उन्हाळा ऋतूच्या रणरणत्या उन्हातून मुक्तता मिळविण्यासाठी आपण अगदी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत असतो, जस कि एखादा प्रियकर प्रेयसीची उत्कंठतेने वाट पाहतो.वैशाख ऋतूतील वैशाखवणवा जीवाची अगदी काहिली करून टाकतो, ती तृष्णा शमविण्यासाठी येतो तो पावसाळा म्हणजे वर्षा ऋतू.
शेतकरी पेरणीसाठी पावसाची वाट पाहत असतात, त्यांचा तर तो अगदी जीव कि प्राण आणि जिवलग असतो, तो आहे तर सर्व आहे असेच सर्वस्व काहीसे… आणि हाच पावसाळा प्रत्यक्षात जेंव्हा सुरु होतो, तेंव्हा पहिल्या पावसाची आणि एकंदरीत या वर्षा ऋतूची मजा काही वेगळीच असते.पावसात भिजताना ती अनोखी क्षणांची माळ एक सुखद आणि अविस्मरणीय अनुभव देते.चिंब भिजवणारी ती हलकीशी सर आणि या बरसणाऱ्या सरीत भिजल्यावर हातात जर आलं घालून केलेला वाफाळलेला चहा मिळाला तर त्याचा आनंद आणि चव हि काहि न्यारीच असते. अशाच पावसात एखाद्या लोणावळ्या सारख्या हिल स्टेशन ला भेट द्यावी, आणि नाश्त्याला गरम भज्यांची डिश असावी, ती चव एक वेगळीच तृप्तता देऊन जाते.
जेंव्हा पाऊस येतो तेंव्हा हि तहानलेली, उन्हात भाजून व्याकुळ झालेली धरित्री तृप्त होते, अगदी चातकाप्रमाणे…सगळा निसर्ग कसा प्रफुल्लित होऊन मोहरून जातो, वसंत ऋतूत फुटलेली पालवी, बहरलेली झाडे, फुललेले वृक्ष जेंव्हा पावसात न्हाऊन निघतात त्यावेळी ती अगदी गोड लाजून, शहारून जातात.एकच वाऱ्याच्या झोतात त्यांच्या फांद्या- पानातून मोत्याप्रमाणे पडणार पाणी…अगदी वेड लावून जातं. अगदी गुलमोहर , झेंडू, गुलाब, पारिजातक हि फुले नवे तर वड ,पिंपळ सुद्धा खुलून जातात. भिजलेल्या जमिनीवर पडलेला सुगंधी पांढऱ्या व केशरी देठ असलेला पारिजातकाचा सडा मनाला मोहून टाकतो. वसंतातल्या पालवीने नवी नवलाई घेऊन नटलेला हा निसर्ग पावसाळ्यात मात्र हिरवळीच्या हिरव्या गालीच्याने व्यापून जातो.
नटलेल्या या झाडांना हा पाऊस एक नवसंजीवणीच ठरतो, हि वसुंधरा हिरवागार शालू नेसते, अगदी नववधू लग्नासाठी तयार होते तशीच नाही का?? या हिरव्या धरणीलाल पावसाला बिलगण्याचे जणू काही वेडच लागते ती पुन्हा पुन्हा त्याचे ते रिमझिम बरसणे, आणि ते टपोरे थेंब झेलायला सजून धजून तयार राहते अगदी आनंदाने…
हा अथांग पसरलेला जलधी खूप आनंदून जातो पावसाळ्यात आणि येणाऱ्या प्रत्येक सरीला प्रत्यक्षात, नदीच्या रूपाने का होईना स्वतःमध्ये निःसंकोचपणे सामावून घेतो…एकरूप होतो..त्याच्याच पाण्याचा अंश असलेल्या त्या वाफेचे ते एक प्रतिरूप आणि त्या वाफेची हि वेगळी भेट तो हर्षाने स्वीकारतो… उगीच नाही उधाण येत…..त्याला तो परका कसा करेल???
निसर्गाचं काय आपल्या मनालाही पावसाच्या येण्याची उत्कंठा लागलेली असतेच कि..उन्हाचा ते भयाण रूप पाहून कीतीदातरी मनाला विचार स्पर्श करतोच कि एकदा तरी येना वरुणराजा..किती अंत पाहशील??? ये एकदाच आणि थंड कर सगळं…आणि जेंव्हा तो येतो तेंव्हा वाटत किती दिवसांनी येतोय हा भेटायला ??अगदी लहान मुलं आईला पाहिल्यावर ते धावत आईला जाऊन कवटाळत, आईही त्याला उराशी कवटाळते.. अगदी तसेच या पावसाळा उराशी कवटाळावं, तो सुखाचा क्षण अनुभवावा.आकाश आणि धरणीमध्ये थेंबाच्या रूपाने आपलं नातं निर्माण करणारा हा पाऊस आपल्याला हवाहवासाच वाटतो.
