्याचं कोणतच कर्तव्य त्याला माहीत नव्हतं… गळ्यात अडकवलेलं धाग्यातल्या काळ्या मण्याचे मंगळसूत्र त्याच्या नावाखाली  फक्त डोंगराएवढे  ओझे ती वाहत होती…. क्षणाक्षणाला पोरांच्या काळजीत होती… “रातभर ते दारू पिऊन दंगा करतात , पोरींना मी दुसऱ्या घरात झोपायला पाठवते…” या तिच्या वाक्यांने काळजावर अजून एक चर्कन वार झाला…

या मुलांवर संस्कार करण्यासाठी, त्यांच्यासाठी पैसे कमावण्याची कसलीच जबाबदारी तिच्या नवऱ्याची नव्हती का? आज किती घरात अशी परिस्थिती आपल्याला दिसून येते….

याची विरुद्ध बाजू म्हणजे, शहर भागात बरीच लोक चांगल्या कंपन्यांमध्ये काम करतात भरपूर पैसे कमावतात,.. स्वतःचे फ्लॅट घेतात त्यांच्यापैकी कित्येक जणांच्या बायका मात्र घरी ऐश आरामात घरी बसून राहतात.. एक रुपया कमावत नाही तरी…. सर्व सुख सुविधा, सोयी त्यांना उपलब्ध असतात…त्याचा उपभोग घेतात.. जेवण सुद्धा करण्याचे कष्ट त्यांना घ्यावेसे वाटत नाही… पार्सल मागवतात  हॉटेलमध्ये जातात… महिन्याला होणारा हजारो रुपयांचा ब्युटी पार्लरचा खर्च, महागडे कपडे, दागिने , हाऊस मौज आराम त्यांच्या वाट्याला येतो..बर्थडे, anniversary… एक रुपयाची कमाई नाही तरी, मुलाला सोडायला आणायला स्कूल बस असते… कारण त्यांचे नवरे व्यवस्थित कमावणारे आणि त्यांच्या बायकोला जपणारे असतात….यापैकी काहीच तिच्या वाट्याला आले नव्हते, हे नसूनही होणारी मारहाण, ही बाळंतपणे, शिवीगाळ यामुळे ती पूर्ण पिचून गेली होती….

पण मग एखादीच्याच वाट्याला असं दुःख, असा त्रास का यावा??? तिची नकळत तुलना मी सर्वांशी करत होते… का देवाने तिच्या वाट्याला असं आयुष्य आणले असेल???काही वेळा हे व्यसन करणारे नवरे, व्यसनांमुळे पटकन मरूनही जातात… लवकर जगाचा निरोप घेतात…आणि सर्व जबाबदाऱ्यांवरून मोकळे होतात, ती विधवा होते तो मेला म्हणून, पण तरीही जबाबदाऱ्यातून मोकळी होत नाही… माय कधीच या चक्रातून जबाबदारीतून मोकळी होऊ शकत नाही… ती मरेपर्यंत झिजत असते कणाकणाने…. आपल्या लेकरांसाठी..

नवरा म्हणून नावाला असलेले एक वलय तिला काय देतं हे आजवर मला कळलं नाही???फक्त समाजात नवरा आहे ही एक ओळख …बाकी.. सर्व खोटी आरास असते…स्त्री तिच्या कर्तृत्वाने सगळं घर उभा करते.. स्वतः साठी ती कधीच  जगत नाही…ती हरत नाही…… स्वतःचा संसार स्वतः चालवते… कुणी मारलं,  कुणी शिवीगाळ केली, कुठल्या नवऱ्याने अपमानित केले, नातेवाईकांनीला लाथाडले….तरी ती जगत असते…

तिला हक्क नसतो का सन्मानाने जगण्याचा??? स्वतःची  हौसमौज  करण्याचा…नवऱ्याकडून कोड कौतुक करून घेण्याचा.. पाठीवर आधाराचा हात ठेवणारा नवरा खूप काही तिला देऊन जाऊ शकतो..तो सर्वांना मिळतोच असे नाही…

पण तिच्या भाळावर बाराही महिने कष्ट आणि त्रास संघर्ष,लिहिला होता, ती झगडत होती… परिस्थितीशी लढत होती.. स्वतःच्या मुलांसाठी, स्वतःच्या लेकरांसाठी समाजाशी लढत होती… तिचे कौतुक करावे तेवढे थोडेच होते… आज या जगात भरपूर स्त्रीया असतील ज्या वेगवेगळ्या पातळ्यांवर, वेगवेगळे क्षेत्रांमध्ये काम करत असतील …तरीसुद्धा तिच्या डोळ्यातील वेगळीच चमक, मला जगण्यासाठी अजून मोठी प्रेरणा देऊन गेली…. तिच्या या कर्तुत्वाला सलाम!!!!

