*सफर जंगलाची…..*

हिरव्या हिरव्या रानात,

कापूस नाचतो,

पांढराशुभ्र ससुल्या,

टुणटूण उड्या मारतो.

             आकाशात जमले

             ढग काळे वर.

             पिसारा फुलवून,

             थुई  थुई नाचे मोर.

आंब्याच्या झाडावर

कुहुकुहू करते,

काळी कोकिळाताई,

गोड गळ्याने गाते.

           हिरव्या हिरव्या झाडावर

           पेरू फोडून खातो,

           पोपटराव आमचा,

           विठू विठू बोलतो.

सोंड हलवून अभिवादन

हत्ती दादा करे,

जंगलात असती,

त्याचे भलते तोरे.

        वाघोबाची स्वारी,

        डरकाळी फोडी,

        सारे हिरवे जंगल,

        दणाणून सोडी..

माडावर उंच उंच,

सरसर चढते वर,

पट्टेरी खारुताईला ,

आहे खूपच जोर..

      राजा जंगलचा सिंह,

      ऐटीत चालतो,

      गर्जनेने त्याच्या,

      साऱ्यांना घाबरवून सोडतो.

                                – सुसिमा थोरात.

                               23/07/2024

@All rights are reserved.

@Image source – Google.

*Overtake…*

आज रस्त्याला नेहमीसारखीच वर्दळ जास्त नव्हती,तरीही वाहने होतीच ….भरपूर पाऊस पडून गेल्याने, बऱ्याच ठिकाणी पाण्याची तळी साचली होती…. येणारी वाहने वेगात येत होती, जाणारी  काही वाहने वेगाने पुढे निघून जात होती… मी मात्र गाडी नेहमीच्या मीडियम स्पीड वर ठेवली होती..35- 40 स्पीड मध्ये मला एक रिलॅक्सपणा वाटत होता..मला घाई नव्हती कारण, रोज पाच- दहा मिनिटे लवकर निघायची सवय असल्याने,ती सवय मला गाडी चालवताना रिलॅक्स राहायला शिकवून गेली..

काही वेळा मागचे वाहन ओव्हरटेक करून जोरात पुढे जायचे.. काही वेळा एखादे वाहन राईट इंडिकेटर दाखऊन लेफ्टला अचानक वळायचे…. काही जण लेफ्ट इंडिकेटर देऊन लेफ्टला वळायच्या अगोदर राईटला जायचे…हा रोजचा अनुभव …या गोष्टीचे आश्चर्यही वाटायचे..तर काही वेळा घाई- घाईत काही लोक इंडिकेटर न देताच पटकन वळायचे….तर काही वेळा शेजारून येणारी एखादी गाडी खड्ड्यातून झपकन मातीचे लाल पाणी अंगावर उडवून जायची…. खड्डे आली की गाडीचा स्पीड पाच- दहा वर ठेवायला बरं वाटायचं.. खड्ड्यातून हळुवार जाताना कोणताही त्रास व्हायचा नाही..

आयुष्यात एखादी वेळ सोडता, फार वेळा काही गाडीवरून पडण्याचा प्रसंग आला नाही…. प्रत्यक्ष आयुष्य जगताना मात्र काही वेळा चूक नसताना, तर काही वेळा छोटी चूक झाली तरी खूप वेळा पडावं लागलं….माणसेही तशी भेटली, वाहने भेटतात अगदी तशी… काही वेळा राईट इंडिकेटर दाखवून लेफ्ट जाणारी… तर काही कारण नसताना अंगावर चिखल फेक करणारी….. नियतीने माझी कुठलीच चूक कधीच पदरात घेतली नव्हती..प्रत्येक चुकीची पुरेपूर शिक्षा मला दर वेळेस मिळत गेली.. even आताही ती मिळतच होती.. या सगळ्या ठेचा खाल्ल्यानंतर आता मला पुन्हा बिलकुल पडायचं नव्हतं….

आयुष्यात पडण दूरच, गाडी सुद्धा खूप काळजीपूर्वक मी चालवत होते.सावकाश ,विचारपूर्वक प्रत्येक पाऊल मी जपून टाकत होते. डोक्यावर हेल्मेट…. पावसासाठी रेनकोट… तशीच गाडीही चालवत होते…आता मला कसलीच घाई नव्हती ….कोणाच्या पुढेही जायचं नव्हतं.. कोणाला ओव्हरटेक करायचा नव्हतं …. अशा पद्धतीने राईट इंडिकेटर दाखवून लेफ्टला ही वळायचं नव्हतं, जेणेकरून मागची व्यक्ती फसेल..मागच्या आरशात जास्त वेळ पाहण  योग्य ठरणार नव्हत.. भूतकाळ फक्त एक मार्गदर्शन करण्यासाठी अनुभवाचं गाठोड होत. … एकदम सावकाश ,जाणीवपूर्वक खड्डे पाहून, प्रसंगी दुसरी गाडी जाईपर्यंत,थोडं थांबून, मला फक्त सुरक्षित ध्येयापर्यंत पोहोचायचं होतं….आयुष्य सुरक्षित जगायचं होतं…

घाई-गडबडीत काही चुकीचे निर्णय घेऊन, ते निस्तरण्याची ताकद आता माझ्यातही नव्हती.. आता मला प्रत्येक पाऊल सावधपणे टाकायचे होते…कोणाच्या पुढे जाण्याने किंवा कोणाच्या ओव्हरटेक करण्याने  मला काहीच फरक पडणार नव्हता.कोणाच्या पुढे जाण्याचे आणि कोणाच्या मागे राहण्यानचे मला कसलेच दुःख होणार नव्हते….आयुष्याचे ही तसेच काहीसे कोणी प्रगती करून पुढे गेले म्हणून ईर्षा वाटत नव्हती… आणि कोणी माझ्या मागे राहिले म्हणून त्या मागे राहण्याचा  असुरी आनंदही मला नव्हता….

