Featured

*माझ्या गावचा धडा*

*कवयित्री – श्रीम. सुसिमा म्हाळसाकांत थोरात.

*कवयित्री परिचय – १) शिक्षकांसाठी घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग व यश संपादन.

२) विज्ञान प्रदर्शनात सहभाग व यश संपादन.

३) एक उत्तम लेखिका व कवयित्री स्वतःचा ब्लॉग आहे.

४) शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या अंमलबजावणी.

*शाळेचे नाव – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आंधळी.

तालूका – पलूस, जिल्हा  – सांगली.

*कवितेचे नाव – माझी शाळा

*इयत्ता – दुसरी*

*माझी शाळा*

गावाबाहेर नदीकाठी,

आहे माझी शाळा,

घडवी चिमुकल्या मुलांना,

देई प्रेम नी लावी लळा.

रोपे सुंदर शोभेची,

डोलती  शाळेभोवती,

फुलपाखरे रंगीबेरंगी,

आहेत माझे सोबती.

मंजुळ गाणे गाते येरळामाई, 

सुखावे साऱ्या गावाला,

पिंपळ मोठा धरी सावली पुढे,

देई गारवा शाळेला…

बालचमू ज्ञान घेती,

हसती, बागडती आनंदाने,

ज्ञान  चांगले वागण्याचे,

शिक्षक देती मोदाने…

*शब्दार्थ

लळा – प्रेम

सोबती – मित्र

मंजुळ – मधुर

मोद – आनंद

*स्वाध्याय*

१)माझी शाळा कुठे आहे?

२) शाळेभोवती कोण डोलत आहे?

३) मंजुळ गाणे कोण गात आहे?

४) शाळेला गारवा कोण देत आहे?

*नाते अनोखे जोडीदाराचे…*

खरंतर या विषयाची कुठून सुरुवात करावी..? हेच समजत नाही… आजकालच्या या धकाधकीच्या जगात दूरापास्त होत चाललेली गोष्ट म्हणजे प्रेम,जिव्हाळा, आदर …याचबरोबर …एकमेकांसाठी केला जाणारा त्याग, एकमेकांची काळजी, एकमेकांची आठवण आणि त्या सुंदर आठवणींची केलेली साठवण……

जगात माणसं जन्माला येताना हजारो नाती सोबत घेऊन येतात… पण माणसाच्या या सर्व रक्ताच्या नात्यापेक्षा,सर्वात जवळचे आणि परमेश्वराने निर्माण केलेले सर्वात जवळचे सुंदर अनोख, मखमली, रेशमी नातं म्हणजे जोडीदाराच….अर्थात पती आणि पत्नी चे…

प्रत्येक सुखदुःखात पावलोपावली एकमेकांच्या सोबत उभा राहण्यासाठी,आपलीच पाठ आपण थोपटू शकत नाही… दुःखात आपल्याच खांद्यावर आपण डोकं ठेवून आपण रडू शकत नाही…आपले दुःख जगात परक्याना सांगू शकत नाही ..म्हणून…यशात आपली पाठ थोपटन्यासाठी..अपयशात शेजारी  बसून पाठीवर हात फिरवण्यासाठी…..एकमेकांचे दुःख वाटून घेण्यासाठी…एकमेकांच्या जखमावर फुंकर घालण्यासाठी…, पावलोपावली येणारा संघर्ष नव्या उमेदीने झेलण्यासाठी…आनंदाने एकत्र जगण्यासाठी, संसाराचा पसारा आवरण्यासाठी आणि एकमेकांना सावरण्यासाठी…….हातात हात घेवून उभे आयुष्य वादळातही चालण्यासाठी…

न सांगता, न बोलता एकमेकांचे दुःख समजून घेण्यासाठी, एकमेकांना जपण्यासाठी…. परमेश्वरांना तयार केलेले हे सुंदर नातं.. एकमेकांना मनाने हृदयाने जोडले गेले… हे तीळा – तांदळाचं नातं आयुष्यातल्या दोन्ही टप्प्यावर अगदी क्षणाक्षणाला सोबत करते.. अंधारात चालताना काहीच दिसत नसते तेंव्हा दिव्याप्रमाणे प्रकाश दाखवणारे हे नाते असते… बाकी सगळी  नाती आपल्याला परक करू शकतात,करतात…सोडूनही  जातात… पण हे एक नातं आपण जेवढे जास्त जपू तेवढं ते अधिकच बहरत जातं, अधिकच घट्ट होत जात…..जोडीदाराच्या नात्याची वीण तेव्हाच अधिक घट्ट होते, जेव्हा ते प्राण- पणान जपलं जातं…वेळोवेळी एकमेकांना समजून घेऊन विश्वासाने सांभाळला जातं …आपल्या जोडीदाराची भक्कम साथ आपल्याला असेल तर आपण जगात कोणत्याही संघर्षाला तोंड देऊ शकतो….

असे हे अनोख नातं परमेश्वराची निर्मिती आहे…त्याच सौंदर्य आणि पावित्र्य जपणे, त्यास जपून टिकवणे यातच त्या नात्याची सार्थकता आहे…एवढ्या  तेवढ्या छोट्या छोट्या गोष्टींनी त्याला सुरुंग  लागावा…  असे नाते असेल तर ते टिकतच नाही त्यासाठी साधना लागते तपश्चर्या लागते तेवढाच त्याग ही असावा लागतो ….. तिथे दोघांच्याही अनुभवाचा कस लागतो…

जोडीदाराचे नातं हे देवा- ब्राह्मणांचा साक्षीने, पवित्र मंगळसूत्राच्या, पवित्र धाग्याने बांधलेले असते… त्याची सर कोणत्याच नात्याला येत नाही… तरुणपणाचा बहर संपू लागला की, जोडीदाराच्या नात्याची खरी किंमत आणि गरज समजते… काहीही झाले तरी सुखदुःखात आपल्या जोडीदारास सारखा जिवलग, आपल्या वेळेला मदतीला धावून येणारा,आपल्या जवळचा त्याच्यासारखा दुसरा कोणीच व्यक्ती नसतो …..

