*जान है, तो जहाँ हैं|….*

*जान है, तो जहाँ हैं|….

वसंत ऋतूची सुरुवात होऊन नुकताच एक आठवडा आठवडा लोटला होता .. वातावरण कसं प्रफुल्लीत करणारे होते… कोकिळेच्या सुरेल कुंजनाने मन सुखावत होते…. पहाटेची पाखरांची किलबिल, अंगावर सुखद,अलगद हळुवार अशी फुंकर मारणारा सकाळ आणि सायंकाळ चा थंड वारा… दिवसभराच्या रखरखीत उन्हामध्ये सुद्धा नव्याने पल्लवलेली सारी सृष्टी हसत होती…. तो नवा साज लेऊन स्वतःशीच लाजत होती… जणू काही साऱ्या निसर्गाला भाळून टाकत होती….

अशा सगळ्या नयनरम्य वातावरणात, माणूस मात्र पार जायबंदी झाला होता .. तो कोरोना विषाणू च्या संकटामुळे….

तिन्हीसांजेला बाहेर कुठे पडता येणार नाही, पण आपण गच्चीवर नक्की जाऊ शकतो… थोडफार पाय मोकळं करायला.. …असा विचार करून निर्विकार मनाने पायऱ्या चढून गच्चीवर गेले.. पश्चिमेला सूर्यास्त दर्शन होत होते… थोड्याच वेळात तो सूर्य मावळणार. आजचा सूर्यास्त मला वेगळाच भासत होता.अस्ताला जाणारा तो दिनमणी मला उदास वाटत होता…. आंब्याची ,सुपारीची, फणसाची, सागाची, माडाची झाडे निःशब्द उभी होती… सूर्यास्ताच्या वेळी, सूर्याच्या किरणांनी सह्याद्रीची रांग सोनेरी किरणे अंगावर पांघरूण स्तब्धपणे उभी होती.. झाडे सुद्धा या सूर्याची सोनेरी किरणे किरीट प्रमाणे शिरावर धारण करून शांत उभी होती… तरी ती उदासच वाटत होती. आकाशाची लालिमा मन मोहून घेत होती…पाखरांचे थवेच्या थवे घरट्याकडे परतत होते. कोकिळा आर्त कुंजन करत होती….

रस्त्यावर मात्र नेहमीप्रमाणे वाहनांची माणसांची वर्दळ, गर्दी नव्हती. क्वचित एखादी व्यक्ती दिसत होती. एरवी गजबजलेले असणारे बस स्थानक, आज स्मशानाप्रमाणे ओस पडले होते.. सारा निसर्ग मानवाच्या या अवस्थेला कुत्सितपणे हसत आहे… असंच मला जाणवले. पर्यावरणावर प्रदूषकांचा मारा करून साऱ्या पशु – पक्षांचे, प्राण्यांचे, पक्षांचे जीवन धोक्यात आले. त्यांना हैराण करणारा माणूस आज स्वतः जायबंदी झाला होता…

आठवा…. पाण्याचे प्रदूषण केल्याने समुद्राच्या काठाशी मरून पडलेले हजारो मासे…. विषारी पाणी पिऊन मरणारी हजारो जनावरे…. हवा प्रदूषणाने, बॉम्बस्फोटाने मरणारी हजारो पाखरे … जी आज आनंदाने गगनात भरारी घेत आहेत, मात्र आज या विषाणू मूळे माणसे पाखराप्रमाणे मरत आहेत…जीव मुठीत धरून, माणसे घरातच बंदिस्त झाली आहेत… एवढी मोठी शिक्षा आज निसर्गाने मानवाला दिली आहे..

आज दाही दिशातून फक्त आपल्याला जिवलग, आप्तेष्ट, मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या मृत्यूच्या बातम्या वाऱ्यासारख्या येऊन धडकत आहेत.. त्या ऐकून उरात धडकी बसल्यावाचून राहत नाही ..आज घडीला फक्त आपला जीव वाचवणे, तेही माणसाला कठीण होऊन बसले आहे. या सर्व कोविड परिस्थितीमध्ये आणखीन एक प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे, ‘ऑक्सिजनचा तुटवडा’… याच माणसाने स्वतःच्या सोयीसाठी हजारो झाडांची निर्दयपणे कत्तल केली, त्याच माणसाला आज निसर्गाकडे ऑक्सिजनची भीक मागावी लागते…

आपल्या एका श्वासाची किंमत काय आहे????? हे माणूस पूर्णपणे विसरला. एका दिवसात एक माणूस तीन सिलेंडर भरतील इतक्या प्राणवायूचे (ऑक्सिजन) श्वसन करतो.. एका ऑक्सिजन सिलिंडरची किंमत 700 रुपये आहे.दिवसाला एका माणसाला 2100 रुपयाचा ऑक्सिजन लागतो,दरवर्षाला एका माणसाला 7 लाख 65 हजार 500 या हिशोबाने, सरासरी माणूस 65 वर्ष जगला, तर त्याला 5 कोटी रुपयांचा ऑक्सिजन लागतो… हा ऑक्सिजन झाडे माणसाला फुकट देतात… एकही रुपया न मागता.. आज 22 एप्रिल वसुंधरा दिनाच्या निमित्ताने एवढेच सांगावेसे वाटते,…आता याच्यापुढे प्रत्येक माणसाने आपल्या आणि समाजाच्या हितासाठी, आपण सर्वजण ‘एक तरी झाड लावू, आणि जगवू ‘ही एकच माफक अपेक्षा..

