*रिता आसरा….*

दुपारची वेळ होती, सकाळपासूनच खूप ऊन होते.उष्णता वाढली होती. खूप गरम होत होतं. अंगातून घामाचा धारा वाहत होत्या. तीनच्या दरम्यान गच्च आभाळ भरून आलं. दिवस पावसाळ्याचे नव्हते, पण परतीच्या पावसाचे होते. अचानक हवेत गारवा वाटू लागला…पाऊस येणार, असं समजताच नीताने फॅक्टरी च्या मालकाची परवानगी घेतली आणि ती बाहेर पडली.खूप वापरून जिर्ण झालेलं तिचं पातळ कमरेत खोचून तीन शाळेची वाट धरली. मुलांची शाळा अर्धा तासाच्या अंतरावर होती. ती लवकर बाहेर पडली होती, तरी तिला अर्ध्यातच पावसाने गाठले.

सोसाट्याचा वारा आणि पावसाचा धारांत ती न्हाऊन निघत होती.अचानक आलेल्या पावसामुळे, जवळ छत्री नव्हतीच… भरभर धावतच तिने शाळा गाठली. दोन्ही मुलांना घेऊन तिने घराची वाट धरली. मुले भिजणारच होती पण तिच्या मनाच्या समाधानासाठी तिने आपल्या साडीचा ओला पदर त्यांच्या डोक्यावर धरला. विजांचा कडकडाट होत होता. पाच वर्षांपूर्वी तिचा जोडीदार एका दुर्धर आजाराने तिला सोडून गेला.त्याला वाचवण्यासाठी खूप नवससायास केले, पण तो वाचू शकला नव्हता.

दोन्ही मुलांची जबाबदारी तिच्यावरच येऊन पडली होती. त्यांच्या पोटापाण्यासाठी, शिक्षणासाठी ती वणवण भटकत होती. घाम गाळून कष्टाचा दाम मिळवत होती.पावसाचा जोर वाढत होता. सोसाट्याचा वारा पिंगा घालत होता. ती वाट तुडवत एकेक पावलाने घर जवळ करत होती…. अचानक कुठेतरी जवळच वीज पडल्याने मोठा कडकडाट झाला. दोन्ही लेकरे घाबरून पटकन घट्ट तिला बिलगली….. क्षणभर काळजातच धस्स झाले…. तिने दोन्ही मुलांना घट्ट जवळ घेतले.. डोळे क्षणभर मिटून घेतले आणि ती थांबली..

काही क्षणांच्या अवधी नंतर एक दीर्घ श्वास घेऊन, पुन्हा ती आपली वाट चालू लागली.अंगावरून पडणाऱ्या पावसाच्या धारात ती नखशिखांत ओली झाली होती.. पावसाच्या या रौद्र रूपाला, विजेच्या कडकडाटला क्षणभर तीही घाबरली होती. तिलाही भीती वाटत होती…. पण ती कोणालाही बिलगणार होती ???? कोसळणाऱ्या आभाळाचाच तिला आधार होता … तिलाच मुलांचा आधार व्हायचे होते..न कळत या कल्पनेने तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारावाहू लागल्या….. अश्रूमुळे समोरची वाट अजूनच धूसर होत होती.. तरी ती चालत होती …

घरी आली. तिच्या घरी तिच्या दोन मुलाव्यतिरिक्त तिचे सासरे होते. पंच्याहत्तरीचा म्हातारा देह मुटकुळ करून एका बाजूला खाटवर निपचित पडून होता…तरी त्यांनी हाक मारून विचारले.. नीता पोरं आली का???तिने मानेनेच हो उत्तर दिले…घरी आल्यावर कोरड्या सुती साडीच्या धडप्याने तिने मुलांना पुसून घेतले.. कोरडे कपडे घातले..गेली कित्येक वर्षे फक्त तिने त्या सासऱ्याच्या थकलेल्या देहाला जपण्याचे काम तिने केले होते.. म्हातारा देह असला तरी तिला या म्हाताऱ्याचा डोंगरावर आधार होता… दोन लहान मुलांना ती सांभाळत होती,जपत होती, पण तिला सांभाळणारे,जपणारे असे कोणीच नव्हते… हा एक साधस पातळ नेसून तिने चुल पेटवायला लाकड घेतली.. चूल पेटवली… एका जर्मनच्या तपेल्यात कोऱ्या चहाचे आधण ठेवले.. परसातील गवती चहाची दोन पाने त्या आधनात टाकली..चिमटभर पावडर व गुळाचा खडा तेवढ्यावर चार कप चहा उकळला… दोन्ही मुलांना एक बटरचा तुकडा व कोरा चहा दिला…

त्याच गरम चूलीवर थोड्या वेळात तिने स्वयंपाक करायला घेतला. फडताळात एक खोबऱ्याचा तुकडा होता..तेवढाच टाकून गरम चुलीवर तिने वरणफळ शिजवून घेतले… दोन्ही मुलांनी आवडीने खाल्ले.. त्यांच्यासोबत तिने कसेबसे चार घास पोटात ढकलले आणि दोन भांडी घासून नितळायला भिंतीला उभी करून ठेवली.. आणि ओसरीवर झोपलेल्या म्हाताऱ्याच्या अंगावर पांघरून घालून ,दरवाजा लोटून दोन्ही मुलांना जवळ घेऊन बसली.

