बहर वसंताचा

संपली पानगळ शिशीरातली,

जाणार संपून रुक्षपणा आता,

करुनि कोकिळा कूजन, गायन

उभी स्वागतास वसंत येता.

कोवळी पालवी वृक्षा फुटे,

आंबा मोहोर घेऊनि फुले,

गुलमोहरही बहरून गेला,

शालू हिरवा धरित्री नेसे.

प्रवास दिशेने वसंत ऋतूच्या,

चैतन्यपूर्ण वरदान असे,

संपून जाता उदासपणा,

सृष्टी प्रफुल्लित होत असे.

साद घालतो सखा सखीला,

हंगाम विणीचा सुरु होत असे,

पक्षी सुरेल गायन करुनि,

हाक सख्या ते देत असे.

असेल कितीही ऊन चैत्राचे,

थंड गारवा लाभत असे,

वातावरणही फुलून गेले,

किमया हि विधात्याची असे.

– सुसिमा .

https://susima.home.blog/2019/03/25/बहर-वसंताचा/

होळी

करुनिया रंगांची उधळण, विविधतेचे रंग लेउनी,

दुःख विसरून आपले होळी, जाईल षड्रिपू घेउनी.

हिरवा देई खूप गारवा, पांढरा शांततेत असे,

केशरी हा त्याग सांगतो, होळी विकारांची असे.

सप्तरंग हे उधळून देऊ , संदेश सुखाचा देत असे,

विसरण्या ते रुसवे,फुगवे ,कौल मनाचा हवा असे.

दहन करूया लोभ, क्रोध ते, दारिद्र्य नाहीसे होत असे,

निराशा हि विरून जाईल, नवी उषा मग वाट बघे.

होळी पवित्र सण हा आला, रंग जरा उधळून पहा,

दूर फेकून आळस आपुला, कष्टाची हि कास धरा.

सप्तरंग हे उधळून देऊ, मोद साजरा करू जरा,

नष्ट करून सर्व विकारा प्रेमाचा हा सूर धरा.

राधाचा घेऊनि रंग, पिचकारी कान्हाची,

साजरी करू आपण होळी, गुंफण मनामनांची.

-सुसिमा .

दुधारी शस्त्र : मोबाईल

म्हणतात ना!काळ बदलत चालला आहे…

हे आजकालच्या किशोर, कुमार, युवा आणि वृद्ध लोकांकडे पाहून लक्षात येते. सध्याचे युग हे धावपळीचे, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे पर्यायाने संगणक आणि मोबाईलचे झाले आहे. यामध्येच विचार करण्यासारखा चिंतेचा विषय म्हणजे मोबाईलचा वाढता वापर. आपल्या आजूबाजूला आपण पाहिले तर प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन दिसत आहे. अगदी चार पाच महिन्याच्या बाळापासून ते वृद्ध लोकापर्यंत सर्व माणसे मोबाईलचा नको तितका वापर करताना दिसतात. पण ‘अति सर्वत्र वर्ज्यते’ या न्यायाने त्याच्या वापराची प्रचिती आल्यावाचून राहत नाही.

चार-पाच महिन्याची मुले इकडे तिकडे पहायला लागली की, ती रडू नयेत म्हणून, खाऊ खावा म्हणून मोबाईल नावाचं खेळणं त्यांच्या हाती दिल जात, त्यामुळे ती मूले तासनतास मोबाईल पाहत राहतात. स्वतःची कामे उरकवीत, मुले पळापळ करतात, रडतात, जेवत नाहीत अशा खूप कारणाने मोबाईल त्याना दिला जातो. मग याचा परिणाम ती सतत व्हिडिओ पाहत राहतात. यामुळे मुलांच्या मेंदूवर आणि डोळ्यांवर विपरीत परिणाम होतो. माझ्या चुलत काकांचा मुलगा मोबाईल पाहतो म्हणून त्याला दहा हजार रुपयांचा स्मार्ट फोन घेऊन दिला, सतत मोबाईल पाहून त्याचे डोळे खराब झाले. त्याला प्रत्येक वस्तू दोन दोन दिसू लागल्या. मी माझ्या मावशीच्या अंगणवाडीत गेले तिथे एका चार वर्षाच्या मुलीला मोबाईल ची सवय लागून तिचे मानसिक संतुलन बिघडले. अशी कित्येक उदाहरणे आहेत. आज मोबाईल मूळे रस्त्यावर देखील किती अपघात होऊन लोक आपले जीव गमावत आहेत.

‘बालपणीचा काळ सुखाचा’ असं म्हणल जात पण हे सर्व पाहून आपल्या उद्याच्या भावी पिढीचे सतत च्या मोबाईल वापराने काय होईल???याची गांभीर्यानं दखल घेणे गरजेचे वाटते. टीव्ही ,मोबाईल ,संगणक यांच्या वाढत्या वापराने आज खूप लहान वयात मुलांना चष्मे लागले आहेत. तरुण मूल हि व्हाट्स अप,फेसबुक ,यु ट्यूब ,इंटरनेट यांचा खूप वापर आणि गैरवापर हि करत आहेत.

मैदानी खेळ,व्यायाम,चित्रकला,वाचन असे छंद मोकळ्या वेळेत जोपासायचे सोडून ती फक्त मोबाईल वापरताना दिसतात. मोबाईल वापरला पाहिजे,पण तो ठराविक वेळ आणि योग्य कामासाठी…..पण आज ते व्यसन झाले आहे. नात्यातील संवाद हरवत चालला आहे. जग मोबाईलमूळे जवळ आलं असून माणसं दुरावली आहेत.

त्यामुळे आपल्या देशाची भावी पिढी धोक्यात आली आहे. या गोष्टीची जाणीव सर्व पालकांना व्हायला हवी. नाहीतर अनर्थ होईल. मोबाईल हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा वापर मर्यादेने आणि योग्य कामासाठी केला तर खूप छान आणि गैरवापर केला तर आयुष्य उद्धवस्त होतील. त्यासाठी लहानपनापासून मोबाईलची सवय लावू नये, लागल्यास बंद करावी. इतर मैदानी खेळ, छंदवर्ग, खेळणी, वाचन, क्राफ्ट यांत मुलांचे मन वळवावे, मुलांना प्रथम प्राधान्य द्यावे. काम दुय्यम ठेवावे. तर आणि तरच आपली भावी पिढी सुसंस्कृत, निरोगी, सुदृढ, आदर्श आणि चांगली निर्माण होईल…त्यासाठी आपण सर्वानीच प्रयत्न करायला हवेत… ‘Try is our best God’.

-सुसिमा थोरात.

मोबाईल नं.- 8857804388