बहर वसंताचा

संपली पानगळ शिशीरातली,

जाणार संपून रुक्षपणा आता,

करुनि कोकिळा कूजन, गायन

उभी स्वागतास वसंत येता.

कोवळी पालवी वृक्षा फुटे,

आंबा मोहोर घेऊनि फुले,

गुलमोहरही बहरून गेला,

शालू हिरवा धरित्री नेसे.

प्रवास दिशेने वसंत ऋतूच्या,

चैतन्यपूर्ण वरदान असे,

संपून जाता उदासपणा,

सृष्टी प्रफुल्लित होत असे.

साद घालतो सखा सखीला,

हंगाम विणीचा सुरु होत असे,

पक्षी सुरेल गायन करुनि,

हाक सख्या ते देत असे.

असेल कितीही ऊन चैत्राचे,

थंड गारवा लाभत असे,

वातावरणही फुलून गेले,

किमया हि विधात्याची असे.

– सुसिमा .

https://susima.home.blog/2019/03/25/बहर-वसंताचा/

मी आहे बरोबर…..!

असं म्हणल जात, ‘क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणांचा’.

माणूस म्हणलं कि अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण याबरोबरच प्रेम, आपुलकी, जिव्हाळा या सर्व गोष्टी हि जगण्यासाठी हव्याच नाही का???

आपण आपल्या आजूबाजूला पाहील तर आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी, आपल्यावर विश्वास ठेवणारी, आपल्याला सुखदुःखात सोबत करणारी, आपल्याला जपणारी माणसं आपल्याला हवीहवीशी वाटतात. अशी माणसं मिळायलाही भाग्य थोर असायला हवे.

या जगाच्या बाजारात जो तो अशा व्यक्तीच्या शोधात असतो. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जो सोबत करेल, विश्वासाने आपल्या खांद्यावर हात ठेवेल, दुःखात आपल्या पाठीवरून हात फिरवून म्हणेल, ‘मी आहे बरोबर…’ हे शब्द माणसाच्या मनात प्रेरणा निर्माण करतात. मग ती व्यक्ती कितीही मोठ्या संकटात असेल तर बाहेर पडते. आपल्या मनातील दुःखाचा वणवा आपलं मन त्या व्यक्तीजवळ मोकळं केल्याने त्या आपुलकीच्या चार शब्दांनी विझून जातो. मनातील शल्य जाणून घेऊन ती आपल्याला खूप उसंत देत असते. जास्तीत जास्त सांगायचं झालं तर असं नातं मैत्रीचंच असत नाही का?? मित्र हि आपल्या आयुष्यातील एक गार हिरवळ असते…सदा सुख देणारी. मैत्रीचं नात निस्वार्थी, प्रेमळ आणि ऋणानुबंधाच असत. ज्याला ते मिळालं तो खरच नशीबवान!!

नातं कोणतंही असो जोडीदाराच अथवा मैत्रीचं तिथं प्रेम , विश्वास ,त्याग असायलाच हवा. नाहीतर आजकाल नवरा बायको असूनही लोक फक्त जगासाठी एकमेकांबरोबर राहतात,तिथं प्रेम ,विश्वास , आपुलकी पहायला मिळत नाही, फक्त हेवेदावे आणि मत्सर असतो. जगाला ते खूप गोड दिसत ते सगळं. अशी तडा गेलेली नाती कधीच सुख देऊ शकत नाहीत. तिथे दुरावा हा राहतोच…

पण प्रत्येकाला असा छान मित्र तरी असायला हवा, जो आपल्या आयुष्याच तारू मोठ्या वादळातून, संकटातून बाहेर काढेल आणि प्रत्येक क्षणाला आपल्याला जाणीव करून देईल, ‘भिऊ नकोस,”मी आहे बरोबर….”‘..अगदी आयुष्यभरासाठी. मग माणसाला कशाचेच भय राहत नाही. मोठ्यात मोठ्या संकटाला तो सहज तोंड देतो.