मला आता फक्त माझे आयुष्य जगायचे होते ….शांतपणे…. निवांतपणे….कोणताही अपघात न होता अगदी शांत असलेला पाण्याचा प्रवाह छोटासा दगड टाकल्याने त्यावर जसे हळुवार तरंग उमटतात ना अगदी तसे… भरभरून जगायचे होते.. मोकळा श्वास घ्यायचा होता… तो रिलॅक्स ,निवांत ,मोकळा श्वास मला जगण्याचा आनंद मिळवून देईल, याची मला खात्री होती… कोणासाठी मला पॅनिक व्हायचे नव्हते..आणि कोणी आपल्यासाठी पॅनिक झाले तरी मला त्याचे सोयरे- सुतक नव्हते… आयुष्याने मला दिलेल्या खूप सगळ्या धड्यानंतर  मला मिळालेला हा खूप मोठा lesson  होता…आता मला या आयुष्याच्या प्रवासात आजूबाजूच्या निसर्गाचा आनंद घ्यायचा होता…

आपण आपला मार्ग सुरक्षितपणे, सावकाशपणे, विचारपूर्वक, सारासार विचार करून, मार्गक्रमण केल्यास आयुष्यात बरेच अपघात टाळता येतील…. इतरांशी तुलना करून , चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करून घाईत जाऊन,अपघात होण्यापेक्षा आपण आपल्या स्पीड मधे गेलो तर जास्त सुरक्षित ध्येयापर्यंत निश्चितच पोहोचू यात तीळ मात्र शंका नाही …

– सुसिमा थोरात.

19/07/2024

@All rights reserved.

@Image source – Google.

*जसं दिसत तसं नसत….*

उन्हाळ्याच्या दिवसात सायंकाळी सर्व मुले,गृहिणी,वयस्कर महिला सर्वचजणी सोसायटीच्या मैदानावर फिरायला बाहेर पडायच्या… मुले सायंकाळच्या मोकळ्या, छान वातावरणात खेळायला बाहेर पडायची..उन्ह कलंडलेली असायची तर थंड, मंद वारा वाहत राहायचा…त्या तिन्हीसांजेला मुले छान खेळायची… पावसाळ्यात त्यांना खेळायला मिळत नव्हते.वर्षभर परीक्षा,अभ्यास यातून ती मोकळी झाली होती.. मैदानावरती छान हुंदडत होती…सायकल फिरवत होती… लपाछपी, लगोरी,क्रिकेट असे अनेक खेळ उत्साहात रंगायचे…

महिला मंडळात मात्र evening walk ऐवजी एकमेकींबद्दलच्या चर्चेला, गॉसिपिंग ला जास्त उधाण यायचे …सायंकाळी गप्पा जास्त रंगायच्या….”ती दीक्षित बाई बघा, सकाळी- सकाळी काम धाम सोडून फिरायला जाते…रिकामीच असते ना!” आम्हाला काही कामातून जमतच नाही,morning walk वगैरे……” त्या राणे काकू बघा, घरातून बाहेर नाही.. सून मस्त नोकरीला जाते.. शर्ट- पॅन्ट घालून… या मात्र घराबाहेर नाही, कधी महिला मंडळाच्या कार्यक्रमाला नाही,..की कुठे फिरायला जमणार नाही…..” ती रमा बघा, सतत तोंडावर बारा वाजलेले, सगळं आहे नाहीतर कधी आनंदी नाही..” त्या जोशी बाई बघा, झेपत नाही तरी मुलीची मुले सांभाळत राहिल्या.. मुलगी सांभाळेल ना तिच्या तिच्या मुलांना.. !!” तुझे दागिने कसे.. माझे कसे… कपडे, दिसण… make up…अशा एक ना अनेक गप्पा- गोष्टी रंगायच्या…

थोड्या दिवसांनी काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या…दीक्षित बाईंना शुगर,गुडघेदुखी, बीपीचा त्रास होता… दीक्षित बाईंना डॉक्टरांनी रोज सकाळी compulsary एक तास व्यायाम करायला सांगितलं होतं.तब्येत चांगली राहावी म्हणून, त्या सकाळी घाईगडबडीत काम उरकून व्यायाम करायला जायच्या…. राणे काकूंची सून मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी करत होती…सकाळी आठपासून रात्री दहा वाजेपर्यंत तिची ऑफिसची वेळ होती.. राणे काकुंवर एका नातीची जबाबदारी होती…एक वर्षाची नात सोडून राणे काकूंना महिला मंडळाच्या कार्यक्रमात, महिला मंडळात रमणे शक्य नव्हते….एक वर्षाच्या नातीची त्या पूर्ण जबाबदारी घेऊन सांभाळत होत्या…त्यांना जाणीव होती की आपली सून नोकरी करते तर नातवंडाला सांभाळणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे… तसच काहीस रमाच्या बाबतीत…रमाला दोन मुले होती.एक पाच वर्षाचा आणि एक एक वर्षाचा… रमाचे पती ship इंजिनियर होते…ते सहा महिने शिपवर असायचे… दोन्ही मुलांची जबाबदारी रमावर पडत होती.. घरात सर्व उरकून, मुलांना सांभाळणे तिला खूप जड जात होते.. रात्रभर मुलांमुळे जागरण व्हायची …ती बिचारी थकून जायची मग एकाकी वाटायचे….” जोशी काकूंची मुलगी नोकरी करत होती …. दोन वर्षापूर्वी तिचे पती अपघातात वारले .. तिच्यावर एका मुलाची जबाबदारी होती, त्यासाठी तिला नोकरी करणे भाग होते… अशा परिस्थितीत जोशी काकू मुलीच्या दीड वर्षाच्या मुलाला सांभाळत होत्या …