दोन्ही मुलांना दोन्ही बाजूला मांडीवर घेऊन ती त्यांच्या डोक्यावर हळुवार हात फिरू लागली… तेवढ्यात मोठ्या मुलांनी प्रश्न विचारला आई बाबा केव्हा येणार ग???तिच्या डोळ्यात टचकन आलेलं पाणी थांबवत ती म्हणाली ,बाळा बाबा दूरदेशी गेले,खूप लांब खूप तुम्हाला खाऊ आणण्यासाठी… लवकरच येतील बर… शाळेत जाणाऱ्या त्या लहान मुलांची खोटी खोटी समजूत ती काढत होती…शाळेत इतर मुले त्यांना बाप नाही म्हणून चिडवत होती… विधवा म्हणून समाजाने दिलेली वागणूक ….. तिला सारे समजत होते, पण नियतीच्या या खेळात तीही हरली होती …देवाने तिच्यावर व तिच्या दोन मुलांवर दुर्दैव आणले होते.. दोन मुले पदरात घेऊन ती दुसरा संसार थाटण्याचा विचार ती कल्पनेत सुद्धा करू शकत नव्हती…

आपल्या जोडीदाराच्या आठवणीत ती क्षणाक्षणाला झुरत होती… दोन्ही मुलांना तिने अंगाई गाऊन झोपले.. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते.. त्यांना तिने मोकळीक दिली..त्याच्या आठवणीत ती मनसोक्त रडली.. पहिल्या अश्रूंचा गरम थेंब तिच्या मुलाच्या चेहऱ्यावर पडताच, त्याने हळूच डोळे उघडले पण झोपेच्या अवस्थेत पटकन बंद करून घेतले ..ती रडत होती केंव्हा बारा वाजून गेले समजलेच नाही..दोन्ही मुलांना दोन्ही बाजूला व्यवस्थित झोपवून तिने तोंडावर चादर ओढून घेऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागली…झोप येतच नव्हती.. डोळे मिटून ती पडून राहिली .. स्वतःला ती सांगायची सगळ ठीक होईल…मात्र स्वतःजवळ जोडीदारच नसल्याने जी पोकळी निर्माण झाली होती,ती कधीच भरून येणार नव्हती… मुलांना बापाचं प्रेम मिळणार नव्हत…. खांद्यावर बसवून जग दाखवणारा बाप मुलांना कधीच भेटणार नव्हता… तिचं मन रीतच राहणार होतं.. चार भिंतीच्या मधे तिला आसरा मिळाला होता …. पण तिला मिळालेला आसरा रिताच होता.. रिताच राहणार होता…. अगदी जन्मभरासाठी……

– सुसिमा थोरात.

14/10/2023

@Image source – Google.

@All rights are reserved.

*माझी आनंददायी शाळा – जिल्हा परिषद शाळा…*

रोज सकाळी पहाटे उठल्या,उठल्या मला बातम्यांचे सदर चाळण्याची सवयच झालेली होती.किमान दहा मिनिटं सर्व जुन्या- नव्या बातम्यांवर मी नजर फिरवून घेते.एक बातमी वाचल्यावर थोडा धक्का बसला आणि विचारांचे काहूर डोक्यात माजले…ती बातमी होती, “जिल्हा परिषद शाळांचा पट साडेचार हजारांनी घटला”.-दैनिक रत्नागिरी एक्सप्रेसची ही बातमी वाचून मन सुन्न होऊन गेले.का कोणास ठाऊक ???पण , एक शिक्षक म्हणून एक अनामिक काहूर मनात दाटले….लहानपणी मी ज्या जिल्हा परिषद शाळेत शिकले, त्या शाळेतील माझ्या जुन्या आठवणी, पुन्हा नव्याने मला भेटल्या….मी त्या आठवणीत रमून गेले. मला घडवणारी माझी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा….किती सुंदर आणि अनमोल क्षण मला माझ्या शाळेने दिले होते आणि सध्या एक जिल्हा परिषद शिक्षक या नात्याने त्याच क्षणांना नवीन नव्हाळी देऊन, पुन्हा नव्याने मी तेच क्षण माझ्या विद्यार्थ्यांबरोबर जगत होते….

ही बातमी वाचली आणि जिल्हा परिषद शाळेत, मराठी माध्यमाच्या शाळेत मिळणाऱ्या या सुंदर क्षणांना आजचा विद्यार्थी मुकतोय….याची प्रकर्षाने जाणीव माझ्या मनाला झाली आणि अतिव वेदना झाल्या……ह्या साऱ्या वेदना कमी करण्यासाठी हा सारा लेखन प्रपंच…..

