‘जीवनसंगिनी’ : खूप छान आहे मी…..

साद घालणाऱ्या सख्यासाठी प्रतिसाद आहे मी,

कवितेत रमणाऱ्या कवीची सुरेल कविता आहे मी,

धुंद करणाऱ्या रातराणीचा सुगंध आहे मी,

आजमावून पहा, खरचं खूप छान आहे मी.

वाट पाहत्या चातकासाठी पावसाचा थेंब आहे मी,

तप्त धरणी तृप्त करणारी सर आहे मी,

होरपळल्या जीवाला सुख देणारा गारवा आहे मी,

आजमावून पहा, खरचं खूप छान आहे मी.

प्रतिबिंब स्वतःचे पाहणाऱ्या आईची प्रतिमा आहेमी,

सावळ्या त्या मुरलीधराची राधा आहे मी,

जीव लावणाऱ्या जिवलगाचा प्राण आहे मी,

आजमावून पहा, खरचं खूप छान आहे मी.

कुंजणाऱ्या कोकिळेची सुरेल तान आहे मी,

निराश झालेल्या मनासाठी वेडी आशा आहे मी,

एकट्याने वाट कंठणाऱ्याची सोबती आहे मी,

आजमावून पहा, खरचं खूप छान आहे मी.

मनाच्या वेदनेसाठी सुखद फुंकर आहे मी,

संघर्ष करणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणा आहे मी,

पावलोपावली सोबत करणारी जीवनसंगिनी आहे मी,

आजमावून पहा, खरचं खूप छान आहे मी.

– सुसिमा .

https://susima.home.blog/2019/05/12/जीवनसंगिनी-खूप-छान-आहे-मी/

Smile Please…..☺️

‘Smile’ हा फक्त पाच अक्षरी शब्द आहे,पण खूप मोठा गर्भित अर्थ या शब्दात सामावला आहे.जीवनाचं सारं सार हा शब्द आपल्याला थोडक्यात सांगून जातो.आजकाल व्हाट्स अँप, फेसबुक यासारख्या अनेक सोसिएल मीडिया मुळे ,संगणकामुळे, मोबाइलला मुळे जग खूप जवळ आले आहे.पण माणूस मात्र एकमेकांपासून दुरावला आहे.आयुष्य खूप वेगात जात आहे,कि कळतही नाही अखेरचा क्षण आला आहे.

प्रत्येकजण ताण-तणावात वावरत आहे, प्रेमाची, वात्सल्याची, जिव्हाळ्याची, विश्वासाची आणि आपुलकीची थंड गारवा देणारी हिरवळ आपल्यातून नष्ट होत चालली आहे. जो तो पैश्यांच्या मागे धावत आहे, पैश्यांमुळे सगळीच नाती, तत्व, नीतिमूल्ये पायदळी तुडवली जात आहेत, प्रेम हरवत चाललं आहे, विश्वास हरवत चालला आहे, तत्व नष्ट झाली, आत्मसन्मान संपला…