आई म्हणून ती कधीच हरली नाही, हरणार नाही….. परिस्थितीने तिला हरवले असले, तरी ती हरली नव्हती… आणि हरणारही नव्हती… ती झुंजत राहणार होती… तिच्या अखेरच्या श्वासापर्यंत तिच्या मुलांसाठी….. कारण सगळ्यांनी जबाबदारी टाळली तरी ती त्या जबाबदाऱ्या टाळू शकत नव्हती… कारण ती माय होती… तिच्या पायात पडलेली ही बेडी समाजाला दिसत नसली.. तरी ती माय या बेडीतून कधीच मोकळी होणार नव्हती… कधीच मोकळी होणार नव्हती…..

  • सुसिमा थोरात.
  • २३/११/२०२४

@All rights are reserved.

@Image source – Google.

*अगतिकता….*

*क्षण निरोपाचा… नव्हे,शुभेच्छांचा….*

आज तो क्षण जवळ आला, ज्याची मी कधीच वाट पाहिली नव्हती, किंवा मला असे वाटते ही नव्हते की कोकणाने मला निरोप द्यावा…..जानेवारी 2024 मध्ये आंतर जिल्हा बदली सांगली येथे झाली.15 ऑगस्ट रोजी मला कार्यमुक्त केले….सोळा ऑगस्टला मी सांगली जिल्हा परिषदला हजर झाले…

चार ऑक्टोबर 2024 रोजी ज्या शाळेत मी माझ्या नोकरीची पाच वर्षे पूर्ण केली, जिथे मला शुभेच्छा देण्यासाठी, शुभेच्छा समारंभ आयोजित केला होता… निरोप समारंभ त्याला मी कधीच म्हणणार नाही.. हा शुभेच्छांचा क्षण मला सतत मागे वळून बघायला सांगत होता पाच वर्षे असताना पाच वर्षे असं नाही जवळ जवळ नऊ ते दहा वर्ष मी कोकणाच्या सहवासात राहिले…. शिक्षणाच्या निमित्ताने….

“कोकणची माणसं साधी भोळी, हृदयात त्यांच्या भरली शहाळी..”

हे वाक्य , तत्व तंतोतंत मला पटले होते… खूप जीव लावणारी प्रेम करणारी.. माणसं मला भेटली. माझ्यासाठी ज्यांच्या डोळ्यात आसवे यावी अशी  खूप कमी माणसं माझ्याजवळ होती… त्यापैकी  ही काही…तीच जास्त होती..

माझ्या सर्व्हिस मधील कुरचुंबं  नंबर १ ही पहिली शाळा होती .माझ्या कूरचुंब नंबर एक शाळेतील प्रवासात पालकांनी गावकऱ्यांनी मला खूप जिव्हाळा दिला… आपुलकीची वागणूक दिली… त्यामुळे मला कधी माझ्या गावी जाण्याची ओढ वाटलीच नाही .. जावेच वाटले नाही ….पण परिस्थितीच्या मनात काही वेगळेच होते, म्हणून की काय… मला माझ्या भागात आणून  ठेवण्याचे परिस्थितीचे प्रयोजन मला काही समजले नाही..

पण कोकण, माझे कुरचूंब गाव ,माझी शाळा मला माझ्या नजरेआड  करावी वाटत नव्हती…. दोन लहान मुले घेऊन मी खूप आनंदाने तिथे राहिले होते…कोकण माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला होता… रसाळ फणस, आंबे, काजू ,रसाळ शहाळी… त्याचबरोबर अथांग पसरलेला अरबी समुद्र…निळा जलधी.. मला माझा जिवाभावाचा सखा वाटत होता…. त्याचबरोबर प्रेमळ मोठ्या मनाने जीव लावणारी ,पाठीवरून हात फिरणारी माणसं यांचा मला खूप आधार वाटत होता ….