अशा अनेक बाजू जवळून पाहिल्यावर आपल्या लक्षात येतात… “दुरून डोंगर साजरे…”ही म्हण आपल्याला माहीतच आहे… पण जवळ गेल्यावर त्या डोंगरावर असणारे खाच- खड्डे दिसतात…. बदक छान पाण्यावर आरामात तरंगते,किती मजेत तरंगते असे आपल्याला वाटते…. पण पाण्यावर तरंगताना त्याच्या पायांची न थांबता होणारी हालचाल(endless efforts, struggle )फक्त त्यालाच माहित असते… कित्येकदा आपल्याला दुसऱ्याकडे पहिले की वाटते, किती सुखी आहेत ह्या ..किंवा खऱ्या परिस्थितीची कल्पना आपल्याला दुरून येत नाही.. आपल्याला दुरून त्या गोष्टी खूप छान वाटतात, मात्र प्रत्यक्षात असे काहीच नसते… असाच काहीसा प्रकार लग्न ठरवताना होतो.. गाडी ,बंगला, शेती, नोकरी सगळ व्यवस्थित बघून मुलीचे लग्न ठरवले जाते… सर्व आहे, पण ज्यावेळी लग्न होते,तेव्हा थोडेच महिने उलटतात.. तेव्हा बऱ्याच नको त्या गोष्टी समजतात.मुलीला आयुष्यभर झुरत दिवस काढावे लागतात…दिसताना दिसते एक, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असते… म्हणून म्हटलं जातं,” जसं दिसत तसं नसत ,म्हणूनच जग फसत…”

आपल्या ज्या गोष्टी दिसत नाहीत त्या बघण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे…. आपल्याला नाण्याची जी बाजू दिसत नाही ती बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे… आपल्याला प्रत्येकाच्या नाण्याची एकच बाजू दिसते,दुसरी बाजू बघण्याचा आपण प्रयत्न केला तर आपल्याला समजेल , की प्रत्येकाचे सुख-दुःख वेगवेगळे असते.. सुखी आहे, समाधानी आहे असे वाटत असले, तरी प्रत्यक्षात तसे असतेच असे नाही.त्यामुळे नाण्याची दुसरी बाजू आवर्जून पहा आणि मग गॉसिपिंग करा…. एखादी व्यक्ती आपल्याला वरून आनंदी दिसते म्हटल्यावर ती खरच आनंदी असेलच असे नाही…म्हणून जाणून न घेता, गॉसिपिंग न केलेलेच उत्तम…आणि खरेच आहे की जसं दिसत तसं नसतंच मुळी…

– सुसिमा थोरात.

23/04/2024

@All rights reserved.

@Image source – Google.

*Appreciation…. अर्थात गुणग्राहकता….*

मार्च महिना संपला आणि एप्रिल महिन्याचा सुरुवातीला, शालेय जीवनातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या बऱ्याच स्पर्धा परीक्षांचे निकाल लागले… त्यामध्ये नवोदय, मंथन, बीडीएस, एमटीएस,आयटीएस,TSE, BTS अशा इयत्ता पहिली पासून अगदी दहावीपर्यंत परीक्षांचे निकाल लागले….मुलांचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास व्हावा,या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या बुद्धीचा विकास व्हावा, आणि अभ्यासाची आवड निर्माण व्हावी,या हेतूने या परीक्षा घेतल्या जातात… या परीक्षांचे निकाल शाळेच्या वर्गाच्या व्हाट्सअप ग्रुप वर, फेसबुक वर सगळीकडे झळकू लागले….

कोणाला यशाचा आनंद…तर कोणाला थोडे अपयशही आले. आपण कुठे आहोत हे या परीक्षांच्या माध्यमातून समजते.. ज्या मुलांचे राज्यात,जिल्ह्यात, तालुक्यात, केंद्रात नंबर आले त्यांची गुणपत्रके, त्यांच्या निकालाची यादी ग्रुप वर पाठवण्यात आली.. पण ग्रुप वर पाठवल्यानंतर, खूप कमी लोकांनी या यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले ….अगदी एक, दोन जणांनीच अभिनंदन केले, तर काहींनी फक्त बघ्याची भूमिका घेतली…

आपल्या पाल्याचा नंबर जरी नाही आला,तरी ज्यांचा नंबर आला, ज्यांना यश मिळाले, त्यां विद्यार्थ्यांसाठी , त्या शिक्षकांसाठी आपण एक कौतुकाची थाप नक्कीच देऊ शकतो.. अर्थात द्यायला हवी… त्यासाठी काही आपल्याला पैसे मोजावे लागत नाहीत.. पण त्यासाठी आपल्याजवळ हवे ते निर्मळ मोठे मन…ती गुणग्राहक वृत्ती..आपल्याजवळ हवे ते appreciation ….म्हणजेच दुसऱ्यांचे कौतुक करण्याची, गुणग्रहण करण्याची वृत्ती….आपली ही कौतुकाची थाप त्या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीची, यशाची पोचपावती असते… विद्यार्थ्यांना, शिक्षकांना पुन्हा एक नवीन भरारी घेण्यासाठी ती बळ देते… त्यासाठी काही पैसे लागत नाहीत…लागते ती फक्त जाणीव…. कष्टाची, मेहनतीची…..ज्यांना विद्यार्थ्यांच्या यशाचे खरे मोल समजले ते त्यांना कौतुकाची थाप पाठीवर नक्कीच देतील…