अशी परिस्थिती असूनही जीवन आनंदात जगण्यासाठी आणि आयुष्य एक छान संगीत बनवण्यासाठी खूप विश्वसनीय, गुणकारी आणि रामबाण उपाय म्हणजे ‘smile’ आपण आपल्या आजूबाजूला पाहतो लहान मुलं किती गोड हसत असतात, त्यांचं ते निरागस हसण सर्वानाच हवहवसं वाटत. दिवसभरात कितीतरी वेळा ती मनमोकळं हसतात आणि रडतातही.पण जसजसे आपण मोठे होऊ आपण वेगवेगळ्या गोष्टीचे टेन्शन घेत राहतो आणि आपल्या जीवनातील हास्य गमावून बसतो, आपलं आयुष्य दुखमय करतो.आयुष्य आनंदी करण्याचा उत्तम उपाय म्हणजे ‘हास्य’. दुःख असो व सुख, कुणी प्रेम करो वा राग, कुणी आदर करो वा अपमान, सर्वांवर एक परिपूर्ण आणि योग्य प्रतिक्रिया म्हणजे ‘smile😊’ ज्यामुळे आपली त्या सर्व कडवट भावनामधून आणि ताणामधून बाहेर पडण्यासाठी, तटस्थ राहण्यासाठी मदत करते. प्रत्येक बऱ्यावाईट प्रसंगांमधून सकारात्मक ऊर्जा मिळविण्यासाठी हि ‘smile’खूप मदत करते, चेहऱ्यावर येणारे हलकेसे हसू आपल्याला पुन्हा त्या प्रसंगातून सावरून नव्याने जगण्याचे बळ देते. एकट्यात असो वा कुणी अनोळखी व्यक्ती भेटल्यावरही त्यातून जाणवणाऱ्या ओळखीची ‘smile’ हि मनांमनाचा दुवा जोडून देते, आपलेपणा वाढवते.

म्हणून आयुष्यात कितीही संघर्ष ,दुःख ,बिकट वाट आली, तरीही त्याचा आनंदाने स्वीकार करा, कितीही दुःख देणारी, अपमान करणारी वाईट मांणस भेटली, तरी त्यांचा धिक्कार करू नका,त्यांची शिक्षा नियती त्यांना देत असते, या ना त्या रूपाने. चक्र पूर्ण होत असते,म्हणून हसत राहा.हसण हा एक सुंदर दागिना आहे जो विकत मिळत नाही आणि कोणाच्याही चेहऱ्यावर शोभुन दिसतो. जीवन सुंदर जगण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी, आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांना आनंदी ठेवण्यासाठी ,सतत हसत राहा खळखळून हसा,☺️.10 मिनिटे व्यायाम करून हृदयाला जेवढा व्यायाम मिळतो तेवढा एक मिनिट हसल्याने मिळतो, असे कुणीतरी म्हणले आहे ते खरेच आहे. हिटलरने सुद्धा सांगितले आहे “ज्या दिवशी आपण हसलो नाही तो आपल्या आयुष्यातील वाया गेलेला दिवस,” म्हणून हसत राहा. दुःखी कष्टी, सुतकी चेहऱ्याने दुःख देणाऱ्या माणसात राहण्यापेक्षा तिथून दूर राहा ,ताणतणाव, दुःख उगाळत बसण्यापेक्षा हसत राहा, आनंदी राहा.आजकाल हसण्यासाठी खूप ठिकाणी हास्य क्लब ची स्थापना केलेली असते, तिथे जॉईन नाही होता आलं तरी एक अस संगीत निर्माण करा जे आयुष्यभर आपल्याला हसवत ठेवेल,जसा दिवा तेवत ठेवण्यासाठी तेल मदत करते तसेच हा सुंदर हसण आपल्या आयुष्याचा दिवा अखंड तेवत ठेवेल…. स्वतः हसा इतरांनाही हसवा आणि नेहमी म्हणा… smile please……☺️

इस बात पे एक smile तो बनती है boss……☺️

– सुसिमा .

https://susima.home.blog/2019/05/07/smile-please-☺️/

मंगल देशा, पवित्र देशा…..

बहू असोत सुंदर संपन्न कि महा,

प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा.

महाराष्ट्राबद्दल,आपल्या या जन्मभूमीबद्दल गौरवोद्गार काढण्यासाठी असे कितीतरी शब्द, अशा किती ओळी आणि अशी कित्येक गीते अपुरीच पडतील. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम , संत मुक्ताई, संत जनाबाई यांच्या महान विचारांचा आध्यात्मिक वारसा आपल्या या महाराष्ट्राला लाभला आहे.