आपणही कुणाच्यातरी आयुष्यात अशी व्यक्ती व्हावं असे भाग्य लाभलं तर त्याहून चांगलं नशीब आणि पुण्यही नाही. एखाद्याला आधार देणे, त्याला उभा करणं, साथ देण हि सोपी गोष्ट नाही. त्यासाठी त्याग हा हवाच.. या तीन शब्दाच्या आधारामुळे कित्येक शिखरे पादाक्रांत होऊ शकतात. म्हणूनच आपल्या जवळच्या व्यक्तीला प्रेम द्या ,आधार द्या, विश्वास द्या ‘तू हे करू शकतोस..’, ‘तू हे करू शकतेस..’जेणेकरून ती यशस्वी होईल. सुखात ती तुम्हाला आठवेल, दुःखात मात्र तुमच्या खांद्यावर डोकं ठेऊन हमसून रडता येईल, आपलं दुःख हलकं करता येईन असे मित्र बना..असा सोबती बना… असे झाल्यास ती व्यक्ती नक्कीच आयुष्यात उत्तुंग यश मिळवेल. ज्याचा तुम्हाला अभिमान वाटेल म्हणून साथ द्या, सुख द्या , दुःख हलकं करा, पाठीवर विश्वासाचा हात फिरवा, नातं निभावा व प्रत्येक पडत्या क्षणी त्या व्यक्तीला सावरा, योग्य मार्ग दाखवा आणि म्हणा…..

‘मी आहे बरोबर….’

-सुसिमा .

होळी

करुनिया रंगांची उधळण, विविधतेचे रंग लेउनी,

दुःख विसरून आपले होळी, जाईल षड्रिपू घेउनी.

हिरवा देई खूप गारवा, पांढरा शांततेत असे,

केशरी हा त्याग सांगतो, होळी विकारांची असे.

सप्तरंग हे उधळून देऊ , संदेश सुखाचा देत असे,

विसरण्या ते रुसवे,फुगवे ,कौल मनाचा हवा असे.

दहन करूया लोभ, क्रोध ते, दारिद्र्य नाहीसे होत असे,

निराशा हि विरून जाईल, नवी उषा मग वाट बघे.

होळी पवित्र सण हा आला, रंग जरा उधळून पहा,

दूर फेकून आळस आपुला, कष्टाची हि कास धरा.

सप्तरंग हे उधळून देऊ, मोद साजरा करू जरा,

नष्ट करून सर्व विकारा प्रेमाचा हा सूर धरा.

राधाचा घेऊनि रंग, पिचकारी कान्हाची,

साजरी करू आपण होळी, गुंफण मनामनांची.

-सुसिमा .

दुधारी शस्त्र : मोबाईल

म्हणतात ना!काळ बदलत चालला आहे…

हे आजकालच्या किशोर, कुमार, युवा आणि वृद्ध लोकांकडे पाहून लक्षात येते. सध्याचे युग हे धावपळीचे, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे पर्यायाने संगणक आणि मोबाईलचे झाले आहे. यामध्येच विचार करण्यासारखा चिंतेचा विषय म्हणजे मोबाईलचा वाढता वापर. आपल्या आजूबाजूला आपण पाहिले तर प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन दिसत आहे. अगदी चार पाच महिन्याच्या बाळापासून ते वृद्ध लोकापर्यंत सर्व माणसे मोबाईलचा नको तितका वापर करताना दिसतात. पण ‘अति सर्वत्र वर्ज्यते’ या न्यायाने त्याच्या वापराची प्रचिती आल्यावाचून राहत नाही.

चार-पाच महिन्याची मुले इकडे तिकडे पहायला लागली की, ती रडू नयेत म्हणून, खाऊ खावा म्हणून मोबाईल नावाचं खेळणं त्यांच्या हाती दिल जात, त्यामुळे ती मूले तासनतास मोबाईल पाहत राहतात. स्वतःची कामे उरकवीत, मुले पळापळ करतात, रडतात, जेवत नाहीत अशा खूप कारणाने मोबाईल त्याना दिला जातो. मग याचा परिणाम ती सतत व्हिडिओ पाहत राहतात. यामुळे मुलांच्या मेंदूवर आणि डोळ्यांवर विपरीत परिणाम होतो. माझ्या चुलत काकांचा मुलगा मोबाईल पाहतो म्हणून त्याला दहा हजार रुपयांचा स्मार्ट फोन घेऊन दिला, सतत मोबाईल पाहून त्याचे डोळे खराब झाले. त्याला प्रत्येक वस्तू दोन दोन दिसू लागल्या. मी माझ्या मावशीच्या अंगणवाडीत गेले तिथे एका चार वर्षाच्या मुलीला मोबाईल ची सवय लागून तिचे मानसिक संतुलन बिघडले. अशी कित्येक उदाहरणे आहेत. आज मोबाईल मूळे रस्त्यावर देखील किती अपघात होऊन लोक आपले जीव गमावत आहेत.

‘बालपणीचा काळ सुखाचा’ असं म्हणल जात पण हे सर्व पाहून आपल्या उद्याच्या भावी पिढीचे सतत च्या मोबाईल वापराने काय होईल???याची गांभीर्यानं दखल घेणे गरजेचे वाटते. टीव्ही ,मोबाईल ,संगणक यांच्या वाढत्या वापराने आज खूप लहान वयात मुलांना चष्मे लागले आहेत. तरुण मूल हि व्हाट्स अप,फेसबुक ,यु ट्यूब ,इंटरनेट यांचा खूप वापर आणि गैरवापर हि करत आहेत.