ज्या विद्यार्थ्यांचे नंबर आले, त्यांना यश मिळाले, तर ते यश म्हणजे एक सहज साध्य होणारी गोष्ट नसून ती एक साधना असते, तपश्चर्या असते, खूप मोठी….जी सहज शक्य होत नाही.. आपण या विद्यार्थ्यांना कौतुकाचे थाप देणे म्हणजे, त्या विद्यार्थ्यांच्या साधनेचा आदर केला जाईल… त्यांच्या कष्टाचा, मेहनतीचा आदर करणे हे आपले सामाजिक बांधिलकी म्हणून कर्तव्य आहे…

त्यासाठी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या ,शेजारी राहणाऱ्या, आपल्या पाल्याच्या वर्गात असणाऱ्या विद्यार्थ्यांना, त्यांनी कधी एखाद्या परीक्षेत यश मिळवले, काही विद्यार्थी विविध क्रीडा प्रकारात यश मिळवतात ,तर त्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना कौतुकाची थाप द्यायला कधीच, कमीपणा मानू नका…. त्यांना कौतुकाची थाप द्यायला विसरू नका… हाच त्यांच्या कष्टाचा साधनेचा आदर होईल.. आणि खऱ्या अर्थाने त्यांचा गुणांचे गुणग्रहण होईल….

सगळ्याच बाबतीत हे सर्व अर्थाने खरे आहे…. आपला जोडीदार, आपला जवळचा एखादा यश मिळवत असेल,तर त्याला नक्की प्रोत्साहन द्या… त्यामुळे त्याला आनंद मिळेल…. उत्साह वाढेल.. आणि ती व्यक्ती याहीपेक्षा मोठ यश मिळवू शकेल…..हीच कौतुकाची थाप, कृतज्ञता माणसामध्ये पुन्हा नव्याने जगण्याचे बळ निर्माण करते…यात तिळमात्र शंका नाही…हेच असते खरे appriciation… अर्थात गुणग्राहकता… कौतुक चांगल्या गुणांचे…. त्यासाठी गरज असते ती पाठीवर कौतुकाची थाप देऊन लढ म्हणून सांगणाऱ्या आपल्या हक्काच्या माणसांची…..आणि खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या लोकांची… हीच कौतुकाची थाप आपल्या विद्यार्थीरुपी, पाल्यरुपी रोपट्याचे सिंचन होईल…. ज्यामुळे ती रोपटी अधिक तरारून आणि जोमाने वाढतील…ज्यामुळे आपल्या समाजास थंड सावली, मधुर फळे, सुगंधी फुले मिळतील…..म्हणूनच” पाठीवरती हात ठेऊन नुसते लढ म्हणा”..ही कुसुमाग्रजांची उक्ती किती अर्थपूर्ण आणि सार्थ आहे याची प्रचिती आल्यावाचून राहत नाही ….

– सुसिमा थोरात.

21/04/2024

@All rights reserved.

.

*नवी पालवी आशेची….*

चैत्र महिना सुरू झाला,फाल्गुन महिना संपला, मराठी नववर्षाची सुरुवात…ही सर्वांनाच हवीहवीशी वाटते.

आज मराठी नववर्षाचा पहिला दिवस. आभाळात मळभ दाटले होते… सकाळच्या प्रहरी सर्व परिसर मऊ धुक्याची दुलई लेऊन स्तब्धपणे उभा होता… सकाळच्या या वातावरणात मॉर्निंग वॉकला जायची मजा काही वेगळीच असते… मला मॉर्निंग वॉकची प्रचंड आवड आहे… सकाळच्या या वेळी सारी झाडे शांतपणे उभी होती.. गेली कित्येक दिवस, मी त्या झाडांचे निरीक्षण करत होते…. पोपटी, चॉकलेटी ,हिरवी कोवळी पालवी त्यांना फुटली होती.. कडेकपारीत सर्वच झाडांना , झुडुपाना नवीन पालवी फुटली होती…कोकिळा आर्त स्वरात साद घालत होती…..वाऱ्याची मंद,थंड झुळूक त्या झाडांना हळूच गुदगुल्या करत होती.. तो सकाळचा मंद ,थंड वारा मलाही धुंद करून टाकत होता…अलगद डोळे बंद करून मी तो अनुभव घेत होते…आणि पुन्हा पुन्हा त्या झुळुकेची वाट पाहत होते…. झाडेही हाच अनुभव घेत होती.. ती खुश होती ….गालातल्या गालात हसत होती…. ग्रीष्माची दाहकता संपली होती….. उन्हाळा ऋतू असूनही सकाळच्या वेळी वातावरण थंड होते… वसंत ऋतुच्या आगमनाने सारी सृष्टी पुलकित झाली .. वसंताची नवी नवलाई लेऊन नटली…नवीन वर्षाच्या सुरुवातीला नव्या नवलाईने नटलेली झाडे स्वतःशीच गालातल्या गालात हसत होती,नववधू प्रमाणे स्वतःशीच लाजत होती…

याच हसणाऱ्या झाडांनी ही पालवी फुटण्यापूर्वी निष्पर्ण पणे उन्हात उभे राहून एक संघर्ष अनुभवला होता..त्यानंतर त्यांनाही सुख अनुभवायला मिळाले होते.प्रत्येकाच्या आयुष्यात हा संघर्ष असतो ….त्यानंतर नवी पालवी फुटते… फक्त त्यासाठी थोडी वाट बघावी लागते.. थोडा संयम ठेवावा लागतो.. थोडा संघर्ष करावा लागतो …हाच संघर्ष , हाच वेटींग पिरियड आपल्याला यशाच्या एका उंच शिखरावर घेऊन जातो एक नवीन आशेची पालवी आयुष्यात निर्माण करतो…

– सुसिमा थोरात.