आजकाल या पती पत्नी च्या नात्यामध्ये तेवढे प्रेम, आपलुकी,आदर,काळजी आपल्याला पहायला मिळत नाही… किरकोळ कारणावरून वेगळे होण्याचे प्रमाणही वाढले …आहे या सर्व गोष्टींमध्ये मुलांची फरपट होते…त्यांची आबाळ होते… एकमेकांच्या वादांमुळे मुलांची आयुष्ये उद्वस्त होतात….त्यांच्यावर संस्कार कोण करणार? त्यांना कोण शिस्त लावणार?? जर आई वडिलांना च शिस्त नसेल…मुलांचे बालपण हे नवरा बायकोच्या वादात कुस्करले जाते… त्यांना मॉरल सपोर्ट मिळतच नाही… त्यामुळे पर्यायाने त्यांच्या आयुष्याची वाताहत होते…या सर्वांचा विचार दोघांनी करायला हवा..एकमेकांना समजून घ्यायला हवे….एकमेकांशी प्रेमाने बोलण्यासाठी, जोडीदाराच्या पाठीवरून मायेने आधाराचा  हात फिरवण्यासाठी कोणतच कमीपणा नाही….पैसे लागत नाहीत…

म्हणून या स्पर्धेच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या जोडीदाराला जीव लावा,त्याला जपा तरच, आयुष्य सुंदर होईल…. मित्रहो आयुष्याचा सोहळाच करायचा असेल तर जोडीदार चांगला भेटायला हवा… तरच तो आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सुगंधाने, सुवासाने,आनंदाने आणि सुखाने भरून टाकेल….भरभरून जगवेल आणि जगुही देईल…. त्यामुळे परमेश्वराची देणगी असलेले हे सुंदर,रेशमी नाते माणूस म्हणून प्राण पणाने  जपा……काळीज जपा……

– सुसिमा थोरात.२८/०१/२०२५

२८/०१/२०२५

@All rights are reserved.

*अगतिकता….*

आज मला तिच्या डोळ्यातल्या चमकेने आणि धाडसाने भारावून टाकले होते….मी ऐकत होते, ती सांगत होती, काळा सावळा चेहरा,सरळ नाक, विस्कटलेल्या थोड्या दाट पण मध्यम भुवया….डोळ्यात चमक असणारे तेजस्वी डोळे,तपकिरी छोटीशी टिकली… हलकीशी केशरी रंग असणारी साडी चापून  चोपून नेसली होती…पिन अप केले नव्हते, पण पदराने सर्व अंग झाकून घेतले होते,.. गडद शेवाळी रंगाचा कोपराच्या थोडा वर ब्लाउज…… शेतात मजुरी करून काळवंडलेले हात- पाय… पायात थोडी मोठी जाड जोडवी, हिरव्या कळकट झालेल्या बांगड्या… काखेला चार वर्षाचे पोर सर्दीने बेजार झाले होते….

तिचे बोलणे ऐकून माझे  डोके सुन्न झाले…..ती भरभरून सांगत होती ..” मॅडम पोरगा अभ्यास करत नाही, आजोबाच्या मागे फिरतो… आजोबाने नुसतं लाडवून ठेवले त्याला”.. किती मारलं? तरी ऐकत नाही … नवऱ्याने  लय मारल बघा मला मागच्या आठवड्यात….सासू – सासरे  तमाशा बघत उभे होते… त्यांनी अडवलं सुद्धा नाही नवऱ्याला… रोज दारू पिवून येतीती आणि मारतीती….पोटाला तीन पोरी त्याचा पाठीवर झालेली दोन मुले त्यापैकी एक मोठा माझ्या पहिलीच्या वर्गात पहिली शिकत होता.. दोन वर्षांपूर्वी शिलाई मशीन घेतली, नवऱ्याने घरातून बाहेर काढलं, त्या मशीनच्या जीवावर लय पैसे मिळवलं…. सगळं घर मीच व्यक्ती चालवती…बाजार आणती… हे काहीच पैसे कमवत नाही, किरकोळ कमावतात तेही दारुत उडवतात..”…

असे खेड्यातले चित्र मला फारसे काही नवीन नव्हते… बाईच्या नशिबाची ही हळवी कर्मकहाणी होती… पाच नॉर्मल डिलिव्हरी सरकारी दवाखान्यात झाल्यानंतर कसली जपणूक नाही..पहिल्या तीन मुली…..मुलांना जन्म देण्यापासून, सांभाळण्यापासून, पैसे मिळवून, ज्वारी आणून त्यांना भाकरी करून वाढेपर्यंत आणि त्यांचा सर्व अभ्यास .. सर्व गोष्टींची काळजीपूर्वक विचार करून वागणारी, या जगातील एकमेव त्यागमुर्ती म्हणजे आईच असू शकते…

मला तिच खूप कौतुक वाटलं… मी माझीच नाही, तर सर्व स्त्रियांची तुलना तिच्यासोबत केली…. ती म्हणाली,” काम करून मिळालेले, पोरींचे काही पैसे बँकेत ठेवती” मोठी पोरगी नववीत शिकत होती… बचत गटात भरती… घरात ठेवत नाही नाहीतर, ते भांडून, घेऊन दारू पिऊन येतात…”

शिवीगाळ करणारा, मारहाण करणारा, पाच पाच बाळंतपणं अंगावर लादनारा ,व्यसनी नवरा… नातवंडाला चांगले वळण लागून न देता, वंशाचा दिवा म्हणून, लाडाने बिघडवणारे सासू सासरे…. पोटाला पाच लहान मुले,  वंशाला दिवा पाहिजे म्हणून पाच वेळा मरणप्राय यातना,कळा सोसणारी ही माय ..