सह्याद्रीच्या कुशीत निवांतपणे पहुडलेला महाराष्ट्र, कोकणच्या निसर्गरम्य निसर्गसौन्दर्याने नटलेला महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने आणि पावन पदस्पर्शाने पवित्र झालेला महाराष्ट्र, छत्रपती संभाजी महाराजांच्या अतुलनीय पराक्रमाने उत्तुंग असा इतिहास निर्माण झालेला महाराष्ट्र.

अजिंठा वेरूळ लेणी, कृष्णा, येरळा अशा नद्या विविध गड , किल्ले, रायगड, राजगड , समुद्री किल्ले अशा विविध ऐतिहासिक पर्यंटनस्थळांनी आपला समृद्ध वारसा आपल्या मराठमोळ्या महाराष्ट्रात जपला आहे. मराठी ही आपली मातृभाषा कोसाकोसावर वेगळं वेगळं बोलीभाषेच रूप दाखवते.

१ मे १९६० या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.तोच दिवस कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. विविधतेत एकता आपल्या महाराष्ट्राने जपली आहे, विदर्भ , मराठवाडा , खानदेश, कोकण, मध्य महाराष्ट्र या भागातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळी जीवनशैली असूनही एकोपा आणि माणुसकी खूप प्रकर्षाने जाणवते…..

म्हणूनच म्हणावेसे वाटते

जय जय महाराष्ट्र माझा ,

गर्जा महाराष्ट्र माझा.

-सुसिमा

https://susima.home.blog/2019/05/02/मंगल-देशा-पवित्र-देशा/

सांग कधी येशील???

पाहते आहे वाट तुझी सख्या, किती अंत पाहशील?

घेण्या कवेमध्ये मला, सांग कधी येशील??

आगीत एकटेपणाच्या आहे होरपळत मी,

विरहात तुझ्या क्षण क्षण कंठते जीवन मी.

जीवलगांची झाली वाणवा दुनियेच्या दारात,

नाहीच द्यावस वाटत स्थान कोणाला उरात.

फिरवून हात डोक्यावर, डोळ्यात पाहशील का??

दुःख मनीचे माझ्या हृदयाने जाणशील का??

चुंबूनी कपाळ माझे, जवळच राहशील का??

देउनी पाठीवर थाप , बळ मला देशील का??

नको जगात दुसरे काही , आधार देशील का??

साद घालते आर्त राधा प्रतिसाद देशील का,??

प्रेमाने जिंकते जग , फक्त प्रेमच देशील का??

नको काही प्रलोभने, फक्त जवळ घेशील का???

-सुसिमा .

https://susima.home.blog/2019/04/26/सांग-कधी-येशील/

बॅड पॅच हवाच……

खूप वाईट वाटत आपल्याला जेंव्हा आपल्या मनाला दुःख होत..मनाविरुद्ध आणि हवं तस लोक आपल्याला वापरतात…आपली मानहानी करून ,आपला आत्मसन्मान धुळीला मिळवतात, आपल्याला गृहीत धरतात,…..आपल्यावर मोठी संकट कोसळतात, खूप प्रयत्न करूनही अपयश पदरात पडत, कुणीतरी अचानक फसऊन जात….

असे बॅड पॅच आयुष्यात सारखे नाहीत, पण येत असतात, कुणाच्या आयुष्यात जास्त वेळा तर कुणाच्या आयुष्यात ते कमी वेळा येऊन जास्त काळ राहतो…त्याच काळात आपली खरी परीक्षा असते. त्या काळात आपण त्या बॅड पॅच बरोबर कसा सामना करतो हे ज्याचे त्याचे कौशल्य आणि आत्मविश्वासाचा भाग आहे…

पण हाच आपल्या आयुष्यातील संघर्षाचा क्षण असतो, जो स्वतःला सिद्ध करून दाखवायला , झुंजायला शिकवतो, स्वतःची स्वतःला ओळख नव्याने पटवून द्यायला कारणीभूत ठरतो, आत्मविश्वास वाढवतो व पुन्हा एकदा जगण्याचं बळ देतो….