09/04/2024

@All rights are reserved.

*कवितेतून जगावे…*

(जागतिक कविता दिनानिमित्त..)

कातरवेळी ,नदीकिनारी, सूर्यास्तास पहावे,

विरहाचे क्षण मनातले सारे, तरंगासोबत विरून जावे.

आठवणी काळजातल्या साऱ्या, आठवून निःशब्द व्हावे,

सारे काहूर मनातले , कवितेने कवेत घ्यावे.

दुःख सारे उरातले, अश्रुंतून ओघळावे,

येणार नसेलच मांडता शल्य,क्षण मुक्याने ते जगावे,

वेदना त्या उरातल्या विसरून, सुखास कवटाळावे,

रंग सुखदुःखाचे सारे, मी कवितेतून उधळावे.

उन्हातल्या तप्त झळांत, कुंदाचे मोहरणे पहावे,

झाड असे निष्पर्ण जरी, पळसाचे बहरणे पहावे,

धुंद करून सृष्टीला साऱ्या, प्राजक्ताने गाली हसावे,

सगळे रुसवे , फुगवे निसर्गाचे, मी कवितेला सांगावे.

तूडविणाऱ्या पावलांना, फुलांप्रमाणे सुगंधित करावे,

कठोर वाणी, हृदयाला त्या प्रेमाचे कोंदण द्यावे,

आयुष्यातील तप्त उन्हाळ्यास, कधी न विस्मरावे,

असो नसो कुणीही जिवलग सखा, आपण कवितेतून जगावे..

काळोख्या पाऊल वाटेवर, दीप ज्ञानाचे उजळावे,

शब्द असती सखे आपुले, कलमेला धरून राहावे,

नसे आठवण कुणा, आपली परमात्म्यास स्मरावे,

उरला नाही देह जिवंत, तरी कवितेतून उरावे…

– सुसिमा थोरात.

21/03/2024

@All rights are reserved.

@Image source – Google.

*कवितेतून जगावे…*

*मायबोली मराठी अमुची…*

गोडवा अमृताचा लेऊन नटली मराठी,

वळणाला वळवावी, तशी वळते मराठी.

घराघरात आपूल्या नांदते मराठी,

कणाकणास महाराष्ट्राच्या साद देते मराठी.

अस्मिता मनामनाची जपून ठेवते मराठी,

कडेकपारीत सह्याद्रीच्या घुमते मराठी.

गौरविण्या मराठीला जमतो आम्ही मराठी,

जाणं ठेऊन मराठीची स्मरतो मराठी.

रसिक प्रेक्षकांची मने जिंकते मराठी,

आत्मसन्मान महाराष्ट्राचा जपते मराठी.

शिरपेचात मानाचा तुरा माय मराठी,

तमाम मराठी जनतेची जननी माय मराठी.

रुधिरातूनी आमच्या वाहते मराठी,

नसानसात आमच्या जागते मराठी.

मोत्त्याक्षरे लेऊन संगे सजली मराठी,

हृदयावर मराठमोळ्या राज्य करते मराठी…

– सुसिमा थोरात.

27/02/2024

@All rights are reserved.

@Image source – Google.

*वाढदिवस…*

प्रिय विवान बाळा,

वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा!!!

27 ऑक्टोबर 2016 वसुबारस दिवशी तुझा जन्म झाला. तुझं नव आयुष्य या जगात सुरू झाले… तु मुल म्हणून जन्मलास आणि मी आई म्हणून… तुझ्या जगात येण्याने लाखमोलाच मातृत्व देवानं मला बहाल केलं, मिळालं …तुझ्या रूपान एक सुंदर कळी माझ्या आयुष्यात आली.. तिला अलगद उमलायला मला मदत करायची आहे ….तीच हसणं अबाधित ठेवायच आहे…. नेहमी हसत रहा.. आनंदी राहा… माझ्या मातृत्वाचा मला अभिमान आहे ..तो फक्त तुझ्यामुळेच!! तुझा जन्म झाला आणि अचानक एका अल्लड मुलीचे रूपांतर एका जबाबदार आईमध्ये झाले… आई म्हणजे काय ??? हे तुझ्यामुळेच मला अनुभवायला मिळाले… तुझ्या बालपणातच मी क्षणाक्षणाला माझं बालपण जगले. तुझ्यातच हरवून गेले.. माझ आयुष्य पूर्णतः बदलून गेलं.. तुला एक – एक अक्षर बोलायला शिकवण्यापासून ते रामरक्षा शिकवेपर्यंतचा प्रवास खूपच गोड अविस्मरणीय आणि रमणीय होता… इथून पुढेही तो छानच असेल…! कधी शिस्त लागण्यासाठी कठोरपणाने वागणारी ही तुझी आई तुझ्यावर तितकच प्रेम करते ….तुझी तितकीच काळजी करते, तुला तितकंच जपते, तुझ्यात श्यामला पाहते.. हेही तितकेच खरे!!

वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा!!! तुला निरोगी दीर्घायुष्य लाभो! तुझी सगळी स्वप्न पूर्ण होवोत …तू खूप यशस्वी हो !!.तुझं यश पाहण्याचा भाग्य मला आई म्हणून लाभाव हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना!! यशाची सगळी शिखरे तू पादाक्रांत करावीस…. सुख ,समाधान, आणि ऐश्वर्यात रहा…छान तर तू आहेसच.. छान अभ्यास कर….मोठा हो.

-,तुझीच आई,

सुसिमा थोरात.

27/10/2023.

*रिता आसरा….*

दुपारची वेळ होती, सकाळपासूनच खूप ऊन होते.उष्णता वाढली होती. खूप गरम होत होतं. अंगातून घामाचा धारा वाहत होत्या. तीनच्या दरम्यान गच्च आभाळ भरून आलं. दिवस पावसाळ्याचे नव्हते, पण परतीच्या पावसाचे होते. अचानक हवेत गारवा वाटू लागला…पाऊस येणार, असं समजताच नीताने फॅक्टरी च्या मालकाची परवानगी घेतली आणि ती बाहेर पडली.खूप वापरून जिर्ण झालेलं तिचं पातळ कमरेत खोचून तीन शाळेची वाट धरली. मुलांची शाळा अर्धा तासाच्या अंतरावर होती. ती लवकर बाहेर पडली होती, तरी तिला अर्ध्यातच पावसाने गाठले.

सोसाट्याचा वारा आणि पावसाचा धारांत ती न्हाऊन निघत होती.अचानक आलेल्या पावसामुळे, जवळ छत्री नव्हतीच… भरभर धावतच तिने शाळा गाठली. दोन्ही मुलांना घेऊन तिने घराची वाट धरली. मुले भिजणारच होती पण तिच्या मनाच्या समाधानासाठी तिने आपल्या साडीचा ओला पदर त्यांच्या डोक्यावर धरला. विजांचा कडकडाट होत होता. पाच वर्षांपूर्वी तिचा जोडीदार एका दुर्धर आजाराने तिला सोडून गेला.त्याला वाचवण्यासाठी खूप नवससायास केले, पण तो वाचू शकला नव्हता.

दोन्ही मुलांची जबाबदारी तिच्यावरच येऊन पडली होती. त्यांच्या पोटापाण्यासाठी, शिक्षणासाठी ती वणवण भटकत होती. घाम गाळून कष्टाचा दाम मिळवत होती.पावसाचा जोर वाढत होता. सोसाट्याचा वारा पिंगा घालत होता. ती वाट तुडवत एकेक पावलाने घर जवळ करत होती…. अचानक कुठेतरी जवळच वीज पडल्याने मोठा कडकडाट झाला. दोन्ही लेकरे घाबरून पटकन घट्ट तिला बिलगली….. क्षणभर काळजातच धस्स झाले…. तिने दोन्ही मुलांना घट्ट जवळ घेतले.. डोळे क्षणभर मिटून घेतले आणि ती थांबली..

काही क्षणांच्या अवधी नंतर एक दीर्घ श्वास घेऊन, पुन्हा ती आपली वाट चालू लागली.अंगावरून पडणाऱ्या पावसाच्या धारात ती नखशिखांत ओली झाली होती.. पावसाच्या या रौद्र रूपाला, विजेच्या कडकडाटला क्षणभर तीही घाबरली होती. तिलाही भीती वाटत होती…. पण ती कोणालाही बिलगणार होती ???? कोसळणाऱ्या आभाळाचाच तिला आधार होता … तिलाच मुलांचा आधार व्हायचे होते..न कळत या कल्पनेने तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारावाहू लागल्या….. अश्रूमुळे समोरची वाट अजूनच धूसर होत होती.. तरी ती चालत होती …

घरी आली. तिच्या घरी तिच्या दोन मुलाव्यतिरिक्त तिचे सासरे होते. पंच्याहत्तरीचा म्हातारा देह मुटकुळ करून एका बाजूला खाटवर निपचित पडून होता…तरी त्यांनी हाक मारून विचारले.. नीता पोरं आली का???तिने मानेनेच हो उत्तर दिले…घरी आल्यावर कोरड्या सुती साडीच्या धडप्याने तिने मुलांना पुसून घेतले.. कोरडे कपडे घातले..गेली कित्येक वर्षे फक्त तिने त्या सासऱ्याच्या थकलेल्या देहाला जपण्याचे काम तिने केले होते.. म्हातारा देह असला तरी तिला या म्हाताऱ्याचा डोंगरावर आधार होता… दोन लहान मुलांना ती सांभाळत होती,जपत होती, पण तिला सांभाळणारे,जपणारे असे कोणीच नव्हते… हा एक साधस पातळ नेसून तिने चुल पेटवायला लाकड घेतली.. चूल पेटवली… एका जर्मनच्या तपेल्यात कोऱ्या चहाचे आधण ठेवले.. परसातील गवती चहाची दोन पाने त्या आधनात टाकली..चिमटभर पावडर व गुळाचा खडा तेवढ्यावर चार कप चहा उकळला… दोन्ही मुलांना एक बटरचा तुकडा व कोरा चहा दिला…

त्याच गरम चूलीवर थोड्या वेळात तिने स्वयंपाक करायला घेतला. फडताळात एक खोबऱ्याचा तुकडा होता..तेवढाच टाकून गरम चुलीवर तिने वरणफळ शिजवून घेतले… दोन्ही मुलांनी आवडीने खाल्ले.. त्यांच्यासोबत तिने कसेबसे चार घास पोटात ढकलले आणि दोन भांडी घासून नितळायला भिंतीला उभी करून ठेवली.. आणि ओसरीवर झोपलेल्या म्हाताऱ्याच्या अंगावर पांघरून घालून ,दरवाजा लोटून दोन्ही मुलांना जवळ घेऊन बसली.