आज माणसासाठी मरण एवढं स्वस्त झाल आहे आणि जगणं खूप महाग झाल आहे.. माणसाची दयनीय स्थिती झालीय.. त्याला फक्त आणि फक्त माणूस जबाबदार आहे.. या परिस्थितीतून सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी माणसाला थोडी माघार घ्यावी लागेल.. थोडं थांबावं लागेल आणि थोड सोसाव लागेल… या विश्वावर अधिराज्य करणाऱ्या माणसाला जायबंदी व्हावं लागेल.. घरीच राहून सुरक्षित राहाव लागेल … या विषाणूचा पराभव करावा लागेल.. तरच माणसाला या जगात पुन्हा नव्याने , मुक्तपणे भरारी मारता येईल… “या विषाणूचा समूळ नायनाट, लवकरात लवकर व्हावा”, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!! सर्वांनी त्यासाठी काळजी घेतली पाहिजे. “घरी रहा, सुरक्षित रहा, मास्क आणि सोशल डिस्टंसिंग वापर करा, सॅनिटायझर चा वापर करा.” जगायचं असेल तर काही बंधनं आपली आपण स्वतःवर घातली पाहिजेत….आणि एक गोष्ट लक्षात ठेवा..” Always keep it in mind, जान है तो जहाँ हैं|…”…

– सुसिमा

22/04/2021

@All rights reserved.

@Image source – Google.

*जान है, तो जहाँ हैं|….*

*प्रतिबिंब ज्याचे त्याचे….*

*✤______________________________✤*
*╭═══════════════════╮*
*● *○प्रतिबिंब ज्याचे त्याचे○* ●*
*╰═══════════════════╯*
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹

शिशिरातल्या दुपारचे ऊन रखरखून गेले. उन्हाने, घामानं अंगाची काहिली होऊन गेली. दुपारची उन्हे कलंडल्यावर सायंकाळची चाहुल देणारा मंद वारा वाहु लागला…. मनात वाटलं अशा सायंकाळी सोबत तर हवीच.. म्हणून घरातून बाहेर पडले, जायचं कुठे असं काहीच ठरवलं नव्हतं, पण जायचं होतं हे नक्की…. जाऊ दूर कुठे असं मनात ठरवलं, गाडी काढली.. मी निघाले…. गावाबाहेरच्या रस्त्याने सरळ बराच वेळ मंद वाहणाऱ्या वाऱ्याची छान सोबत होती… थोड्या वेळात एका टेकडीजवळ पोहोचले. गाडी एका झाडाच्या सावलीत पार्क केली..

थोडा वेळ पुढे चालल्यावर टेकडीच्या बाजूला एक छोटी नदी वाहत होती.. उन्हाच्या तडाख्याने पाणी आटत आले होते, तळ स्वच्छ दिसत होता. मनात विचार आला कोकणातल्या नद्या अशा उथळ आणि छोट्या, पण नजरेची तहान तृप्त करणाऱ्या….. तेवढ्यात माझी नजर स्थिरावली ती नदीच्या काठी निशब्द पणे उभा राहिलेल्या, निश्चल काटेरी झुडपावर.. नदीतल्या निर्मळ संथ पाण्यात अगदी आरशाप्रमाणे स्पष्ट त्या झुडुपाची प्रतिबिंब दिसत होती.

वाऱ्याचा अवखळपणा थोडा कमी झाला होता, त्यामुळे जवळ बरीच झाडे असून झाडाचे पानही हलत नव्हते. काटेरी झुडपे शांतपणे त्या संत आणि स्थिर पाण्याच्या प्रवाहात स्वतःला पाहत होती…त्याच क्षणी एक विचार मनाला स्पर्श करून गेला, माणसाचेही असेच असावे नाही का??? माणसाचा स्वभाव त्याच्या विचारांची वर्तवणुकीची प्रतिबिंबे त्याच्या आयुष्यात पडते, असे वाटते नाही का ?? ज्याचे जसे विचार तशी त्याची प्रतिमा… तसे त्या व्यक्तीचे प्रतिबिंब. काही काटेरी झुडूप प्रमाणे इतरांना त्रासदायक होणारी, काही छान मोगऱ्याप्रमाणे मोहक सुवास उधळणारी, एखाद्याच्या आयुष्यात आनंद उधळणारे.. तर काही अगदी बाभळी प्रमाणे सतत बोचत राहून दुःख देणारी, तर काही अगदी निर्मळ, नितळ गुलाबाप्रमाणे काट्यात राहून धुंद करणारा सुगंध देणारी…. सदाफुली प्रमाणे सदा बहरणारा स्वभाव असणारी… या सगळ्या कडू-गोड भावनांचे पर्यायाने, स्वभावाचे प्रतिबींब प्रत्येक माणसाच्या जीवनात पडलेली असतात.. ..ज्याप्रमाणे वाऱ्याच्या झुळकीने पाण्यावर तरंग उमटतात आणि प्रतिबिंब शहारून जाते, थरथरते , तसेच काही दुःखद आणि वाईट प्रसंगामुळे आपले प्रतिबिंब थरथरते, विस्कटते.. याचा परिणाम म्हणजे कधी कडू, रागीट स्वभावाची माणसे प्रेमळ बनतात. गोड आणि प्रेमळ स्वभावाची माणसे रागीट आणि चिडखोर बनतात.