बॅड पॅच माणसाच्या आयुष्यात यावा असं मला तरी वाटत, तरच माणूस प्रगती करेल.. या काळात माणसाला आपलं कोण व परक कोण याची ओळख होते, आपण संकटात असताना कोण आपल्यासोबत उभे राहते याची जाणीव होते, आपला कुवतीची कल्पना येते, आपण एक उंच भरारी करण्यासाठी हाच संघर्षाचा काळ आपल्याला मदत करतो , जगात स्वतःची ओळख निर्माण करून देतो, जीवनाला कलाटणी देतो, म्हणून खरच वाटते, आजपर्यंत जे मोठे आदर्श लोक घडले ते फक्त आणि फक्त त्यांच्या आयुष्यातील बॅड पॅच मूळे,’ संघर्षाविना जीवन निरस,पठारावस्थेसारखे व बेचव होईल’…… म्हणून बॅड पॅच हवाच, या काळात स्वतःशी प्रामाणिक राहा,… त्याच्याकडे नकारात्मकतेने पाहू नका, सकारात्मकतेने पहा,……एक दीर्घ श्वास घ्या, बाहू थोपटून संकटांचा सामना करण्यास उभे राहा आणि म्हणा ‘B positive’…… ‘Yes I can do it’..…

–सुसिमा पाटील, पुणे

बॅड पॅच हवाच……

तो पहिला पाऊस होता…..

अश्रूंचा माझ्या बांध फोडणारा,

जखमेवर हळुवार थंड फुंकर घालणारा,

तो पहिला पाऊस होता…..

वेदना मनाची जाणवून देणारा,

कुठेतरी विसावा शोधायला लावणारा,

तो पहिला पाऊस होता…..

तप्त धरणी तृप्त करणारा,

होरपळल्या जीवा त्या न्हाऊ घालणारा,

तो पहिला पाऊस होता…..

मनाचं मळभ दूर करणारा,

तनमन तृप्त करणारा,

तो पहिला पाऊस होता……

सखीस मूक साद घालणारा,

सजनाची याद करून देणारा,

तो पहिला पाऊस होता…..

मुखकमलास या हळुवार चुंबणारा,

डोळ्यातील आसवे वाहून नेणारा,

तो पहिला पाऊस होता…..

हात सखीचा हातात घेणारा,

सोबत तुझी हवीच म्हणणारा,

तो पहिला पाऊस होता……

-सुसिमा .

https://susima.home.blog/2019/04/14/तो-पहिला-पाऊस-होता/

स्त्री जन्मा हि तुझी कहाणी…

‘स्त्री’ परमेश्वरानं निर्माण केलेली अप्रतिम आणि सुंदर कलाकृती. तिच्याविषयी किती लिहावं आणि किती नको हाही मोठा यक्षप्रश्नच आहे??? तीच आई , तीच पत्नी, तीच बहीण, तीच सखी, तीच मैत्रीण, तीच संसाराचं चाक, तीच अर्धांगिनी आणि तीच सहधर्मचारिणी…. असं असतानाही हा समाज, हि कुटुंबव्यवस्था तिला कोंडमारा करून मारण्याचा प्रयत्न करते, चूल आणि मूल या रिंगणात तिला नाचवते. पूर्वीच्या काळी परिस्थिती बिकट होती, तीच जगण म्हणजे क्षणोक्षणी मरण असायचं, तिला शिक्षणाचा हक्क नव्हता, सतीप्रथा होती, तिला घरात, समाजात कोणतंच स्थान नव्हतं..तिला मान वर करून बघण्याचा देखील अधिकार नव्हता..त्या पुरुषप्रधान संस्कृतीत तिला एक उपभोगाच साधन यापलीकडे काहीच किंमत नव्हती पर्यायाने ती सुरक्षित नव्हती.