तिचं गाऱ्हाणं ऐकताना डोळ्याच्या कडा आपोआपच ओल्या झाल्या….. मुलांना जन्म देण्याची एकच जबाबदारी तिच्यावर नव्हती, पैसे कमावून त्यांना ज्वारी आणून भाकरी करण्यापासून ,त्यांच्या आजारपणाची, त्यांचा अभ्यास, त्यांच्यावर चांगले संस्कार करून, त्यांना आधार देणे यासाठी रात्रंदिवस ती झिजत होती….. चार वर्षाच पोर घेऊन मजुरीला जात होती… कपडे शिवत होती… गोधड्या शिवत होती..आलेले पैसे काटकसर करून बँकेत ठेवत होती…

या सर्व गोष्टी पैकी एकाही गोष्टीची काळजी तिच्या नवऱ्याला किंवा तिच्या सासू-सासर्‍यांना नव्हती.. ती सांगू लागली, “आई-वडिलाकडे गरीबीच हाय सगळी मॅडम..!!  तिकडे तर कशी जावू पोरी, पोर घेवून “.. तिचा स्वर भिजलेला होता, तिच्या या अगतिकतेचा, पुरेपूर फायदाच सासरच्या लोकांनी उठवला होता, उठवतच होते… तिच्या शरीरावर होणारे वार आणि मनावर होणारे वार याची मोजदादच करता येत नव्हती… लग्न करून सात जन्माची साथ देतो, सांभाळतो, म्हणून वचन देऊन लग्न करून घरची लक्ष्मी म्हणून घरी आणणाऱ्या नवऱ्याने त्यापैकी कोणतच वचन पूर्ण केलेले नव्हतं… तिची आर्थिक जबाबदारी, मानसिक जबाबदारी, तिची भावनिक जबाबदारी, तिची शारीरिक जबाबदारी,  मुलांच्या जबाबदारी यापैकी कोणत्याच जबाबदारीची त्याला जाणीव नव्हती… त्याचं कोणतच कर्तव्य त्याला माहीत नव्हतं… गळ्यात अडकवलेलं धाग्यातल्या काळ्या मण्याचे मंगळसूत्र त्याच्या नावाखाली  फक्त डोंगराएवढे  ओझे ती वाहत होती…. क्षणाक्षणाला पोरांच्या काळजीत होती… “रातभर ते दारू पिऊन दंगा करतात , पोरींना मी दुसऱ्या घरात झोपायला पाठवते…” या तिच्या वाक्यांने काळजावर अजून एक चर्कन वार झाला…

या मुलांवर संस्कार करण्यासाठी, त्यांच्यासाठी पैसे कमावण्याची कसलीच जबाबदारी तिच्या नवऱ्याची नव्हती का? आज किती घरात अशी परिस्थिती आपल्याला दिसून येते….

याची विरुद्ध बाजू म्हणजे, शहर भागात बरीच लोक चांगल्या कंपन्यांमध्ये काम करतात भरपूर पैसे कमावतात,.. स्वतःचे फ्लॅट घेतात त्यांच्यापैकी कित्येक जणांच्या बायका मात्र घरी ऐश आरामात घरी बसून राहतात.. एक रुपया कमावत नाही तरी…. सर्व सुख सुविधा, सोयी त्यांना उपलब्ध असतात…त्याचा उपभोग घेतात.. जेवण सुद्धा करण्याचे कष्ट त्यांना घ्यावेसे वाटत नाही… पार्सल मागवतात  हॉटेलमध्ये जातात… महिन्याला होणारा हजारो रुपयांचा ब्युटी पार्लरचा खर्च, महागडे कपडे, दागिने , हाऊस मौज आराम त्यांच्या वाट्याला येतो..बर्थडे, anniversary… एक रुपयाची कमाई नाही तरी, मुलाला सोडायला आणायला स्कूल बस असते… कारण त्यांचे नवरे व्यवस्थित कमावणारे आणि त्यांच्या बायकोला जपणारे असतात….यापैकी काहीच तिच्या वाट्याला आले नव्हते, हे नसूनही होणारी मारहाण, ही बाळंतपणे, शिवीगाळ यामुळे ती पूर्ण पिचून गेली होती….

पण मग एखादीच्याच वाट्याला असं दुःख, असा त्रास का यावा??? तिची नकळत तुलना मी सर्वांशी करत होते… का देवाने तिच्या वाट्याला असं आयुष्य आणले असेल???काही वेळा हे व्यसन करणारे नवरे, व्यसनांमुळे पटकन मरूनही जातात… लवकर जगाचा निरोप घेतात…आणि सर्व जबाबदाऱ्यांवरून मोकळे होतात, ती विधवा होते तो मेला म्हणून, पण तरीही जबाबदाऱ्यातून मोकळी होत नाही… माय कधीच या चक्रातून जबाबदारीतून मोकळी होऊ शकत नाही… ती मरेपर्यंत झिजत असते कणाकणाने…. आपल्या लेकरांसाठी..

नवरा म्हणून नावाला असलेले एक वलय तिला काय देतं हे आजवर मला कळलं नाही???फक्त समाजात नवरा आहे ही एक ओळख …बाकी.. सर्व खोटी आरास असते…स्त्री तिच्या कर्तृत्वाने सगळं घर उभा करते.. स्वतः साठी ती कधीच  जगत नाही…ती हरत नाही…… स्वतःचा संसार स्वतः चालवते… कुणी मारलं,  कुणी शिवीगाळ केली, कुठल्या नवऱ्याने अपमानित केले, नातेवाईकांनीला लाथाडले….तरी ती जगत असते…

तिला हक्क नसतो का सन्मानाने जगण्याचा??? स्वतःची  हौसमौज  करण्याचा…नवऱ्याकडून कोड कौतुक करून घेण्याचा.. पाठीवर आधाराचा हात ठेवणारा नवरा खूप काही तिला देऊन जाऊ शकतो..तो सर्वांना मिळतोच असे नाही…

पण तिच्या भाळावर बाराही महिने कष्ट आणि त्रास संघर्ष,लिहिला होता, ती झगडत होती… परिस्थितीशी लढत होती.. स्वतःच्या मुलांसाठी, स्वतःच्या लेकरांसाठी समाजाशी लढत होती… तिचे कौतुक करावे तेवढे थोडेच होते… आज या जगात भरपूर स्त्रीया असतील ज्या वेगवेगळ्या पातळ्यांवर, वेगवेगळे क्षेत्रांमध्ये काम करत असतील …तरीसुद्धा तिच्या डोळ्यातील वेगळीच चमक, मला जगण्यासाठी अजून मोठी प्रेरणा देऊन गेली…. तिच्या या कर्तुत्वाला सलाम!!!!