हे सगळे असले तरी आपल्या स्वभावाचे वागण्याचे प्रतिबिंब प्रत्येकाच्या जीवनात पर्यायाने, प्रत्येकाच्या सामाजिक जीवनात पडते, हेच खरे!! ते कसे उमटवायचे हे ज्याच्या त्याच्या हातात असते.. आपण शंभर टक्के आपला स्वभाव बदलू शकत नसलो,तरी तटस्थ राहून आपल्या आयुष्यात काय चालले?? आपण कसे वागतो?? आपल्या वागण्यामुळे पुढच्या व्यक्तीला काय वाटेल?? याचा सारासार विचार करून आत्मनिरीक्षण करण्याची प्रकर्षाने गरज आहे….

ग. दि.माडगुळकर यांच्या ‘एका तळ्यात होती’या गाण्यातील स्वतःला कुरूप समजणाऱ्या राजहंसाला जेंव्हा तो राजहंस आहे , याची जाणीव झाल्यावर जो निर्भेळ आनंद होतो , असाच आनंद आपल्या जीवनातील ध्येय गवसल्यावर आपल्याला होतो. प्रत्येक व्यक्तीत एक राजहंस दडलेला आहे, जेंव्हा त्याला स्वतःची ओळख होते, तेंव्हा त्याला खूप हलक हलक जाणवत आणि जीवन आनंदाने जगावस वाटत. आपल्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला होते….आपण तयार होतो , गगनात उंच भरारी घेण्यासाठी…. पुन्हा एक नवे आयुष्य जगण्यासाठी…नवे ध्येय गाठण्यासाठी,.. नवी क्षितीजे शोधण्यासाठी…..

– सुसिमा

@All rights reserved.

@image source – Google.

17/03/2021
🍃🌹🍃🌹🍃🌹 🍃🌹🍃🌹🍃
*╰✤▬●❂❃۩▪️S▪️ ۩❃❂●▬✤╯*
╰════════════════╯

कहाणी वेगळी प्रत्येकीची…

मनोरंजनाचे एक साधन म्हणून आपण टीव्ही सगळेच बघतो. या टीव्ही ने घरातल्या प्रत्येक माणसाचा ताबा घेतला आहे. सिरीयलची वेळ झाली की, घरातली हातातली काम तिथेच ठेवून गृहिणी पासून, आबालवृद्धांपर्यंत सगळ्यांना त्या मालीकांचे वेड लागून गेलं. सध्या गेली चार वर्षे झी टीव्हीवर चालू असणारी ‘माझ्या नवऱ्याची बायको’ हि सीरियल सगळेच पाहतात. त्यानंतर स्टार प्रवाह वर चालू असणारी आई कुठे काय करते ही मालिका असो किंवा झी मराठी वर प्रसारित करण्यात येणारी,’ अग बाई सासुबाई !’ ही मालिका असो, प्रत्येक मालिकेतील प्रत्येक स्त्रीचा संघर्ष आपल्याला आयुष्याच्या वेगळ्या वळणावर आणून सोडतो.’ माझ्या नवऱ्याची बायको’ या सिरीयल मध्ये प्रचंड मानहानी आणि अपमान सहन करून, स्वाभीमानाने स्वतःच्या पायावर उभा राहणारी राधीका. त्याचवेळी समाजातील अनेक स्त्रियांना मदतीचा आणि आधाराचा हात देणारी राधिका. मुलगा सुनेला काडीची किंमत देत नसताना, बाहेरख्याली असताना, आईप्रमाणे तिला आधार देणारे तिचे सासू-सासरे हे एक उत्तम सासू- सासर्‍यांचे उदाहरण आहे, त्यानंतर राधिके प्रमाणेच फसलेली शनाया, राधिकाचा हात धरून नव विश्व निर्माण करते. राधिकाची धडाडी पाहून, स्वाभिमान पाहून घटस्फोटित असतानाही तिला मुलासह स्वीकारणारा सौमित्र, हा एक नवा आदर्श समाजाला घालून देतो.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेमधील स्वतः च्या नवऱ्याची साथ नसताना सोशिक वृत्तीने, नेटाने संसार चालवणारी, धडाडीने उभा राहणारी, साधी – भोळी आणि सरळ स्वभावाची अरुंधती… , स्वतः च्या मुलाच्या चुका असताना त्याला पाठीशी घालून अरुंधति वर सासुरवास करून, तिच्यावर हक्क गाजवणारी तिची सासू कांचन… तसेच घटस्फोटित असूनही समाजातील इतर स्त्रियांना संकटावर मात करायला शिकवणारी अनघा.. स्वतः नवऱ्याच्या नाकर्तेपणामुळे व सुरक्षित होऊन अनिरुद्ध च्या प्रेमात पडणारी संजना…

‘शंभू राजे’ मालिकेतील स्वतःच्या कुटुंबातील वाद बाजूला ठेवून, शंभूराजांच्या पाठीशी पहाडा प्रमाणे, खंबीरपणे उभी राहणारी, त्यांची बहीण राणूबाई. तसेच ‘अग बाई सासुबाई’ या मालिकेतील सासूची मैत्रीण होऊन, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी शुभ्रा… आपल्याला, समाजाला एक नवा आदर्श घालून देते.आपल्या मुलाच्या चुका समजून सुनेला समजून घेऊन तीच्या पाठीशी उभी राहणारी आणि पुन्हा नव्याने संसार उभा करणारी आसावरी… तिला साथ देणारा अभिजीत… सगळीच उदाहरण आपल्याला एक उत्कृष्ट, अक नवा आदर्श घालून देतात…याच आदर्शांचा आपण विचार करून वाटचाल केली पाहिजे…