मैदानी खेळ,व्यायाम,चित्रकला,वाचन असे छंद मोकळ्या वेळेत जोपासायचे सोडून ती फक्त मोबाईल वापरताना दिसतात. मोबाईल वापरला पाहिजे,पण तो ठराविक वेळ आणि योग्य कामासाठी…..पण आज ते व्यसन झाले आहे. नात्यातील संवाद हरवत चालला आहे. जग मोबाईलमूळे जवळ आलं असून माणसं दुरावली आहेत.

त्यामुळे आपल्या देशाची भावी पिढी धोक्यात आली आहे. या गोष्टीची जाणीव सर्व पालकांना व्हायला हवी. नाहीतर अनर्थ होईल. मोबाईल हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा वापर मर्यादेने आणि योग्य कामासाठी केला तर खूप छान आणि गैरवापर केला तर आयुष्य उद्धवस्त होतील. त्यासाठी लहानपनापासून मोबाईलची सवय लावू नये, लागल्यास बंद करावी. इतर मैदानी खेळ, छंदवर्ग, खेळणी, वाचन, क्राफ्ट यांत मुलांचे मन वळवावे, मुलांना प्रथम प्राधान्य द्यावे. काम दुय्यम ठेवावे. तर आणि तरच आपली भावी पिढी सुसंस्कृत, निरोगी, सुदृढ, आदर्श आणि चांगली निर्माण होईल…त्यासाठी आपण सर्वानीच प्रयत्न करायला हवेत… ‘Try is our best God’.

-सुसिमा थोरात.

मोबाईल नं.- 8857804388

बेरोजगार शिक्षकाची व्यथा

अभ्यास करून, वाट पाहुन थकले डोळे,

बेरोजगारीच्या आगीत शिक्षक आजचा होरपळे.

विचारते आई बाळा ,लागेल कधी नोकरी?

आहे ना नशिबी तुझ्या सुखाची भाजी भाकरी?

शेती काही पिकेना,नाही पडतं पाऊस,

मन मारून शिकवले तुला नाही केली हौस.

TET नंतर CET झालो, पास झालो परीक्षा,

तरीही नव्हती भरती नुसतीच माझी प्रतीक्षा.

नऊ वर्षांनी निघाली भरती आनंद मावेना गगनात,

होईल माझे स्वप्न पूर्ण हि आस होती उरात.

उजाडला तो दिवस निघणार होती जाहिरात,

हुरहुर असून थोडी मन नाचत होत आनंदात.

पाहिल्यावर क्षणात सार संपलं जाणीव हि झाली,

जागाच नव्हत्या जाहिरातीत नुसतीच जाहिरात आली.

त्याच क्षणी कोसळला स्वप्नांचा किल्ला,

कायमस्वरूपी मिळणार वाटलं बेरोजगरीचा बिल्ला.

माय म्हणते बाळा होईल पूर्ण मनोरथ,

सांगू कसं तिला काळीज माझं करपत.

घास ताटातील उतरत नाही घशात,

नुसताच जगत असतो नाही प्राण कशात.

वाटत अचानक चमत्कार व्हावा जगी,

व्हावे साकार स्वप्न मायबापाचे प्रार्थना हि मनोमनी.

-सुसिमा .

नारीशक्ती

घडवलेली विधात्याने एक अप्रतिम कलाकृती,

असे स्त्री शक्ती तीच नारीची आकृती.

घेऊन आसमंत कवेत ठेवी पाय अंतराळात,

ओलांडून सारी क्षितीजे ती आहे पोहोचली नभात.

दिला वसा जो सावित्रीने ती पेलतेय नेटाने,

ठेवूनी जाण मांगल्याची टाकतेय पाऊल बेताने.

काही नको असे तिला आदर मात्र हवा,

एक आधाराचा हात फिरायला पाठीवरून हवा.

तीच रणरागिणी, दुर्गा,भवानी तीच असे,

तिच्यावाचून जगच थांबेल पर्याय तिला नसे.

आदिशक्तीचे रूप तीच,गृहलक्ष्मी ही तीच असे,

सर्व क्षेत्रात धुरा फक्त तिच सांभाळत असे.

ज्ञानाची बहीन तीच,रामाची सीता तीच असे,

सहधर्मचारिणीला न्याय मिळावा अपेक्षा हीच असे.

असो वा नसो आधार तिला स्वप्न मोठे असावे उरात,

मिळेल अजून संधी तर जग करेल पादाक्रांत.

– सुसिमा