आई म्हणून ती कधीच हरली नाही, हरणार नाही….. परिस्थितीने तिला हरवले असले, तरी ती हरली नव्हती… आणि हरणारही नव्हती… ती झुंजत राहणार होती… तिच्या अखेरच्या श्वासापर्यंत तिच्या मुलांसाठी….. कारण सगळ्यांनी जबाबदारी टाळली तरी ती त्या जबाबदाऱ्या टाळू शकत नव्हती… कारण ती माय होती… तिच्या पायात पडलेली ही बेडी समाजाला दिसत नसली.. तरी ती माय या बेडीतून कधीच मोकळी होणार नव्हती… कधीच मोकळी होणार नव्हती…..

  • सुसिमा थोरात.
  • २३/११/२०२४

@All rights are reserved.

@Image source – Google.

*अगतिकता….*

*क्षण निरोपाचा… नव्हे,शुभेच्छांचा….*

आज तो क्षण जवळ आला, ज्याची मी कधीच वाट पाहिली नव्हती, किंवा मला असे वाटते ही नव्हते की कोकणाने मला निरोप द्यावा…..जानेवारी 2024 मध्ये आंतर जिल्हा बदली सांगली येथे झाली.15 ऑगस्ट रोजी मला कार्यमुक्त केले….सोळा ऑगस्टला मी सांगली जिल्हा परिषदला हजर झाले…

चार ऑक्टोबर 2024 रोजी ज्या शाळेत मी माझ्या नोकरीची पाच वर्षे पूर्ण केली, जिथे मला शुभेच्छा देण्यासाठी, शुभेच्छा समारंभ आयोजित केला होता… निरोप समारंभ त्याला मी कधीच म्हणणार नाही.. हा शुभेच्छांचा क्षण मला सतत मागे वळून बघायला सांगत होता पाच वर्षे असताना पाच वर्षे असं नाही जवळ जवळ नऊ ते दहा वर्ष मी कोकणाच्या सहवासात राहिले…. शिक्षणाच्या निमित्ताने….

“कोकणची माणसं साधी भोळी, हृदयात त्यांच्या भरली शहाळी..”

हे वाक्य , तत्व तंतोतंत मला पटले होते… खूप जीव लावणारी प्रेम करणारी.. माणसं मला भेटली. माझ्यासाठी ज्यांच्या डोळ्यात आसवे यावी अशी  खूप कमी माणसं माझ्याजवळ होती… त्यापैकी  ही काही…तीच जास्त होती..

माझ्या सर्व्हिस मधील कुरचुंबं  नंबर १ ही पहिली शाळा होती .माझ्या कूरचुंब नंबर एक शाळेतील प्रवासात पालकांनी गावकऱ्यांनी मला खूप जिव्हाळा दिला… आपुलकीची वागणूक दिली… त्यामुळे मला कधी माझ्या गावी जाण्याची ओढ वाटलीच नाही .. जावेच वाटले नाही ….पण परिस्थितीच्या मनात काही वेगळेच होते, म्हणून की काय… मला माझ्या भागात आणून  ठेवण्याचे परिस्थितीचे प्रयोजन मला काही समजले नाही..

पण कोकण, माझे कुरचूंब गाव ,माझी शाळा मला माझ्या नजरेआड  करावी वाटत नव्हती…. दोन लहान मुले घेऊन मी खूप आनंदाने तिथे राहिले होते…कोकण माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला होता… रसाळ फणस, आंबे, काजू ,रसाळ शहाळी… त्याचबरोबर अथांग पसरलेला अरबी समुद्र…निळा जलधी.. मला माझा जिवाभावाचा सखा वाटत होता…. त्याचबरोबर प्रेमळ मोठ्या मनाने जीव लावणारी ,पाठीवरून हात फिरणारी माणसं यांचा मला खूप आधार वाटत होता ….

तोंडावरून मायेनं  हात फिरवणारी माणसं मिळायला भाग्य लागतं… ते भाग्य मला कोकणाने मिळवून दिलं होतं. एवढा लळा लोकांनी मला लावला …..शाळेतील विद्यार्थ्यांनी लावला…. एवढ्या लवकर मी या सर्वाला पारखी होईल, असे कधी वाटले नव्हते… कार्यक्रम होईपर्यंत ,शाळेत असेपर्यंत ,माझा म्हणण्याचा हक्क या निरोप समारंभाने माझ्याकडून हिरावून घेतला असे वाटले…

निसर्गरम्य , हिरव्यागार परिसरात असणारी माझी मोठी शाळा…. मला कधीच परकी वाटली नाही…शाळेच्या भिंतींशी, तिथे असणाऱ्या मातीच्या कणाकणाशी, तिथे असणाऱ्या झाडा-माडांशी त्याच्या पानाफुलांशी  माझे एक अनामिक नातं जडलं होतं…… ते नातं मी कधीच विसरू शकत नाही..सोबत सहकारी म्हणून लाभलेले कोल्हापूरचे श्री पाटील सर एक उत्तम मार्गदर्शक ठरले.. त्याचबरोबर गावचे सरपंच मा.प्रसादजी माने sir, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोदजी माने sir, शिक्षणतज्ञ मिलिंद माने sir, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष संजना गुरव ताई सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केले…आम्हाला नवीन भागात आल्यावर कधीही परकेपणा जाणवू दिला नाही… त्यांनी अतीव विश्वास आमच्यावर दाखवला… याचबरोबर मला पावलोपावली मार्गदर्शन करणारे स्नेही, पदवीधर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष, माननीय श्री डांगे सर व बहिणी प्रमाणे मला मार्गदर्शन करणाऱ्या , माझी एक छान मैत्रीण असणाऱ्या डांगे मॅडम यांची उणीव मला सतत जाणवत राहील… अडचणीच्या काळात खूप मदत त्यांनी मला केली… ही फक्त काही नावे पण प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या मदत करणाऱ्यांचे  धन्यवाद न मानता त्यांच्या ऋणात राहणे  मी पसंद करेन…..