लहान मुलांनाही हा पाऊस हवाहवासाच वाटतो ,पावसाच्या वाहणाऱ्या पाण्यात छोट्या नाव करून सोडायला किंवा शाळेतून भिजत येऊन भाजलेला कणीस खायला, येता येता रस्त्यावरील डबक्यात उड्या मारायला, लहान मुलांना खूप आवडते, त्यांच्यासाठी ती पर्वणीच असते नाही का???? हे सगळं पाहून लहानपणीच गाणं आठ्वल्याशिवाय राहत नाही.
” येरे येरे पावसा तुला देतो पैसा,
पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा,
येग येग सरी माझे मडके भरी,
सर आली धावून मडके गेले वाहून..”
पावसाने काही ठिकाणी खूप बरसला आणि कहर केला तर पूर येतात, जनजीवन विस्कळीत होते.पावसाच्या रौद्र रूपाने प्राणहानी होते , वित्तहानी होते, तो कोपतो आणि सगळंच बिघडवतो, हे एक बाजू थोडी बाजूला ठेवली तरी आनंदाचे उधाण आणून सृष्टीला थंडावा देणारा हा पाऊस … जसेकी प्रियकर- प्रेयसीचे नाते खूप दिवसांनी एकमेकांना भेटल्यावर ती दोघे एकमेकांना घट्ट बिलगून जातात, तो क्षण कधी संपूच नये तो क्षण अत्तराच्या कुपीत बंद करून ठेवावा, अगदी कायमस्वरूपीसाठी….असे त्यांना वाटते..तसेच खूप दिवसांनी पाऊस आल्यावर त्याला बिलगावे आणि म्हणावे” वेड्या किती दिवसांनी भेटतोस खूप वाट पाहायला लावलीस…”असेच त्याला कवेत घेऊन ते सुख अनुभवतच राहावे..अगदी कायम.
कधी रिमझिम तर कधी सरीवर सरी तर कधी प्रचंड गडगडाटासह वीजा आणि वारे यांच्यासोबत कोसळणारा पाऊस….विविध रूपाची जाणीव करून देतो.असा हा पाऊस सतत पडू लागला तर मात्र कंटाळवाणा वाटतो, कुणी म्हणले आहे की सासुरवाशीण सुनेसारखा हा पाऊस सून जोवर येत नाही तोवर कधी येतेय असे वाटते मात्र आल्यावर जास्त दिवस झाले की नको नकोसे होते…
असे सर्व काही असेल तरीही पावसाळ्यात, आषाढात कार्तिकि एकादशीला या आषाढी वारीमुळे एक वेगळे महत्व प्राप्त होते. उभ्या पावसात विठ्ठलनामाचा गजर करीत दिंड्या, पताका घेऊन पंढरीची वाट चालणारे वारकरी आणि तो प्रचंड मोठा पालखीचे दर्शन घेण्यासाठी जमलेला भक्तांचा,विष्णुदासांचा मेळा एक अनमोल ठेवा उरात जतन करून ठेवतात…त्यांना विठ्ठल माउली पावसाच्या रूपाने साद घालत असते.
याच पावसाळ्यात श्रावण महिन्याने एक नवे सौन्दर्य लाभते, ते निळेशार मेघ, मेघांचे डोंगरावरून धावणारे काफ़िले, शिखरावरून कोसळणाऱ्या शुभ्र झऱ्यांच्या धारा ते छोटे छोटे झरे सृष्टीच्या सौन्दर्यंत भरच घालतात,तो सप्तरंगी इंद्रधनुष्य पाहत राहावंसं वाटते. उनसावलीचा पाठशिवणीचा खेळ आणि लपंडाव अगदी मनास भावणाराच असतो.पावसाळ्याच्या सुरवातीला सुरु असनारी लग्नसराई हि पावसाची एक वेगळी आठवण आणि साठवण निर्माण करते, माणसाच्या पर्यायाने सर्वच नात्यात एक वेगळे वलय निर्माण करणारा , आठवणींचा सुंदर मुकुट धारण करून सजलेला , गोड क्षणांची अनमोल भेट देणारा, सुखद गारवा निर्माण करणारा, मनाला विसावा देणारा, उसंत देणारा, आल्हाद देणारा हा पाऊस ,धुंद करणारा,चिंब भिजवणारा, नवसंजीवनी देणारा आहे यात शंकाच नाही…. म्हणून मला वाटते,
येशील ना तू वाट मी पाहीन,
बरसशील जर तू कवेत तुला घेईन.
हळुवार स्पर्श करेन नको घाबरून जाऊ,
अलगद चुंबूनी तुला जीवन नवे देऊ.
पहिल्या पावसाचे ते थेंब अलगद ओठांनी चुंबूनी घ्यावेसे वाटतात, हा पाऊस आसमंतात एक नवं चैतन्य फुलवतो, सर्वांची तहान भागवितो, मातीत थेंब पडल्यावर पसरणारा तो मृदगंध अगदी उरात साठवावासा वाटतो.. पावसाचे वर्णन करताना बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणतात,
“श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे,
क्षणात हिरवे सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे.”
-सुसिमा .