ही सगळी उदाहरण पाहता समाजात ही अशा कित्येक राधिका, शनाया, अरुंधती, अनघा, शुभ्रा आहेत. असंच आपल्याला दिसतं. यात प्रत्येक स्त्री च्या सुखाचे कारण एक असलं तरीही दुःखाची कारण मात्र वेगवेगळी असतात. प्रत्येक वळणावर अन्याय सहन करणारी ही फक्त स्त्रीच आहे. ती पेटून उठते जिद्दीने, धडाडीने आणि परिस्थितीला तोंड देऊन नामोहरम करून, पुन्हा आयुष्य जगते, स्वाभिमानाने…. सावित्रीबाई ने एक नवा आदर्श घालून दिला.. अशीच असते कहानी वेगळी प्रत्येकीची… स्वतःचे अस्तित्व निर्माण करणे, परिस्थितीवर मात करणे, अन्यायाला तोंड देणे, स्वतःच स्वतःशी केलेली प्रतारणा थांबवणे,

यातूनच निर्माण होते कहाणी वेगळी प्रत्येकीची….

https://susima.home.blog/2021/01/20/कहानी-वेगळी-प्रत्येकीची/

@all rights are reserved.

@Image source Google.

– सुसिमा

* घास भरवते…

*✤______________________________✤*
*╭═══════════════════╮*
*●ओथंबलेले क्षण●*
*╰═══════════════════╯*
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹
* चित्रकाव्य *

*○घास भरवते○*

घास भरवते खाऊन घे दादा,
बहिनीच्या हातचा घास,

पुन्हा मिळेल,
याचा नाही विश्वास.

पोर आपण फुटपाथवरची,
नाही कोणा श्रीमंत घरची,

शिळे तुकडे कचऱ्यातले,
आपली गुजराण करती.

मिळाला आहे एवढाच तुकडा,
दोघं मिळून खाऊ,

अजुन काही कुणाकडून मिळालं,
तर सांजेला जेऊ.

माय आपली भटकत असल,
दारोदर मागण्या भीक,

मिळल की नाही भाकरी तिला,
याची माहिती नाही तीथ.

एवढाच घास म्हणून,
रुसू तू नको,

मतलबी या दुनियेत,
उपाशी राहू नको.

नाही कोणाचा कोण,
या स्वार्थी जगात,

परमेश्वराने धरले मौन,
आताच्या युगात.

डोळे बंद करून,
तो आपली परवड पहात आहे ,

माय मात्र रोज आपली,
आसवात नहात आहे.

खोट्या या फसव्या दुनीयेत,
उभ आपण राहू,

शिळा तुकडा खाऊन तरी,
अस्तित्व आपलं पाहू.

-सुसिमा
. 07/07/2020 https://susima.home.blog/2020/07/07/446/
🍃🌹🍃🌹🍃🌹 🍃🌹🍃🌹🍃
*╰✤▬●❂❃۩▪️S▪️ ۩❃❂●▬✤╯*
╰════════════════╯

नभं उतरु आलं….

*✤______________________________✤*
*╭═══════════════════╮*
*●ओथंबलेले क्षण●*
*╰═══════════════════╯*
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹
*○नभं उतरु आलं….○*

उन्हाने अंगाची लाही होत असताना, अचानक काल आभाळ भरून आलं. दाही दिशांचे काळसर ढग भराभर जमले आणि पावसाच्या जोरदार सरी बेधुंदपणे बरसू लागल्या…. कित्येक दिवसानी एखाद्याने उरात दाबून ठेवलेले अनंत दुःख बाहेर यावं असं वाटलं… तसं पाहता कोकणातला पाऊस खूप हळवा वाटला मला…. कोसळायला लागला की कोणाचेही न ऐकणारा… एखाद्या हळव्या मुलीला अतीव दुःख व्हावे, नी काही केल्या तिचे अश्रू थांबुच नयेत… तसंच काहीसं या कोकणातल्या पावसाचं बरसन… काही औरच आहे…

सहज गॅलरीतून पाहू लागले, तर संततधार पावसाचा धारा कोसळत होत्या. नको, नको म्हणाल, इतका कोसळणारा पाऊस मलाही कळेना, त्याची समजूत तरी कशी घालावी?? तीन-तीन तास हा कोसळतोय… थकतो की नाही ??? पांढऱ्याशुभ्र पावसाच्या सरी सर्व डोंगरमाथ्यावर कोसळताना दिसत होत्या. उन्हामुळे धरणी कासाविस झाली होती, तिचा मात्र उसवा निघत होता… ती अजिबात दुखी नव्हती, उलट गालातल्या गालात हसत होती… पावसाच्या आगमनाची तृप्तता ती अनुभवत होती..