कोकणाने मला खूप काही दिले, काही कटू क्षण सोडले ते..मला  पुन्हा कधी वाटले तर तिथेच राहायला आवडेल, त्याच माणसांमध्ये…त्यांच्या चुलीवरचा कोरा चहा मला अमृता समान वाटला… कारण त्यामध्ये खूप माया, प्रेम, आपुलकी आहे….घासातला घास देणारी माणसे मिळायला भाग्य लागतं… जे मला तेवढ्या वर्षापुरतच लाभलं होतं या माणसांच्या , सहवासाचे हे सर्व  क्षण मी कुपीत घालून हृदयात बंद करून ठेवणार आहे… जेणेकरून जेव्हा जेंव्हा मला या सगळ्यांची आठवण येईल तेव्हा ते बंदिस्त क्षण उघडून मला त्याचा सुवास घेता येईल आणि आयुष्य जगण्याची उमेद येईल…ते मी जपून ठेवणार आहे…

तो हिरवा निसर्ग,  पहाटेचे पांढरे शुभ्र धुके, पहाटेचे मोरांचे आवाज पक्षांचा किलबिलाट ,धुक्यातून जाणारी इवलिशी पाऊलवाट.. दवबिंदू ,मैदानावर उमललेली छोटी निळसर फुले, गवताच्या हिरव्या गालिच्यावर उमललेली नाजूकशी पिवळी फुले …अखंड सुवास देणारी अनंताची फुले….झोके घेणारी पाखरे, वाऱ्याबरोबर मजेत डोलणारी ,भाताची हिरवी शेती… सारेच कसे क्षणात दृष्टीआड झाले…. पण  हे सर्व मी मनात साठवले आहे ……साठवलेले  आठवले तरी बरेच वाटेल……

  • सुसिमा थोरात
  • 04/10/2024

*वाढदिवस…*

प्रिय विवान बाळा,

वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा!!!

27 ऑक्टोबर 2016 वसुबारस दिवशी तुझा जन्म झाला. तुझं नव आयुष्य या जगात सुरू झाले… तु मुल म्हणून जन्मलास आणि मी आई म्हणून… तुझ्या जगात येण्याने लाखमोलाच मातृत्व देवानं मला बहाल केलं, मिळालं …तुझ्या रूपान एक सुंदर कळी माझ्या आयुष्यात आली.. तिला अलगद उमलायला मला मदत करायची आहे ….तीच हसणं अबाधित ठेवायच आहे…. नेहमी हसत रहा.. आनंदी राहा… माझ्या मातृत्वाचा मला अभिमान आहे ..तो फक्त तुझ्यामुळेच!! तुझा जन्म झाला आणि अचानक एका अल्लड मुलीचे रूपांतर एका जबाबदार आईमध्ये झाले… आई म्हणजे काय ??? हे तुझ्यामुळेच मला अनुभवायला मिळाले… तुझ्या बालपणातच मी क्षणाक्षणाला माझं बालपण जगले. तुझ्यातच हरवून गेले.. माझ आयुष्य पूर्णतः बदलून गेलं.. तुला एक – एक अक्षर बोलायला शिकवण्यापासून ते रामरक्षा शिकवेपर्यंतचा प्रवास खूपच गोड अविस्मरणीय आणि रमणीय होता… इथून पुढेही तो छानच असेल…! कधी शिस्त लागण्यासाठी कठोरपणाने वागणारी ही तुझी आई तुझ्यावर तितकच प्रेम करते ….तुझी तितकीच काळजी करते, तुला तितकंच जपते, तुझ्यात श्यामला पाहते.. हेही तितकेच खरे!!

वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा!!! तुला निरोगी दीर्घायुष्य लाभो! तुझी सगळी स्वप्न पूर्ण होवोत …तू खूप यशस्वी हो !!.तुझं यश पाहण्याचा भाग्य मला आई म्हणून लाभाव हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना!! यशाची सगळी शिखरे तू पादाक्रांत करावीस…. सुख ,समाधान, आणि ऐश्वर्यात रहा…छान तर तू आहेसच.. छान अभ्यास कर….मोठा हो.

-,तुझीच आई,

सुसिमा थोरात.

27/10/2023.

शुभेच्छा समारंभ निमित्त पत्र….

आदरणीय वरुडे मॅडम,

खरं तर सुरुवात कशी करावी, हेच समजत नाही.तुमच्या सेवानिवृत्ती, शुभेच्छा समारंभानिमित्त प्रथम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!! तुमचा आलेला एक कॉल हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. प्रत्यक्षात येणे शक्य नसले तरी, मी याक्षणी मनाने तुमच्या सोबतच आहे…

मॅडम, एवढ्या प्रदीर्घ काळ तुम्ही ज्ञानदानाचे पवित्र कार्य केलेत.. अनेक पिढ्या तुम्ही घडवल्यात.. तुमच्या हातून अनेक घडणाऱ्या मडक्यांपैकी मी एक मडके….. तुमची विद्यार्थिनी..तुमची विद्यार्थिनी या नात्याने मला तुमचा सार्थ अभिमान आहे….माझ्या नववीच्या वर्ग शिक्षिका, ‘वरुडे मॅडम’, माझा आदर्श तुम्ही आहात..नववीच्या रिझल्ट दिवशी माझा पहिला नंबर आल्याबद्दल तुम्ही खूप प्रेमाने मला पेढा भरवला, तो जिव्हाळ्याचा क्षण मी अत्तराच्या कुपीत बंद करून ठेवला आहे… त्या सर्व क्षणांचा सुगंध अजुन दरवळत आहे.मनाला सुखावत आहे…

सुकलेल्या निर्जीव रोपट्याला पाणी घातल्याने ते कसे टवटवीत होते.. असच माझ्या कोमेजलेल्या आयुष्यात तुम्ही ज्ञानरूपी , संस्कार रुपी पाणी घातल्याने ते अगदी टवटवीत झाले, सर्वार्थाने ते बहरले.. पुलकित झाले…तुमच्या अनमोल मार्गदर्शनामुळे मी आज एक शिक्षिका झाले, संघर्ष करून उभी राहिले…

मला आठवते मॅडम, माझ्या बालपणी इयत्ता तिसरीत असताना, मी एक भाषण केले होते…….’माझे गुरुजी ‘ …आमच्या गुरुजींची महती सांगणारे ते भाषण आणि मला धपाटे देऊन भागाकार शिकविणारे जाधव गुरुजी… प्रेमळ आणि समजूतदारपणे शिकविणारे मुख्याध्यापक माळी गुरुजी.. आज प्रत्येक क्षणी मी माझ्या विद्यार्थांना शिकवताना मला आठवतात… अगदी तसेच इंग्रजी विषयाचा प्रत्येक घटक शिकवताना , प्रत्येक तासाला मला तुमची आठवण प्रकर्षाने येते….