तोंडावरून मायेनं  हात फिरवणारी माणसं मिळायला भाग्य लागतं… ते भाग्य मला कोकणाने मिळवून दिलं होतं. एवढा लळा लोकांनी मला लावला …..शाळेतील विद्यार्थ्यांनी लावला…. एवढ्या लवकर मी या सर्वाला पारखी होईल, असे कधी वाटले नव्हते… कार्यक्रम होईपर्यंत ,शाळेत असेपर्यंत ,माझा म्हणण्याचा हक्क या निरोप समारंभाने माझ्याकडून हिरावून घेतला असे वाटले…

निसर्गरम्य , हिरव्यागार परिसरात असणारी माझी मोठी शाळा…. मला कधीच परकी वाटली नाही…शाळेच्या भिंतींशी, तिथे असणाऱ्या मातीच्या कणाकणाशी, तिथे असणाऱ्या झाडा-माडांशी त्याच्या पानाफुलांशी  माझे एक अनामिक नातं जडलं होतं…… ते नातं मी कधीच विसरू शकत नाही..सोबत सहकारी म्हणून लाभलेले कोल्हापूरचे श्री पाटील सर एक उत्तम मार्गदर्शक ठरले.. त्याचबरोबर गावचे सरपंच मा.प्रसादजी माने sir, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोदजी माने sir, शिक्षणतज्ञ मिलिंद माने sir, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष संजना गुरव ताई सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केले…आम्हाला नवीन भागात आल्यावर कधीही परकेपणा जाणवू दिला नाही… त्यांनी अतीव विश्वास आमच्यावर दाखवला… याचबरोबर मला पावलोपावली मार्गदर्शन करणारे स्नेही, पदवीधर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष, माननीय श्री डांगे सर व बहिणी प्रमाणे मला मार्गदर्शन करणाऱ्या , माझी एक छान मैत्रीण असणाऱ्या डांगे मॅडम यांची उणीव मला सतत जाणवत राहील… अडचणीच्या काळात खूप मदत त्यांनी मला केली… ही फक्त काही नावे पण प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या मदत करणाऱ्यांचे  धन्यवाद न मानता त्यांच्या ऋणात राहणे  मी पसंद करेन…..

कोकणाने मला खूप काही दिले, काही कटू क्षण सोडले ते..मला  पुन्हा कधी वाटले तर तिथेच राहायला आवडेल, त्याच माणसांमध्ये…त्यांच्या चुलीवरचा कोरा चहा मला अमृता समान वाटला… कारण त्यामध्ये खूप माया, प्रेम, आपुलकी आहे….घासातला घास देणारी माणसे मिळायला भाग्य लागतं… जे मला तेवढ्या वर्षापुरतच लाभलं होतं या माणसांच्या , सहवासाचे हे सर्व  क्षण मी कुपीत घालून हृदयात बंद करून ठेवणार आहे… जेणेकरून जेव्हा जेंव्हा मला या सगळ्यांची आठवण येईल तेव्हा ते बंदिस्त क्षण उघडून मला त्याचा सुवास घेता येईल आणि आयुष्य जगण्याची उमेद येईल…ते मी जपून ठेवणार आहे…

तो हिरवा निसर्ग,  पहाटेचे पांढरे शुभ्र धुके, पहाटेचे मोरांचे आवाज पक्षांचा किलबिलाट ,धुक्यातून जाणारी इवलिशी पाऊलवाट.. दवबिंदू ,मैदानावर उमललेली छोटी निळसर फुले, गवताच्या हिरव्या गालिच्यावर उमललेली नाजूकशी पिवळी फुले …अखंड सुवास देणारी अनंताची फुले….झोके घेणारी पाखरे, वाऱ्याबरोबर मजेत डोलणारी ,भाताची हिरवी शेती… सारेच कसे क्षणात दृष्टीआड झाले…. पण  हे सर्व मी मनात साठवले आहे ……साठवलेले  आठवले तरी बरेच वाटेल……

  • सुसिमा थोरात
  • 04/10/2024