वातावरण थंड झाले. उन्हाने होणारी जिवाची तगमग थांबली. सगळी झाडेझुडपे, लतावेली, पर्यायाने सर्व सृष्टी न्हाऊन निघाली. फुललेला गुलमोहर पावसात न्हाऊन निघाला होता… तो खूपच मनस्वी , लाघवी आणि प्रसन्न वाटत होता. त्यातून ओघळणारे थेंबही वेगळीच तृप्तता अनुभवत होते… गॅलरीतून अंगावर उडणाऱ्या छोट्या तुषारांनी मीही थोडीशी भिजून गेले. ते पावसाचे थेंब गॅलरीच्या बार वरून अंगावर उडत होते, जणू काही तेच मला भिजायला बाहेर बोलवत होते. दूरवर नजर गेली दूरवरचा सारा परिसर पांढराशुभ्र होऊन धूसर झाला होता. पावसाचं काय? नी माणसाच काय?? पाऊस या धरित्रीला प्रफुल्लित करतो… हिरवा शालू नेसवतो. आपला बळीराजा पावसाची आतुरतेने वाट पाहतो, पण आज त्याच्या मनात वेगळेच काहीतरी होते, अवखळ मुलाप्रमाणे तो नको ,नको म्हणता बरसतच होता. आपण कितीही मोठे झालो तरी , आपल्यालाही कधी वाटतं एखाद्या गोष्टीसाठी छान हट्ट धरावा कोणाजवळ तरी….. असंच काहीसं कोणाजवळ तरी रुसावं, फुगावं, अबोल व्हावं… असाच काहीसा हट्ट याचा… माझ्या मनात आठवणींचा पाऊस दाटत होता… त्यात च मी काही क्षण हरवून गेले….लहानपणीच पावसात भिजणं, येरे येरे पावसा म्हणत गोल गोल स्वतःशीच फिरण….ओठांवर अलगद ते पावसाचे थेंब झेलण… मन नकळत भूतकाळात गेले.. अंगावर वाऱ्याच्या वेगाने, झुळूक आल्यामुळे अचानक पावसाच्या पाण्याचा शिडकावा झाल्याने मी भानावर आले…

उडणाऱ्या तुषारांनी आणि थंडगार वाऱ्याने एक हलकासा शहारा अंगावर येत होता.. पाऊस धारा तनमन फुलवत होत्या.. हवेची हलकेशी झुळूक त्यांना स्पर्श करून गुदगुल्या करत होती… तरीही त्या बरसतच होत्या… वसुंधरा तृप्त होत होती. हे दृश्य सलग दोन-तीन दिवस मी माझ्या मनात साठवत होते….धरित्री पुन्हा नव्याने हिरवा शालू नेसली होती… उचंबळणार्‍या मनाने गाणे गात होती..

“नभं उतरू आलं…

चिंब थरथर वलं…

मन झिम्माड झालं.

हिरव्या बहरात….”

_-सुसिमा

03/06/2020

@All rights are reserved.

*Image source – Google.
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹
*╰✤▬●❂❃۩▪️S▪️ ۩❃❂●▬✤╯*
╰════════════════╯

हरवलेले दिवस…*

मी सुसिमा,

“ऋणानुबंधाच्या गाठी”

आजच्या बदलेल्या जीवनशैलीतून मला ही कविता सुचली, समीक्षण करावे… “ऋणानुबंधाच्या गाठी” या शीर्षकात स्वतःचे लेखन करते. थोड उशिरा पाठविलेली कविता….

विषय – कुठे गेले ते दिवस..

*तो एक काळ होता,

मामाच्या गावाला जायची आतुरता असायची,

मामीच्या हातची पोळी भाजी,

अमृतासमान लागायची.

झोपाळा , सूरपारंब्या,

शेतात मैफल जमायची,

पाण्यात डुंबण्याची मजा,

आकाश ठेंगणं करायची.

सागर-गोटे वडाच्या सावलीत,

पटकन जागा बळकावायचे,

रंगीबिरंगी काचाकवड्या,

लक्षवेधून रंगायचे.

आता मात्र तसे नाही,

गेलेले दिवस परत येत नाही…

प्रत्येकाच्या हातालाही,

आता मोबाईल शिवाय करमत नाही.

छोटा भीम, डोरेमॉन

लहान मुलांना खेळवू लागला,

पोहणे ,लपंडाव, सायकलींना,

कायमचा रामराम मिळाला.

छोटी छोटी मुलं आता ,

लठ्ठ होऊ लागली,

फास्टफूड खाऊन,

आजारांशी सलगी करू लागली.

मुलांना गोष्टी सांगणारे आजी-आजोबा,

आता गोष्टीतही दिसत नाहीत,

आजी-आजोबानाही आता,

नातवंडाचे अप्रुप वाटत नाही.

मामाच्या गावी जावं कोकणात,

तर तोही उरला नाही,

चिल्या – पिल्यांच्या गाण्यात,

मामाचा गाव कुठे दिसत नाही.

नाही सांगावं वाटत,

दुःख मनीच कुणा,

मनाचा प्रत्येक कोपरा,

होऊन गेला सूना.

नाही उरला प्रेम जिव्हाळा,

नाही राहिली ओढ,

मनामनात साचून राहिली,

नात्यांबद्दल तेढ.

समजाव लेकरांना देवा तुझ्या,

करीन मी नवस,

सांगा येतील का परत माझे,

सोनेरी हरवलेले दिवस?????

– सुसिमा

@All rights are reserved.

Image source – Google.

“उन्हातली पायवाट….”

रानावनातून जाता, खडकाळ पाय वाट,

पायी तुडवीत रस्ता, डोई प्रपंचाचा भार.

पोटापाण्यासाठी वितीच्या, करतो वणवण,

नाही रहात शुद्ध ,आहे रात्र की दिन.

ठाऊक असूनही सारे, दुःख दडपले उरी,

पोरं माझी मागतात, शाळेसाठी नादारी.

नाही दागिन्यांचा सोस , नाही कशाचीच हौस,

पितळेच्या पाटल्या देतील, जगण्याची सारी मौज.

डोईवरचा पदर, नाही ढळू आम्ही देत,

किती संकटात, नाही मोडावी चालरीत.