अजुन एक गोष्ट सांगावीशी वाटते, पुस्तकातले धडे गिरवायला, आशय सगळेच शिकवतात.. पण तुम्ही आम्हाला आयुष्याचा धडा गिर वायला शिकविले. नवीन वहीच्या पहिल्या पानावर एक वाक्य लिहायला तुम्ही नववीत सांगितलेले… “I will be successful in my life…” आजही माझ्या प्रत्येक वहीच्या पहिल्या पानावर हे वाक्य लिहिलेले असते. मी यशस्वी होत आहे मॅडम… अजुन होईल.

तुम्ही एक विद्यार्थिनी नव्हे, तर एक शिक्षिका घडवली आहे…जी पुढील येणाऱ्या प्रत्येक पिढीला तुमच्या ज्ञानाचा व संस्कारांचा वारसा देत राहील… तुम्ही दिलेले ज्ञान अमृत मी माझ्या विद्यार्थ्यांना देईल.. ती रोपे बहरतील यासाठी नक्की प्रयत्न करेन… अशी खात्री देते…तुम्ही खूप चांगले संस्कार माझ्यावर केलेत.. ..माझ्यात जे काही चांगले आहे ते सर्व तुमचे आहे…. खूप मोठ्या मनाच्या आहात तुम्ही… तुम्ही मला परिस्थितीच जाणीव करून दिलीत… आयुष्याची संकल्पना स्पष्ट केलीत…आज माझ्या आयुष्याचे रोप तुमच्या मुळे बहरले आहे… यामध्ये सिंहाचा वाटा तुमचा आहे… आज तुमचा सेवानिवृत्ती समारंभ आहे…ऐकून डोळ्यात पाणी तरळले….तुमच्या सोबत विद्यार्थिनी म्हणून केलेला सर्व प्रवास आपसूकच डोळ्यासमोरून गेला….

तुम्ही फक्त माझ्या मॅडमच नव्हे एक छान मैत्रीण झालात ,एवढच काय प्रसंगी एक आई झालात..यापलीकडे अजुन कोणता मोठा आनंद असणार आहे,???माझ्या आयुष्याला दिशा दिलीत. तुमचा पाठीवरून फिरणारा हाताचा आश्वासक स्पर्श मला खूप मोठे बळ देऊन गेला …

फक्त अध्यापन न करता आयुष्यातल्या बऱ्या ,वाईट परिस्थितीत एक चांगल्या मार्गदर्शिका तुम्ही बनलात…त्याच बरोबर प्रत्येक संकट क्षणी मला खूप आधार दिला , ऊर्जा दिलीत, कधीही न संपणारी संस्कार शिदोरी दिलीत.आयुष्यात ज्या वळणावर कलाटणी मिळते, तो क्षण तुमच्या मुळे माझ्या जीवनात आला…मला परिस्थिती ची जाणीव झाली… तो क्षण तुम्ही सावरला… त्याचमुळे मी आज कोणत्याही संकटात कोलमडून न जाता, सामर्थ्याने उभी आहे , उभ्या वादळात पाय रोवून धीराने न डगमगता उभी आहे…

तुमचे आभार कसे मानू,??? मी तुमच्या ऋणात राहणं पसंत करेन…ते जास्त आवडेल मला..तुमच्या सारख्या मार्गदर्शिका मिळाल्या… मी खूप भाग्य वान आहे.

“लाभले गुरु तुम्हासम मला या जन्मी,

आहे भाग्यवान मी राहीन तुमची ऋणी…”

आजही एवढेच सांगेन, आजही तुमचा आधार हवाच वाटतो…संकट खूप येतील , संघर्ष खूप आहे.. तुमचे मोलाचे मार्गदर्शन मिळत राहो.. अगदी याच जन्मी नाही, तर पुढचे सर्व जन्म मला तुम्ही शिक्षिका असाव्यात हीच एक आकांक्षा…

“आहात तुम्ही थोर, उपकार अनंत तुमचे,

लाभाल तुम्हीच शिक्षिका, हेच सदभाग्य माझे…”

तुमच्या विषयी किती लिहावे .. शब्द अपुरे पडतील…. यापुढे सेवानिवृत्ती नंतर जीवनात एक छान नवी सुरुवात असते.. तुम्हाला खूप दीर्घायुष्य लाभो.. आरोग्य ,सुख, समृद्धी, समाधान लाभो..आनंद लाभो… हीच ईश्वर चरणी प्रार्थना…

तुमची विद्यार्थिनी ,

सुसिमा थोरात.

28/01/2023

शुभेच्छा समारंभ निमित्त पत्र….

@ All rights are reserved.

*सुंदर हात…*

मागच्या आठवड्यात वर्गात सुंदर हातांच्या स्पर्धा होणार असे सांगितले होते. स्पर्धेची तारीख जवळ येत चालली… गुरुवारी स्पर्धा होणार होत्या माझी तर काहीच तयारी नव्हती… पहाटे लवकर उठले एकदा स्वतः स्वतःच्या हाताकडे पाहिले आणि मनात विचार केला… बाकीच्या माझ्या मैत्रिणीची तयारी झाली असेल का?? ‘सुंदर हातांच्या स्पर्धेसाठी’ …..

क्षणभर विचार केला आणि पटकन उठून अंगणात सडा सारवण टाकण्यासाठी शेण घेऊन आले आणि अंगण स्वच्छ झाडले, शेणाने सारवून घेतले, त्यावर सुंदर रांगोळी रेखाटली…अगदी मनाला हवे तसे मनाला भावतील असे सुंदर रंग रांगोळीत भरले…

आईचे जेवण बनवून झाले होते…चूल उकनली होती. ती व्यवस्थित लिंपली आणि सारवून घेतली. आईने जेवण बनवून खरकटी भांडी बाहेर आणून ठेवली. राखेने भरभर भांडी घासून ,धुवून घेतली… आईलाही मजुरीला जायचे होते. आंघोळ, देवपूजा वगैरे सर्व आवरून झाल्यावर सारवलेल्या चुलीला हळद-कुंकू वाहिले… अंगण किती छान दिसत होते आता..अंगणाच्या बाजूला असणारी चूल साक्षात अन्नपूर्णेचे चे प्रतीक होती….