दोन्ही मुलांना दोन्ही बाजूला मांडीवर घेऊन ती त्यांच्या डोक्यावर हळुवार हात फिरू लागली… तेवढ्यात मोठ्या मुलांनी प्रश्न विचारला आई बाबा केव्हा येणार ग???तिच्या डोळ्यात टचकन आलेलं पाणी थांबवत ती म्हणाली ,बाळा बाबा दूरदेशी गेले,खूप लांब खूप तुम्हाला खाऊ आणण्यासाठी… लवकरच येतील बर… शाळेत जाणाऱ्या त्या लहान मुलांची खोटी खोटी समजूत ती काढत होती…शाळेत इतर मुले त्यांना बाप नाही म्हणून चिडवत होती… विधवा म्हणून समाजाने दिलेली वागणूक ….. तिला सारे समजत होते, पण नियतीच्या या खेळात तीही हरली होती …देवाने तिच्यावर व तिच्या दोन मुलांवर दुर्दैव आणले होते.. दोन मुले पदरात घेऊन ती दुसरा संसार थाटण्याचा विचार ती कल्पनेत सुद्धा करू शकत नव्हती…

आपल्या जोडीदाराच्या आठवणीत ती क्षणाक्षणाला झुरत होती… दोन्ही मुलांना तिने अंगाई गाऊन झोपले.. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते.. त्यांना तिने मोकळीक दिली..त्याच्या आठवणीत ती मनसोक्त रडली.. पहिल्या अश्रूंचा गरम थेंब तिच्या मुलाच्या चेहऱ्यावर पडताच, त्याने हळूच डोळे उघडले पण झोपेच्या अवस्थेत पटकन बंद करून घेतले ..ती रडत होती केंव्हा बारा वाजून गेले समजलेच नाही..दोन्ही मुलांना दोन्ही बाजूला व्यवस्थित झोपवून तिने तोंडावर चादर ओढून घेऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागली…झोप येतच नव्हती.. डोळे मिटून ती पडून राहिली .. स्वतःला ती सांगायची सगळ ठीक होईल…मात्र स्वतःजवळ जोडीदारच नसल्याने जी पोकळी निर्माण झाली होती,ती कधीच भरून येणार नव्हती… मुलांना बापाचं प्रेम मिळणार नव्हत…. खांद्यावर बसवून जग दाखवणारा बाप मुलांना कधीच भेटणार नव्हता… तिचं मन रीतच राहणार होतं.. चार भिंतीच्या मधे तिला आसरा मिळाला होता …. पण तिला मिळालेला आसरा रिताच होता.. रिताच राहणार होता…. अगदी जन्मभरासाठी……

– सुसिमा थोरात.

14/10/2023

@Image source – Google.

@All rights are reserved.

*माझी आनंददायी शाळा – जिल्हा परिषद शाळा…*

रोज सकाळी पहाटे उठल्या,उठल्या मला बातम्यांचे सदर चाळण्याची सवयच झालेली होती.किमान दहा मिनिटं सर्व जुन्या- नव्या बातम्यांवर मी नजर फिरवून घेते.एक बातमी वाचल्यावर थोडा धक्का बसला आणि विचारांचे काहूर डोक्यात माजले…ती बातमी होती, “जिल्हा परिषद शाळांचा पट साडेचार हजारांनी घटला”.-दैनिक रत्नागिरी एक्सप्रेसची ही बातमी वाचून मन सुन्न होऊन गेले.का कोणास ठाऊक ???पण , एक शिक्षक म्हणून एक अनामिक काहूर मनात दाटले….लहानपणी मी ज्या जिल्हा परिषद शाळेत शिकले, त्या शाळेतील माझ्या जुन्या आठवणी, पुन्हा नव्याने मला भेटल्या….मी त्या आठवणीत रमून गेले. मला घडवणारी माझी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा….किती सुंदर आणि अनमोल क्षण मला माझ्या शाळेने दिले होते आणि सध्या एक जिल्हा परिषद शिक्षक या नात्याने त्याच क्षणांना नवीन नव्हाळी देऊन, पुन्हा नव्याने मी तेच क्षण माझ्या विद्यार्थ्यांबरोबर जगत होते….

ही बातमी वाचली आणि जिल्हा परिषद शाळेत, मराठी माध्यमाच्या शाळेत मिळणाऱ्या या सुंदर क्षणांना आजचा विद्यार्थी मुकतोय….याची प्रकर्षाने जाणीव माझ्या मनाला झाली आणि अतिव वेदना झाल्या……ह्या साऱ्या वेदना कमी करण्यासाठी हा सारा लेखन प्रपंच…..