पाऊल पडते ,पुढे नाही वळून पहात,

आयुष्याचा आनंद, आम्हा राही खुणावत.

ओझी सावरून डोई, निघतो डौलात,

नाही तमा कशाची, आम्ही बाळगत.

संघर्षातून संसाराच्या, ठावे हसत राहावे,

डोईवरील उन्हाळे, ओझ्याने सोसावे…

– सुसिमा

फिरुनी नवी जन्मेन मी….

रात्री अस्वस्थ मनस्थितीत अंथरूण घातलं… थोडावेळ विचारात असताना डोळे मिटून केव्हा झोप लागून गेली समजलेच नाही…… सकाळी जाग येताच मनात विचार येऊन गेला, किती क्षुल्लक गोष्ट होती ती…. मी उगाच जिवाचा त्रागा करून घेतला…..आळस देत उठले आणि घरातून बाहेर आले, पूर्वेला तो भास्कर नुकताच वर डोकावत होता त्याच्या आगमनाच्या आनंदाने आकाशाची लालिमा लाजून लाल झालेल्या नव्या नवरी प्रमाणे दिसत होती…. ते अप्रतिम सौंदर्याने नटलेले आकाश पाहून मी मनोमन सुखावले किती सकारात्मकता होती त्या सूर्योदयात….रात्रीचा गर्द काळोख संपून होणारी ती एक नवी सुरुवात होती…..

आजू बाजूच्या झाडावर पाखरांचा किलबिलाट ऐकू येत होता. सहजच पेरूच्या झाडाकडे लक्ष गेले,कालच अगदी भरपूर पाणी दिल्याने त्यांचा टवटवीतपणा मन प्रफुल्लित करत होता, त्याच पेरूच्या छोट्या पानातून पांढरी छोटी फुले गालातल्या गालात हसत होती, कुठेतरी छोटी फळे डोकावत होती,अति उंचावर नजर गेली तिथे एक चिमणी एक काडी आणून कुशलतेने घरटे विणत होती. ती एका काडीसाठी ती कितीतरी अंतर पार करून जात होती, पुन्हा येत होती….किती तिचा त्रास किती ते कष्ट?????एवढ्या उन्हाळ्यात अनंत वेदनांची पानगळ सोसून पळस ही मनापासून फुललेला होता… शेजारीच एक पारिजात पाणी जास्त झाल्याने अचानक करपून गेला. मखमलीची फुले भरभरून फुलली होती, तीचा बहर खूप आनंद देऊन गेला. घराजवळच एक फेरफटका मारू म्हणलं.पाच मिनिटाच्या अंतरावर एक आंब्याचं झाड होतं अक्षरशः फळांनी वाकुन गेलं होतं… त्याच्याच बुंध्याशी अडचणीत दहा फूट लांबीचा एक मोठा धामण सळसळत होता, मी विचार केला काय झालं असेल?? तर लक्षात आलं की तो कात टाकत होता…. बापरे! कात टाकतानाही एवढा त्रास व्हावा तिथेच बसून राहिले… दगडाचा ढीगा शेजारी मुंग्यांचे वारूळ दिसले, खूप मोठे… बारकाईने निरीक्षण केलं तर त्या मुंग्यांनी एक मोठे झुरळ घट्ट पकडले होते… आणि झेपत नसतानाही त्या ओढत त्याला वारुळात नेत होत्या..त्यांची ती जगण्यासाठीची धडपड होती… वारुळा जवळच आजूबाजूला सर्व काटे असतानासुद्धा त्याच्यापासून उंच अलगत गुडघे मोडीची फुले फुलली होती स्वतःला ती काट्यापासून जपत होती…

हे सगळं पाहिल्यानंतर मनात नकळत विचार आला किती सोप असत ना एखाद्या गोष्टीतून बाहेर पडणं… बाहेर पडेपर्यंत त्रास होतो नंतर मात्र सगळं सोपं होऊन जातं… एखाद्या झाडाला पाणी नाही मिळालं तर त्याच्या मुळ्या हजारो मैल जातात पाणी मिळवण्यासाठी… आंब्याच्या झाडावर वाढलेले बांडगुळ सुद्धा किती तोऱ्यात उभे असते….

त्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीत मला तेवढं जाणवलं की एखाद्या गोष्टीतून बाहेर पडेपर्यंत त्रास होतो.. आणि ती प्रत्येक गोष्ट निसर्ग मला नव्याने होता शिकवत होता… मी मात्र अमुक एका व्यक्तीकडून अमूक एवढ्या गोष्टी मिळाल्याच पाहिजेत असा अट्टाहास धरून बसले होते. जगात खूप सुंदर गोष्टी असतात आयुष्य म्हणजे तरी काय असतं???? एक दीर्घ श्वास घेणं आणि सोडण… आपण नको त्या गोष्टीसाठी अटी तटी ठेवतो, जगाच्या साच्यात आपल्याला बसवायला बघतो आणि नाहक जीवाला त्रास करून घेतो… प्रत्येक सादाला प्रतिसाद मिळतोच असे नाही… कित्येकदा अनंत दुःख सोसून छान ,गोड हसणं हेच खरं जगणं आहे.प्रत्येकाची दुःखाची कारण वेगळी असली तरी, परिभाषा मात्र एकच असते….आपण त्याची सकारात्मक बाजू शोधून त्यातच आनंद शोधायचा असतो…