आवरून, भाकरी – पिठले डब्यात भरून घेतलं.. आईने दोन छान वेण्या बांधून दिल्या चप्पल पायात सरकवली, दप्तर पाठिवर टाकून मी धावतच शाळेत निघाले… मनात विचारांची खूप गर्दी होत होती. स्पर्धेसाठी माझी काहीच तयारी नव्हती.. पंधरा मिनीटात शाळेत पोहोचले … वर्गात जाताच कानावर आवाज पडला… “माझी मेहंदी बघ ना! किती सुंदर आहे? नंबर तर माझाच येणार” वीणा बोलत होती. तोपर्यंत मुग्धा म्हणाली.. “माझे नेलपॉलिश बघ फॉरेन वरून मागवले आहे, माझ्या दीदीने पाचशे रुपयांचे! आहे, किती छान आहे नंबर तर माझाच येणार”!! अशी चर्चा चालू असताना, रोज पहिल्या बाकावर बसनारी मी आज शेवटच्या बाकावर कोपऱ्यात जाऊन बसले….

प्रत्येक मुलीने आपल्या हातावर सुंदर मेहंदी रेखाटली होती. छान नेल पॉलिश लावले होते. मी मात्र माझ्या काळवंडलेल्या हाताकडे बघतच राहिले.. नकळत माझ्या डोळ्यात पाणी उभे राहिले…. बाई वर्गात आल्या आणि त्यांनी स्पर्धा लगेचच होईल असे सांगितले.बाईंनी पहिल्या बाकापासून हात बघायला सुरुवात केली… सर्वांचे हात बघून झाल्यावर बाई माझ्या जवळ आल्या, माझ्या दोन्ही हातांनी मी चेहरा झाकून घेतला आणि स्फुंदू लागले …. बाई म्हणाल्या अनघा तुझे हात दाखव बरं… काय झालं??? मी उभे राहिले बाईनसमोर हात धरले ….माझे उन्हाने काळवंडलेले परिस्थितीने कृश झालेले हात बाईंनी बघितले आणि विचारले,” तू काहीच नाही का तयारी केली सुंदर हातांच्या स्पर्धेसाठी??”

मी धीर एकवटला,डोळे पुसले… मी बोलू लागले, “बाई आम्ही परिस्थितीने खूप गरीब आहोत, आम्ही छपरात राहतो,आई-बाबा मजुरीचे काम करतात. माझी आई मजुरीचे काम करत असल्याने मलाही घरी काम करावे लागते. जिथे आम्हाला पोटभर अन्न मिळत नाही, तिथे या सगळ्या वस्तू आम्ही कशा विकत घेणार?? शाळेत येण्यापूर्वी, शाळेतून गेल्यावर मला कामात मदत करावी लागते..मग अभ्यास करावा लागतो.. सकाळी लवकर आवरून सडा-सारवण करावे लागते. राखेने भांडी घासावी लागतात. परिस्थितीने काळवंडलेल्या सडा-सारवण करणाऱ्या, काम करणाऱ्या माझ्या हातांना लावायला मला कसं मिळणार नेल पॉलिश आणि मेहंदी??”

एवढे बोलल्यावर पुन्हा माझ्या डोळ्यातील अश्रुंचे थेंब पटापट माझ्या हातावर पडू लागले…. बाईंनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. खूप आश्वासक स्पर्श होता तो…बाई पुढे गेल्या आणि म्हणाल्या या स्पर्धेचा निकाल आता मी जाहीर करणार आहे. सगळेजण शांत बसले. मुख्याध्यापिका मॅडम वर्गात आल्या सगळ्या मुली आतुरतेने निकालाची वाट पाहू लागल्या. प्रत्येकीला वाटत होते माझाच नंबर येणार ,मी स्पर्धा जिंकणार. मी मात्र यामध्ये कुठेच नव्हते. थोड प्रास्ताविक उरकून बाईनी निकाल जाहीर केला…” या स्पर्धेची विजेती आहे अनघा अनिल जाधव” सगळ्या मुली डोळे विस्फारून, आश्चर्याने पाहू लागल्या.. बाईने मला पुढे बोलावले आणि स्पर्धेचा चषक मुख्याध्यापिका मॅडम कडून मला बहाल केला.

बाई बोलू लागल्या,” नेल पॉलिश आणि मेहंदी लावून हात कधीच सुंदर होत नसतात, सुंदर हात होण्यासाठी कष्ट करावे लागतात… सडासारवण करणारे हात.. सुंदर रांगोळी काढणारे हात.. चूल लिंपणारे हात.. अन्नपूर्णेची पूजा करतात.. सुंदर हस्ताक्षर काढतात.. तेच हात सुंदर असतात.. अशा सुंदर हातांचे स्पर्धेत अनघा विजय ठरली आहे ,तर त्यात नवल काहीच नाही.. तिचे मनापासून अभिनंदन.. आपण प्रत्येकाने सुंदर हात बनवायला हवेत… कष्ट करून… बाई थांबल्या,टाळ्यांचा कडकडाट झाला. आज खऱ्या अर्थाने किंबहुना सर्वार्थाने सुंदर हात कसे असतात ,हे मला समजले होते आणि उमगलेही…..