आता मनात विचार येतो कि आज तरी स्त्री सुरक्षित आहे का??तर प्रश्नाचं उत्तर मी तरी नाही असेच देईन..कारण आपण नाण्याची एक बाजू पहा, आज स्त्रियांनी कित्येक क्षेत्रे पादाक्रांत करत अवकाशात झेप घेतली आहे… महिला आज राष्ट्रपती झाल्यात, डॉक्टर झाल्या, इंजिनीअर आहेत, शिक्षिका आहेत, अंतराळवीर झाल्या , कलेक्टर झाल्या, पायलट झाल्या एवढंच नव्हे तर जगातील प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला तोही सर्व संकटावर जिद्दीने मात करून. अशी जरी नाण्याची एक बाजू असेल तरी दुसरी बाजू खूप दयनीय आणि खूप साकल्याने विचार करण्यासारखी आहे. आज स्त्री मुक्ती वर भाषण केली जातात, रॅली काढल्या जातात, व्याखान दिली जातात पण तरीही आजची स्त्री स्वतंत्र आहे का?? आज समाजात तिचे स्थान सुरक्षित नाही…’पिता रक्षते: कौमार्य, पती रक्षते: यौवन , पुत्र रक्षते: वार्धक्य’ असे म्हणले जाते.

आज सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या अथक परिश्रमाने आज स्त्रियांना शिक्षणाचा मूलभूत हक्क प्राप्त झाला. कुमारवयापर्यंत तिला चांगले सांभाळून तिचे शिक्षण पूर्ण करून विवाह करण्याची जबाबदारी हि वडिलांकडून पार पाडली जाते..तोपर्यंत वडीलच तिची सर्व जबाबदारी घेतात, पण जेव्हा ती विवाहाच्या बोहल्यावर चढते तेंव्हा ती तिच्या पतीची जबाबदारी बनते.पण लग्न झाल्यावर सासरच्या माणसाकडून तिला कशी वागणूक दिली जाते, त्यावरच तीच संपूर्ण तारुण्य अवलंबून असते.. आज आपण समाजात पाहतो कि कित्येक हुंडाबळी आजही जात आहेत, कित्येक विवाहिता सुशिक्षित असूनही त्यांना घरात कसलच स्थान नसत, तिचा काही ना काही कारणावरून सतत शारीरिक व मानसिक छळ केला जातो, तिचा कोंडमारा होतो, तिला लवकर स्वीकारलं जात नाही, तिचे पंख छाटून तिला उडायला सांगितलं जातं. घरात सासू पटवून घेत नाही, एक स्त्रीच एका स्त्रीची शत्रू बनते, तिच्या आईवडिलांना वेठीस धरले जातं, असा तोंड दाबून बुक्क्यांचा मार सुरु होतो. जेंव्हा सासरचे लोक तिचा छळ करतात आणि त्याचवेळी जर तिचा नवरा तिच्या बरोबर नसेल तर त्यासारखे मोठे दुःख नाही. त्यावेळी तिचे हाल कुत्रे हि खात नाही. तीचं जगणंच अवघड होऊन बसत..आजही स्त्रीला,तिच्या शिक्षणाला सन्मान दिला जात नाही..तिला समजून घेतलं जातं नाही, सासुरवास केला जातो, तिच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी तिला संघर्ष करावा लागतो, सगळ्यांचा विरोध पत्करून ती सासरच्या उंबऱ्याबाहेर पडते, हे असे जरी असेल तरी अजून स्रीयांवरील अत्याचार कमी झाले नाहीत, समाजात तिचे स्थान सुरक्षित नाही, तिचा फायदा घेण्यासाठी हजारो लांडगे टपून बसलेले असतात. तिथेही ती त्यांचा प्रतिकार करू शकत नाही. आज कायद्याने स्त्रीला सर्व संरक्षण दिले असले तरी स्त्री त्याचा आधारही ती घेऊ शकत नाही. हा सगळा प्रकार पाहता आज समाजात सर्व स्तरात मुलगी नको अशी मानसिकता तयार झाली तर त्यात नवल ते काय?? मुलगी ला जन्म देऊन, तिला मोठं करून शिक्षण देऊन तिला स्वावलंबी बनवून जर अशी तिची अवस्था असेल तर तिचा जन्मच नकोस वाटतो. आज गोठ्यात गाय जन्माला आली तर आनंद साजरा करतात, अंड्यातून कोंबडी बाहेर आली तर देव पावला म्हणतात, मग मुलगीचा जन्म नको का?? पूर्वी जात्यावर दळण दळणाऱ्या आणि ‘स्त्री जन्म म्हणुनी न व्हावे उदास’ असं सांगणाऱ्या संत जनाबाईपासून ते ‘स्त्री पुरुष तुलना’ लिहणाऱ्या ताराबाई शिंदे पर्यंत प्रगल्भ आणि परिपक्व विचारांचा वारसा आपल्या भारतीय समाजाला लाभला आहे, आज विचार केला की समाजात स्वतःच स्थान निर्माण करणाऱ्या कित्येक स्त्रियांना खूप वाईट वागणूक त्यांच्या घरच्या लोकांनी दिली यामध्ये सिंधुताई सपकाळ यांचं जिवंत उदाहरण देता येईल. यमुची कादंबरी लिहणाऱ्या ‘ह. ना. आपटे नि स्त्री च्या केल्या जाणाऱ्या विदारक छळाच वर्णन त्यांच्या कादंबरीत खूप आत्मीयतेने केलं आहे, तसेच ‘चितेवरच्या कळ्या’ या कादंबरीत वसंत गायकवाड यांनीही स्त्रीच अत्यंत वाईटपणाने मिळणार मरणाच्या कहाण्या लिहल्या आहेत. समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या महिलांमध्ये मदर तेरेसा, पी.टी. उषा, लक्ष्मी स्वामिनाथन, प्रतिभाताई पाटील,कल्पना चावला, सुनिता विल्यम्स अशी खूप मोठी यादी यशस्वी स्त्रियांची तयार होईल…