या क्षितिजाची लालिमा…त्या सापाचे कात टाकण्यासाठीची धडपड… त्या चिमण्या जीवाची घरटं बांधण्यासाठीचे कष्ट…फुलांचे काट्यातल फुलणं…. मुंग्यांच ते अपार कष्ट, पण तेवढे सहन केल्यानंतर मिळतो तो फक्त आनंद…कोषातून बाहेर पडेपर्यंत त्रास नंतर मात्र फक्त आनंद…. इतके दिवस विचार करत मी माझं अनमोल जीवन निरर्थक घालवत होते… एक दीर्घ श्वास घेतला, आणि माझा पुन्हा नवा जन्म झाला अस वाटलं मला…मी पुन्हा नव्याने आयुष्य जगणार होते… स्वतःवर प्रेम करणार होते… स्वतःला समजून घेणार होते… आयुष्यावर प्रेम करणार होते…जणू काही तिचा नवा जन्म झाला होता असा विचार करत घरी येताना आकाशवाणीवरील एक धून कानावर पडली… एकाच या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मेन मी…. हे गाणं गुणगुणत मी स्वतःशीच एक छान गिरकी घेतली आणि ते गाणं गाऊ लागले लहरेंन मी, बहरेन मी… शिशिरातूनी उगवेन मी….. एकाच या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मेन मी…..

– सुसिमा.

@All rights are reserved.

Image source – Google.

अपुली गावाकडची माती…

आज काल आपण पाहतोय सगळ्या जगावर कोरोना व्हायरसच्या भीतीचे सावट पसरले आहे. चीनमधून सुरू झालेल्या या रोगामुळे सर्व जगच भयभीत झाले आहे. ती कोरोनाची लागण आणि त्याचा प्रसार ही एक खूप भयंकर समस्या निर्माण झाली आहे… ज्यावर अजून उपाय सापडलेला नाही… सार्स, mers नंतर प्लेगासारखाच पसरत जाणारा साथीचा आजार म्हणजे कोरोना..! जोकी सगळ्यांनाच जीव मुठीत धरून जगायला लावत आहे.आता सगळीकडेच टिव्ही चैनल,न्यूज,वर्तमानपत्र, व्हाट्सअप, फेसबुक यासारख्या सर्व सोशल मीडियावर फक्त कोरोनाची चर्चा चालू आहे .सर्व शाळा, सरकारी कार्यालये यांना सुट्ट्या दिल्या आहेत. बरीच ठिकाणे लॉक डाऊन कडून केली आहेत. खाजगी कंपन्यांनी त्यांच्या एम्प्लॉइज ना वर्क फ्रॉम होम दिले गेले…

हे सगळं चालू असताना एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवली मित्रहो, आपल्यापैकी बरेच जण आपण जिथे राहतो त्याठिकाणाहून उदरनिर्वाहासाठी नोकरीसाठी दूर कुठेतरी मुंबई ,पुणे ,परदेशात गेलेलो असतो, नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर पडलो, तरी एवढी मोठी राष्ट्रीय आपत्ती आल्यानंतर ती सर्व पाखरे परत येत आहेत..आपल्या घरट्याकडे म्हणजेच आपल्या गावाकडे जिथे आपला जन्म झाला, जिथे आपली छोटसं गाव आहे, जिथे आपल्या छोटसं घर आहे, त्या घराची ओढ आपल्यापैकी सर्वांनाच लागली, जिथे आपला जन्म झाला.जिथं आपलं घर आहे ,जिथे आपण लहानाचे मोठे झालो.. ज्या मातीत खेळलो, जिचा सहवास आपण कधीच विसरू शकत नाही,… तिच्या स्पर्शाने आपण गदगदून जातो. तिचा सहवास आपल्याला जगण्याचा नवा हुरूप देऊन जातो….. पंख फुटल्यावर बरीच पाखरे घरटं सोडून अवकाशाला गवसणी घालण्यासाठी उंच उडून गेली… पण एवढं मोठं संकट आल्यावर ती पुन्हा परत आपल्या गावाच्या मातीकडे परतली… तिच्या पंखांचा आधार घेण्यासाठी, तिच्या कुशीत शिरली, आपले संरक्षण करण्यासाठी …..ज्या वेळी आपल्याला एखाद्या संकटाचा सामना करणं शक्य नसतं तेव्हा आपण आधार शोधतो, तो फक्त गावाकडच्या मातीचां आणि जिवाभावाचा माणसांचा… आपल्या घरट्याकडे परतणारी पाखरे पाहून त्यांना भेटायला , त्यांना कवेत घ्यायला , ….ती माती, ती माणसे,तो परिसर, आसुसून गेला आणि ती येताच एक वेगळाच आनंद या मातीला, त्या जन्मभूमीला झाला…. ती भावना शब्दात वर्णन करणे कधीच शक्य नाही… आपल्या घराकडे ओढ लावणारी ती छोटी पाऊलवाट पटकन संपून जाते… पुन्हा नव्याने आपले बालपण आपल्याला आठवते….

या राष्ट्रीय आपत्ती च्या निमित्ताने एकजूट झालेली माणसे आणि आपल्या घरट्यात जमलेली पाखरे, पिल्ले,पाहून हृदय भरून आले…. म्हणूनच म्हणावेसे वाटते खरा अर्थ प्राप्त होतो तेंव्हा घरट्याला जेंव्हा ते परिपूर्ण होते… या आपत्तीच्या निमित्ताने का होईना ईश्वराचे स्मरण आपल्याला आवर्जून होतं.यासारख्या आपत्तीचे परमेश्वर लवकर निराकरण करून सर्वांना चांगले, आरोग्य समृद्धी प्रदान करो.. हे जग पुन्हा एकदा आरोग्यपूर्ण,शांत, सुंदर आणि छान होवो.. सर्वांना सुख, समाधान मिळो.., परमेश्वर सर्वांचे कल्याण करो, रक्षण करो आणि आयुष्यभराची आठवण सदैव स्मरणात राहो.. हीच विश्वप्रार्थना….!