– सुसिमा थोरात

@Image source – Google

@ All rights are reserved.

https://susima.home.blog/2022/06/17/सुंदर-हात/

*क्षण एक पुरे प्रेमाचा…*

*✤______________________________✤*
*╭═══════════════════╮*
*●ललित लेख ●*
*╰═══════════════════╯*
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹
*○ क्षण एक पुरे प्रेमाचा ○*

आभाळात खूप मळभ दाटलं होतं.. मनात उदासीनता दाटून आली होती… काय करावे , काही समजत नव्हते.. उगीचच मन खट्टू होऊन गेले आणि भूतकाळात डोकावण्याचा प्रयत्न करू लागले… मी एक मनाशी खूणगाठ बांधली होती…आता जुने दुःख विसरून जायचे…जुन्या, दुःखद आणि वेदनादायी आठवणींचं गाठोडं बांधून मी दूर समुद्रात फेकून दिले होते आणि मला आता तिकडे बघायचंही नव्हतं…. पुन्हा एकदा तो कटू भूतकाळ न आठवण्याचा निर्धार करून मी बाहेर आले…. आभाळाकडे मूक मनाने पाहिले…

शाळा सुटायला थोडा वेळ होता.शाळेच्या प्रांगणात सायंकाळच्या वेळी मुले आनंदात बागडत होती. शाळा सुटण्याची वेळ झाली आणि शाळा सुटली. सगळी पाखरे घराच्या ओढीने आपल्या घरी आपापली दप्तरे घेऊन निघून गेली. शाळेतील पाखरांचा किलबिलाट थांबला… सगळीकडे नीरव शांतता पसरली. मीही घरी जायला निघाले. गाडी गेटमधून बाहेर काढली. गेट बंद करून घेतलं… दहा मिनिटे पुढे गेल्यावर जाणवले, वातावरणात एक वेगळाच थंडावा आहे. मातीचा धुंद करणारा सुगंध आसमंतात पसरून गेला होता…. रस्त्याच्या दोन्ही कडा ओल्या झाल्या होत्या… झाडे शहारली होती….हो! … पाऊस पडून गेला होता…

खूप दिवसांनी… उन्हाच्या झळांनी होरपळलेली तप्त धरणीमाता तिचा उसवा निघाला…एवढ्या दिवस पावसाची वाट पाहणारी तप्त धरणी काही अंशाने का होईना तृप्त झालेली…..थंड झालेली. झाडे ,लता ,वेली चिंब भिजलेल्या, ओल्या झाल्या होत्या. मागच्या दोन दिवसापूर्वी वणव्यामधे पेटलेल्या एका उंच झाडाच्या बुंध्यातून अजून धूर निघत होता… काही झाडे बहरलेली असताना वणव्यात बुंधे जळून मोडून पडली होती…

मी विचार केला, अगदी असंच नाही का माणसाच्या आयुष्यात चिंता माणसाला जिवंत असताना मनाने आतून जाळून टाकते, तर चिता माणसाचे शरीर मृत झाल्यावर जाळून टाकते…. दोन्हीत फक्त अनुस्वाराचा फरक … चिंतेमुळे माणसाचे बहरलेले उभे आयुष्य उन्मळून पडते…अगदी वणव्यात धूपत जाणाऱ्या त्या झाडाप्रमाणे….!सर्वांना गारवा, सावली देणारे, फळे देणारे, बहरलेले झाड क्षणार्धात मोडून पडले… त्या वणव्यामुळे…..

मनाशी मी ठाम निश्चय केला, आता कसलीच चिंता नाही करायची…..काहीच कटू, जुने नाही आठवायचे…

अगदी केशवसुतांनी म्हणल्याप्रमाणे,

” जुने जाऊ द्या मरणा लागुनी,

जाळूनी किंवा पुरूनी टाका”…

आपल्या आयुष्यात जे क्षण येतील ते खूप आनंदाने आणि मजेत जगायचे. अगदी फुलाप्रमाणे…. ते फुल आपल्या छोट्या आयुष्यात इतरांचे आयुष्य आनंदी आणि सुगंधित करण्याचा प्रयत्न करते…. अगदी तसेच.

आणि कोणास माहित कधी वरचे तिकीट निघेल???? आणि सगळेच निशब्द होईल… गोविंदाग्रजांनी म्हटलेच आहे…..

” क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणांचा”

प्रेमाचा एक क्षण माणसाला जगण्याची नवी उमेद देऊन जातो, आशेचा किरण देऊन जातो … सगळी दुःख विसरायला लावतो…प्रेमाच्या दोन गोड शब्दांनी दुःखी माणसाच्या मनातील दुःखाचा वणवा विझून जातो. मनाला गारवा देऊन जातो.म्हणूनच येतील ते क्षण आनंदात जगू या, आणि इतरांनाही त्यांच्या जीवनही आनंदी आणि सुगंधित करण्याचा प्रयत्न करूया…..

– सूसिमा थोरात.
@All rights are reserved.
@Image source – Google.

https://susima.home.blog/2022/03/11/क्षण-एक-पुरे-प्रेमाचा/

11/03/2022
🍃🌹🍃🌹🍃🌹 🍃🌹🍃🌹🍃
*╰✤▬●❂❃۩▪️S▪️ ۩❃❂●▬✤╯*
╰════════════════╯

गझल

*माणुसकीचा झरा*

*नको बंगला ना संपत्ती फक्त मला आसरा पाहिजे*
*हृदयामध्ये खळखळणारा माणुसकीचा झरा पाहिजे*

*हसता हसता सोसत असते काळजात मी हजार जखमा*
*पण जीवनभर कायमस्वरुपी सोबतीस तो चेहरा पाहिजे*

*सिद्ध कराया गुन्हा पाशवी अमानुष अशा त्या लोकांचा*
*न्याय आंधळा असेल जरिही साक्षिदार तर खरा पाहिजे*

*क्षुधा शमवते माय लेकरू भीक मागुनी रस्त्यावरती*
*हातावरती रोज भाकरी देणाराही बरा पाहिजे*

*दिसायला ती शोभुन दिसते सदाफुली ही अंगणातली*
*नाजुक रूपडे तरी जरासा सुवास पण साजरा पाहिजे*

*सुसिमा थोरात*

https://susima.home.blog/2021/07/23/गझल/

गझल

वृत्त – अनलज्वाला

*आदर*

*करू कुणाचा आदर आता मनात माझ्या*
*जो तो करतो दिवसा चोरी घरात माझ्या*

*वेड्या मनास समजावू मी कसे कळेना*
*प्रेयसीचीच दारी आली वरात माझ्या*

*गांगरले मन साधे भोळे दुभंग झाला*
*जो-तो पाही प्रेमभंग हा जनात माझ्या*

*विसरूच कशा अमुच्या भेटी दोन मनांच्या*
*वाहत होत्या त्या आठवणी नसात माझ्या*

*जो तो फसवी तसे फसविले तिनेच मजला*
*नाही उरले आता काही करात माझ्या*

*- कवयित्री सुसिमा थोरात*

12/05/2021

@All rights reserved.

https://susima.home.blog/2021/05/12/532/