इंग्रजी माध्यमाच्या आणि खाजगी शाळेकडे लोकांचा कल वाढतो आहे.प्राथमिक शाळेतले शिक्षण, माध्यमिक शाळेचे शिक्षण खरंतर आपण मराठी भाषेतून,आपल्या मातृभाषेतून, मायबोलीतून द्यायला हवे….जे आपल्याला जिल्हा परिषद शाळेत मिळते…आपली मातृभाषा मराठी असताना इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा अट्टाहास का ???? खर तर आपल्या महाराष्ट्रात भरपूर गरीब जनता आहे त्यांना इंग्रजी शाळांच्या प्रवेश फी बिलकुल परवडत नाही..ज्यांना एक वेळ अन्न मिळत नाही, तिकडे गरज नसताना भरमसाठ पैसे भरून लोक आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवून एक चालत बोलत यंत्र तयार करतात.

आज आपल्या मुलांना आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण देतो.इंग्रजी माध्यमातून शिक्षण देताना संपूर्णपणे पाश्चात संस्कृती चे अनुकरण करतो,याची तीळ मात्र गरज नाही …आज आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या पाल्याला माणूस म्हणून जगायला शिकवायचे असतील तर त्याला प्रथम व्यक्त होता आले पाहिजे आणि त्या अभिव्यक्तीसाठी आपल्याला मराठी भाषेतून म्हणजेच आपल्या मातृभाषेतून शिक्षण द्यायला हवे, तर त्याला त्याचे विचार व्यक्त करता येतील.

आपल्या महाराष्ट्रात मराठी भाषेत खूप ग्रंथसंपदा उपलब्ध आहे.मोठमोठे कवी, लेखक यांनी खूप मराठी साहित्य लिहून ठेवले आहे.ते सर्व मुलांना समजायचे असेल, तर त्यांना मराठी भाषेतच शिकवायला हवे. मातृभाषा समजली तरच आणि तरच आपल्या मुलांना,साने गुरुजी कळतील,गदिमा कळतील, सावरकर कळतील, कुसुमाग्रज कळतील,बहिणाबाई कळतील, “English is the window of the world”..हे अगदी 100% मान्यच आहे.पण त्यासाठी इंग्रजी शाळांची किंवा इंग्रजी माध्यमाची काहीच गरज नाही..

सध्या एमपीएससी, यूपीएससी सारख्या शासकीय परीक्षा सुद्धा मराठी माध्यमातून होतात.त्यामुळे विद्यार्थ्यांचे कोणतेच नुकसान होत नाही.जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना जरी काही अशैक्षणिक कामे करावी लागत असली,तरीही अत्यंत तन्मयतेने ते विद्यार्थ्यांना शिकवतात…तीच मुले आपली भवितव्य चांगले घडवतात…आपल्या संस्कृतीचे बाळकडू मुलांना जिल्हा परिषद शाळेत दिले जाते.त्यांचा सर्वांगाने विकास केला जातो. . सर्व नीती मूल्यांची अगदी मनापासून रुजवणूक मुलांमध्ये होते.. केली जाते ती जिल्हा परिषद शाळेतच केली जाते. .. मराठी शाळा विद्यार्थ्याला खऱ्या अर्थाने आधार देते. त्याला घडवते आणि वाढवते ही…

सध्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी खूप प्रयत्न चालू आहेत आणि तो मिळेल यात शंकाच नाही..मला अभिमान आहे.,माझ्या मातृभाषेचा आणि माझ्या मराठी शाळेचा मी ज्या शाळेत घडले,त्या शाळेचा आणि माझी मुले जिल्हा परिषद शाळेत शिकतात,शिकतील याचाही…सोन्याचा मुलामा देऊन लोखंडाचे किंवा इतर कोणत्या धातूचे सोने होत नाही….खरे सोने हे भट्टीत ताऊन सुलाखून निघून मगच तयार होते..जे माझ्या मराठी शाळेत म्हणजे जिल्हा परिषद शाळेत तयार होते …याची मला खात्री आहे. आपल्या विद्यार्थ्याला खऱ्या अर्थाने आयुष्यात यशस्वी बनवायचे असेल तर त्याला मराठी भाषेतूनच शिक्षण दिले पाहिजे..

सध्या बऱ्याच मराठी शाळा या डिजिटल झाल्या आहेत.. मॉडेल शाळा आहेत..इतर खूप चांगले उपक्रम मराठी शाळेतही चांगल्या पद्धतीने घेतले जातात..चांगल्या पद्धतीचे प्रशिक्षण जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनाही दिले जाते….”आपण मातृभाषेतून शिक्षण घेतो,हाच आपल्या मराठी भाषेचा खूप मोठा सन्मान आहे”..

“ही आवडते म्हणजे मनापासून शाळा, लावते लळा ही जशी माऊली बाळा”…जिल्हा परिषद शाळा खरंच माझी माऊली आहे. जिथे शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं ऋणानुबंधाचं असतं, मायेच असतं,आपुलकीचं असतं … विद्यार्थ्यांना सर्वार्थाने घडवणारी शाळा ही जिल्हा परिषद मराठी शाळा आहे ..यात तीळमात्र शंका नाही… म्हणून माझी आनंददायी शाळा ही जिल्हा परिषद शाळा आहे. मराठी शाळा आहे,जिने मला मातृभाषेतून शिक्षण दिलं… मला घडवलं…. ज्ञानरूपी संस्कारांनी वाढवलं….. माझं जगणं समृद्ध केलं… आजही ही मराठी शाळा मुलांवर संस्कार करत आहे… मातृभाषेला जपत आहे….

म्हणून मातृभाषेचा सन्मान करूया आणि आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेतच घेऊया… मातृभाषेला जपूया तिचा सन्मान करूया एक प्रगल्भ माणूस म्हणून जगूया….

– सुसिमा थोरात, रत्नागिरी.

27/08/2023.

@All rights are reserved.