“स्त्री जन्मा हि तुझी कहाणी

हृदयी अमृत नयनी पाणी”

असं म्हणलं जात..प्रत्येक स्त्रीची अशी एक कहाणी आहे ज्यामध्ये प्रचंड दुःख , वेदना आणि एक आर्त किंकाळी आहे, जी फक्त मनातल्या मनात आहे, ती तडफडत आहे , घुसमटत आहे मनातल्या मनात, तिची ती आर्त हाक कुणी ऐकायला हवी.

जुन्या काळातही अहिल्या, सीता , तारा, मंदोदरी , सावित्री , मीरा ..अशा स्त्रियांची उदाहरणे दिली जातात, आजच्या काळात स्त्री जर खऱ्या अर्थाने स्वतंत्र बनवायची असेल तर तिला कौटुंबिक,सामाजिक सर्वच स्तरात मानाचं स्थान मिळायला हवे.तिच्यावर अन्याय करणारांना कठोर शिक्षा मिळायला हवी. संसाराचं एक चाक म्हणून तिला जपायला हवं, समजून घ्यायला हवं, पर्यायानं तिच्यावर होणारे अत्याचार थांबायला हवेत, तरच मुलगी हवी अशी समाजाची मानसिकता तयार होईल.

स्त्री ही वात्सल्याचा अखंड वाहता झरा आहे तो अखंड वाहतच राहील, फक्त त्याचा आनंद आपल्याला घेता यायला हवा.’जिच्या हाती पाळण्याची दोरी ती सर्व जगाते उद्धारी’ असेही तिच्या आदरासाठी म्हणले जाते. तिला न्याय द्यायला हवा, एक मैत्रिण, एक सखी, एक बहीण, एक अर्धांगिनी वाचवायला हवी…तरच समाधान नांदेल..आणि सावित्रीचा वसा जपला जाईल, सीतेला न्याय मिळेल मीरेला मान मिळेल आणि अहिल्येचा उद्धार होईल……

_सुसिमा .

https://susima.home.blog/2019/04/12/स्त्री-जन्मा-हि-तुझी-कहाणी/

रे जीवना

घेशील किती रे जीवना परीक्षा,

पापाची कुठल्या आहे हि शिक्षा??