-सुसिमा

बहरला ऋतुराज असा….

असं मानलं जातं की मराठी वर्षातील माघ महिन्यातील शुक्ल पंचमीला वसंत ऋतूची सुरुवात होते.फाल्गुन चैत्र महिन्यात वसंत ऋतु येतो, मराठी वर्षाचा शेवट व पुढच्या मराठी नववर्षाची सुरुवात म्हणजे वसंत ऋतू. इंग्रजी महिन्यातील फेब्रुवारी व मार्च महिन्यापर्यंत महिन्यापर्यंत येणारा ऋतू येणारा ऋतू म्हणजे वसंत….

मोहरलेला आंबा, फुललेला पळस, बहरलेला गुलमोहर, नटलेली अासावरी, पिवळ्या आणि पांढऱ्या फुलांनी सजलेला चाफा, पांगरी, शाल्मली , दाही दिशांत सुगंध उधळणारा मोगरा, आपल्या सुवासाने धुंद करून सोडणारा कुंदा, फुलांनी नटून गेलेला आणि लाजून लाल झालेला जास्वंद, तुळशीच्या शेजारी दबकुन उभी असणारी मखमल, पिवळ्या फुलांनी डवरलेली शेवंती, राजाच्या तोऱ्यात दिमाखात मनभरून फुलनारा गुलाब अशी फुलझाडे. त्याचप्रमाणे लडिवाळपणे आपल्या बाळांना कडेवर घेऊन उभा असणारा, कुटुंबवत्सल भासणारा फणस, काजू ,झुडपातून डोकावणारी करवंदे , टरबूज कोवळ्या काकड्या, चिंचा, झाडांच्या पानातून डोकावणाऱ्या हिरव्या कैऱ्या, कलिंगड अशा रसदार फळांचा हंगाम म्हणजे वसंत… ही सर्व सृष्टीची रुपये पाहून मन मोहून जाते ना???

या सर्व सृष्टीच्या रूपांची प्रचिती आपल्याला वसंतात येते, म्हणूनच ऋतूंचा राजा वसंत ऋतुराज शोभतो! वसंत म्हणजे नवचैतन्य ,नवप्रभात, नवीनतेच्या नव्या नवलाईने सजलेली वसुंधरा… वसंत म्हणजे निसर्गाची युवावस्था …..वसंत म्हणजे रसरसते लावण्य… वसंत म्हणजे चिरतरुण यौवन , आपल्या मोहक सौंदर्याने साऱ्यांनाच भुरळ पाडणारा असा हा वसंत….या बरोबरच सुरु होणारा कडक उन्हाळा… त्यात जीवाची काहिली करून सोडणाऱ्या उन्हातही पूर्णांशाने बहरलेला गुलमोहर, पळस, आपल्या सुंदर फुलांचा गालिचा सृष्टीवर अंथरतो. सर्वार्थाने सजलेली सृष्टी म्हणजे ईश्वराचे प्रेम जणु!!!!! एवढी पानगळ सोसूनही फुलझाडांचे जोमाने बहरणे मनाला आणि डोळ्याला थंडावा देऊन जाते, छान जगण्याची आशा पल्लवित करते… मोगऱ्याचे परिसर सुगंधित करून फुलणे, जाईजुईचे ते वाकुल्या दाखऊन साद घालने, काश्मिरी फुलाचे वाऱ्याबरोबर डोलणे, पर्यायाने सगळ्या निसर्गाचे नव पालविणे पल्लवित होणे, मनाला एक वेगळीच तृप्तता देऊन जाते…. सृष्टी वसंतोत्सव साजरा करते, निसर्गाचे लावण्य अनोखी वाटते, म्हणून की काय पौराणिक कथेत वसंताला कामदेवाचा पुत्र म्हटले जाते..

अशाच मन प्रसन्न करणाऱ्या वातावरणात होणारी थंड, रमणीय पहाट त्याचबरोबर कोकीळेला फुटलेला कंठ, आपल्या सुरेल स्वरात आंब्याच्या झाडावर बसून ती आपल्या सख्ख्या साद घालते , तोही तिच्या सादेला प्रतिसाद देतो.सर्वच पशुपक्षी, प्राणी आणि वनस्पती तसेच माणसांसाठी सुद्धा वसंत म्हणजे पर्वणी नाही का??सोन्यासारख्या धान्याच्या राशी घरात भरलेल्या असतात, त्याचबरोबर या महिन्यात येणारे होळी, रंगपंचमी, वसंतपंचमी, गुढीपाडवा असे सण सृष्टीच्या सौंदर्यात भरच घालतात …चैत्राची सुरवात चैत्राच्या स्वागतासाठी दारात रेखाटले जाणारे चैत्रांगण ,म्हणजे जणू स्वर्गच अंगणात अवतरल्याचा भास करुन देते…हेच चैत्रांगण परिपूर्णतेने वसंताचे आगत-स्वागत करते… म्हणून म्हणावेसे वाटते आला वसंत ऋतू आला….

-सुसिमा