“स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी”
आईविना जगणाऱ्या पोरक्या लोकांचं विदारक वर्णन कवी यशवंत यांनी खूप यथार्थपणे आपल्या कवितेत मांडलं. आईविषयी किती लिहावं?आत्म्यातील ईश्वर असणारी ही तीच, निस्वार्थी, निर्मळ मनानं असंख्य वेदना सोसून स्वतःच्या जीवात जीव असेपर्यंत लेकराला आधार देणारी आई….
कवी फ.मु.शिंदे म्हणतात,
‘आई म्हणजे काय असत?
घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत.’
आई म्हणजे काय असते, दुधावरची साय असते, वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते, लेकराची माय असते….
आईविषयी खूप लिहलं गेलं… आईच नातं आहेही असंच. एक काळ होता ज्यावेळी श्यामची आई घडली, मॅक्सिम गऑर्कि ची आई झाली, त्या दोघींना शतशः नमन. साने गुरुजींनी खूप भाऊकतेने , हळुवारपणे आपल्या आईचे वर्णन श्यामची आई या पुस्तकात केले , अशी आई होणे विरळच.आपल्या मुलावर संस्कार करणारी, त्याला चांगले वळण लावावे म्हणून धडपडणारी, प्रसंगी कुंभारप्रमाणे वरून धपाटा घालून आत मायेचा आधार देणारी, मुलाच्या चुकांवर पांघरून न घालता, त्याला परखडपणे सूनवणारी ‘श्यामची आई’. ‘मातृदेवोभव:’ असे आपली भारतीय संस्कृती आहे. प्रसंगी स्वतः उपाशी राहून आपल्या मुलांना जेवायला घालणारी आई, मुलांसाठी तनमन अर्पण करणारी आई, कोंड्याचा मांडा करून खायला शिकविणारी आई, पाटी पेन्सिल घेऊन ‘श्री गणेशा’ शिकविणारी आई…अशी किती रूप सांगावी आईची. आई म्हणजे परमेश्वराचा अवतारच!!!
‘स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकालची माता’
असं म्हणल जातं. आईची मुलगी , मैत्रीण, वडिलांची राजकुमारी, लग्न झालं की ती नवऱ्याची पत्नी बनते, प्रेयसी बनते, बहीण बनते, काळजी घेणारी आई बनते, सहधर्मचारिणी बनते, अर्धांगिनी बनते अशी कित्येक नाती ती एकावेळी निभावते. पण म्हणतात काळ बदलत चालला आहे , या बदलत्या काळाप्रमाणे आईचीही रूप बदलली तर त्यात नवल ते काय??? पर्यायाने आईचे प्राधान्यक्रम हि बदलले. खरच हि आई आहे का??कि कृत्रिम आई आहे याचा साकल्याने आणि प्रकर्षाने विचार करण्याची गरज वाटू लागली आहे.
मुलाला जन्म देणारी जन्मदात्री आज सुरवातीला आईपण नकोच म्हणतेय, नैसर्गिकरित्या मुलाचा जन्म नाकारतेय, आजची आई आईपण मिळवण्यासाठी वेदना सोसायला तयारच नाही, आयतच नावाचं मातृत्व तिच्या पदरात पडतंय. पुढची गोष्ट म्हणजे जन्म दिला सिझरीयन करून, तरी स्वतःच सौन्दर्य, फिगर आणि maintaince सांभाळण्यासाठी ती मुलाला दूधही पाजायला तयार नाहीये, मुलाला सांभाळायला हि तयार नाहीये.मुलाला संभाळण्यासाठी आया ठेवली जातेय, आजची आई मुलाच्या तोंडात दुधाची बाटली देऊन त्याला पाळणाघरात किंवा आयाच्या ताब्यात देऊन करियर करायला निघते.बाबा अगोदरच गेलेले असतात.अशी तंग कपडे घालून फिरणाऱ्या उथळ आईच आज आईपणच निसर्ग हिरावून घेतोय, तर त्यात नवल ते काय????
” बाळ म्हणत आई मला पदरात घे,
आईच्या टी शर्ट ला पदरच नाय….”
अशी आजच्या मुलाची अवस्था करून टाकली आहे, मोठे होऊन लग्न झाल्यावरही सुना बाळांना पोटच्या पोरीपेक्षा जास्त जपणारी, त्यांच्यावर आईपेक्षा जास्त माया करणारी आई एका बाजूला असते तर दुसरीकडं स्वतःच्या मुलाचे कान भरून, तिचा छळ करून,संसार मोडणारी, तिला शत्रू मानणारी आई असते.एकिकडे मुलींचा संसार सुखी व्हावा म्हणून मुलीला चार गोष्टी सूनावणारे आई बाबा असतात, तर दुसरीकडे मुलीच्या संसारात हस्तक्षेप करून सासरच्या गरीब माणसांना वेठीस धरणारी हि आईच.एकीकडे स्वतःचा मुलगा चुकला तरी त्याला च शिक्षा करणारी आई दुसरीकडे मुलाच्या चुकांवर पांघरून घालून इतरांना दोषी ठरवणारी आई…..अशी किती उदाहरणे द्यावी????
पुराणकाळात आईचे माहात्म्य खूप सांगितले आहे, मुलाला थोडं खरचटलं तरी काळीज पिळवटून जाणारी आई,…आज मुळात आई राहिलीच नाही, ती आता आधुनिक ‘मम्मी ,’मॉम’ झाली आहे,
‘आईची झाली मम्मी , बाबाचे झाले डॅड्डी,
कोण घडवणार आता पुढची पिढी???’
समाजाची आईविषयीची मानसिकता काळाबरोबरच बदलत चाललीय हेही खरच… मुलांसाठी सर्व सुखाचा त्याग करणारी आई हि आज फक्त आपल्या सोयीचा विचार करतेय, याला अपवाद काही आहेतही. पण वर मांडलेलं कटू आणि विदारक सत्य नाकारून चालणार नाही.आज मुलाच्या जखमेवर हळुवार फुंकर घालणारी, बाळाला चिऊ काऊ च्या गोष्टी सांगून दूध भात भरविणारी, मायेने संस्कार श्यामच्या आईप्रमाणे संस्कार घडविणारी, मुलाला कुशीत घेणारी, त्याला हाताला धरून पहिलं पाऊल स्वतंत्रपणे टाकायला शिकविणारी, जिजाऊप्रमाणे शिवबा घडविणारी आई, पैशांच्या मागे लोभी न बनता आहे त्यात धन्यता मानणारी, कोंड्याचा मांडा करून खायला शिकविणारी, ‘आई ‘ हरवत चालली आहे………
‘अंधार पडलाय एक पणती पाहिजे,
समाजाला घडविणारी जननी पाहिजे,
शिवबा घडविणारी जिजाऊ पाहिजे,
श्याम घडविणारी श्यामची आई पाहिजे’.
—-सुसिमा .