नाही सोडत पाठ वेदना हि मनाची,

बरसतो कहर मिळते जेंव्हा जखम तनाची.

वाटते राहिले किती उन्हाळे डोईवर?

असे यातच अपार संकटांचा कहर.

रात्रीलाही आता नाही लागत डोळा,

सांग माझ्या नशिबी आहेत का चांगल्या वेळा??

वाईट विचारांचं सतत होतय अपचन,

आलबेल होईल माझ्याशी सगळं दे मला वचन.

नको करू रे जीवना मिजास घे माघार आता,

नाही हरणार तुझ्यापुढे तोच माझा त्राता.

चंद्र भाकरीचा कष्टानेच मिळवीन,

तुझ्या या संकटाना जिद्दीनेच नमविन.

नको बघू माझा अंत आता तू,

फिनिक्सप्रमाणे झेप घेईन पाहशीलच तू.

-सुसिमा .

https://susima.home.blog/2019/04/11/रे-जीवना/

गुढी पाडवा

हिंदू मराठी नववर्षाचा प्रारंभ म्हणजे , चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात ‘गुढी पाडवा’. असं म्हणल जात कि हजारो वर्षांपूर्वी राम रावणाचा पराभव करून वनवासातून परत आल्यावर त्याचे स्वागत, तो आल्याचा आनंद म्हणून प्रत्येकाच्या दारात गुढी उभारून ‘गुढी पाडवा’ हा सण साजरा केला जातो.

निसर्ग सौंदर्यांने नटलेला असतो, सगळ्या निसर्गात चैतन्य फुललेले असते, सर्व झाडांना पालवी फुटलेली असते, वसंत ऋतूच्या आगमनाने सृष्टी प्रफुल्लित झालेली असते, बहरून आलेलं ते निसर्गाचं रूप गुढी पाडव्याच्या सणाने अजूनच रम्य होते, ती थंड पहाट, तो पक्षांचा किलबिलाट ते कोकिळेचे कूजन हा अनुभवच हवाहवासा वाटणारा आहे….

गुढीला नवी साडी, साखरेची माळ, ते कडूलिंबाचे पान त्याचा तो मान, तो कलश ती फुलांची माळ, ती काठी, ती उंच उभारली जाणारी गुढी हे विजयाचेच प्रतीक मानले जाते. हे मराठी नववर्ष सर्वाना सुखाचे, समाधानाचे ,आरोग्याचे आणि आनंदाचे जावे, जुने दुरावे आणि रुसवे फुगवे विसरून एक नवी सुरुवात अगदी निसर्गप्रमाणेच आपणही करण्यासाठी हि एक छान वेळ आहे. हा एक असा सण आहे की जो चैतन्य घेऊन येतो आणि मरगळहि दूर करतो, उत्साहाला उधाण आणणारा ‘गुढी पाडवा’ हा सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात खूप सुखसमृद्धी आणि भरभराट घेऊन येवो. हि ईश्वराला प्रार्थना…

सुसिमा

https://susima.home.blog/2019/04/05/गुढी-पाडवा/

दिवस उन्हाळ्याचे

‘ऋतू हिरवा, ऋतू बरवा’ असं पावसा ळ्याबद्दल म्हणलं जात…पण रखरखते ऊन, त्या उष्ण झळा, दूरवर दिसणारे ओसाड माळ त्यावरील मृगजळ, खुप उकाडा आणि जीवाची काहिली घेऊन येतो तो उन्हाळा. त्यामध्ये जागतिक तापमान वाढीमुळे सततची होणारी तापमान वाढ यामुळे उन्हाळ्याचे दिवस त्रासदायक होत आहेत. पण ही झाली नाण्याची एक बाजू.

शिशिरातली पानगळ संपते आणि एक चैतन्यामयी सोनेरी पहाट घेऊन उन्हाळा सुरु होतो. सर्व सृष्टी बहरते, नटते. रुक्ष वाटणाऱ्या झाडांना पालवी फुटते, आंबा मोहराने फुलून जातो, पळस लालेलाल होतो, गुलमोहराचे फुलणे तर पाहत राहावंसे वाटते, काजू-फणसाची झाडे फळांनी लकडून जातात, चाफा तर वेड्यासारखा बहरतो त्याचे पान कुठे दिसतच नाही, चिंचानी झाडे भरून जातात, तू रातराणी व केवडाही फुलून जातो त्याचा तो धुंद करणारा सुवास सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो, करवंदीच्या जाळ्या पांढऱ्या फुलांच्या नक्षीने भरून जातात, अगदी कडुनिंब सुद्धा फुलून जातो , त्या फुलांचा धुंद करणारा सुगंध….या वेळी या झाडांना पाणी घातले तर सुटणारा मातीचा मृदगंध या सगळ्याची मजा काही औरच असते.

होळीत थंडी जळून जाते आणि उन्हाळा खऱ्या अर्थाने सुरु होतो, पर्यायाने उन्हाच्या झळा लागतात, अशा वेळी जर एखाद्या वडाच्या झाडाखाली उभे राहिलो तर मिळणारा गारवा ती हलकीशी वाऱ्याची झुळूक हि स्वर्गसुख देऊन जाते नाही का?? ऊन रखरखत असलं तरी अशा उन्हाळ्यात कैरीचं पन्ह, कोकम सरबत, लिंबु सरबत, जिरा ताक, लस्सी, उसाचा रस, माठातलं वाळा घातलेलं, आत्मा तृप्त करणार थंड पाणी, द्राक्ष, करवंद, जांभूळ, टरबूज, कलिंगड अशा रसदार फळांचा आस्वाद, पोहायला जाणे आणि शिकणे याचा आनंद फक्त आपण उन्हाळ्यातच घेऊ शकतो… मुलांच्या परीक्षाही संपलेल्या असतात मे महिन्यात त्यामुळे मुले मामाच्या गावी जायला आतूर असतात, मामाच्या गावाशी नाते जोडून ठेवणारा आणि त्यामुळे सासुरवाशिणीना हा मे महिना हवाहवासा वाटतो. त्यातच पर्वणी म्हणजे चैत्र महिन्याची सुरुवात ‘गुढी पाडवा’ हा मराठी नववर्षाची सुरुवात करून देणारा हिंदूंचा महत्वाचा सण, हा सण ऋतूला एक वेगळंच महत्व प्राप्त करून देतो.

उन्हाळा ऋतूतील आणखी एक छान गोष्ट म्हणजे , वसंत ऋतू चालू झाल्याने निसर्गात खाद्य मोठया प्रमाणात उपलब्ध होत असल्याने पक्षांचा विणीचा हंगाम सुरू होतो. पक्षांचे ते एकमेकास साद घालणे मन तृप्त करून जाते..कोकिळा सुरेल आवाजात गाते तिची सुंदर तान या ऋतुतच ऐकायला मिळते. दिवस उजाडताच थोड्या थंड वातावरणात पहाटेपासून होणारी पक्षांची किलबिल मनाला एक वेगळा उत्साह देते.. जगण्यास उभारी देते.

दिसताना हा उन्हाळा खूप रखरखता वाटत असला तरी खूप बहरणारा, सृष्टी फुलवणारा, नटणारा ,सुगंध दाही दिशांत उधळणारा आणि पुढे येणाऱ्या पावसाळ्याची चाहूल देणारा आहे….त्यामुळं हा उन्हाळा हवाहवासा वाटणारा असाच आहे….

– सुसिमा .