इंग्रजी माध्यमाच्या आणि खाजगी शाळेकडे लोकांचा कल वाढतो आहे.प्राथमिक शाळेतले शिक्षण, माध्यमिक शाळेचे शिक्षण खरंतर आपण मराठी भाषेतून,आपल्या मातृभाषेतून, मायबोलीतून द्यायला हवे….जे आपल्याला जिल्हा परिषद शाळेत मिळते…आपली मातृभाषा मराठी असताना इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा अट्टाहास का ???? खर तर आपल्या महाराष्ट्रात भरपूर गरीब जनता आहे त्यांना इंग्रजी शाळांच्या प्रवेश फी बिलकुल परवडत नाही..ज्यांना एक वेळ अन्न मिळत नाही, तिकडे गरज नसताना भरमसाठ पैसे भरून लोक आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवून एक चालत बोलत यंत्र तयार करतात.

आज आपल्या मुलांना आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण देतो.इंग्रजी माध्यमातून शिक्षण देताना संपूर्णपणे पाश्चात संस्कृती चे अनुकरण करतो,याची तीळ मात्र गरज नाही …आज आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या पाल्याला माणूस म्हणून जगायला शिकवायचे असतील तर त्याला प्रथम व्यक्त होता आले पाहिजे आणि त्या अभिव्यक्तीसाठी आपल्याला मराठी भाषेतून म्हणजेच आपल्या मातृभाषेतून शिक्षण द्यायला हवे, तर त्याला त्याचे विचार व्यक्त करता येतील.

आपल्या महाराष्ट्रात मराठी भाषेत खूप ग्रंथसंपदा उपलब्ध आहे.मोठमोठे कवी, लेखक यांनी खूप मराठी साहित्य लिहून ठेवले आहे.ते सर्व मुलांना समजायचे असेल, तर त्यांना मराठी भाषेतच शिकवायला हवे. मातृभाषा समजली तरच आणि तरच आपल्या मुलांना,साने गुरुजी कळतील,गदिमा कळतील, सावरकर कळतील, कुसुमाग्रज कळतील,बहिणाबाई कळतील, “English is the window of the world”..हे अगदी 100% मान्यच आहे.पण त्यासाठी इंग्रजी शाळांची किंवा इंग्रजी माध्यमाची काहीच गरज नाही..

सध्या एमपीएससी, यूपीएससी सारख्या शासकीय परीक्षा सुद्धा मराठी माध्यमातून होतात.त्यामुळे विद्यार्थ्यांचे कोणतेच नुकसान होत नाही.जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना जरी काही अशैक्षणिक कामे करावी लागत असली,तरीही अत्यंत तन्मयतेने ते विद्यार्थ्यांना शिकवतात…तीच मुले आपली भवितव्य चांगले घडवतात…आपल्या संस्कृतीचे बाळकडू मुलांना जिल्हा परिषद शाळेत दिले जाते.त्यांचा सर्वांगाने विकास केला जातो. . सर्व नीती मूल्यांची अगदी मनापासून रुजवणूक मुलांमध्ये होते.. केली जाते ती जिल्हा परिषद शाळेतच केली जाते. .. मराठी शाळा विद्यार्थ्याला खऱ्या अर्थाने आधार देते. त्याला घडवते आणि वाढवते ही…

सध्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी खूप प्रयत्न चालू आहेत आणि तो मिळेल यात शंकाच नाही..मला अभिमान आहे.,माझ्या मातृभाषेचा आणि माझ्या मराठी शाळेचा मी ज्या शाळेत घडले,त्या शाळेचा आणि माझी मुले जिल्हा परिषद शाळेत शिकतात,शिकतील याचाही…सोन्याचा मुलामा देऊन लोखंडाचे किंवा इतर कोणत्या धातूचे सोने होत नाही….खरे सोने हे भट्टीत ताऊन सुलाखून निघून मगच तयार होते..जे माझ्या मराठी शाळेत म्हणजे जिल्हा परिषद शाळेत तयार होते …याची मला खात्री आहे. आपल्या विद्यार्थ्याला खऱ्या अर्थाने आयुष्यात यशस्वी बनवायचे असेल तर त्याला मराठी भाषेतूनच शिक्षण दिले पाहिजे..

सध्या बऱ्याच मराठी शाळा या डिजिटल झाल्या आहेत.. मॉडेल शाळा आहेत..इतर खूप चांगले उपक्रम मराठी शाळेतही चांगल्या पद्धतीने घेतले जातात..चांगल्या पद्धतीचे प्रशिक्षण जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनाही दिले जाते….”आपण मातृभाषेतून शिक्षण घेतो,हाच आपल्या मराठी भाषेचा खूप मोठा सन्मान आहे”..

“ही आवडते म्हणजे मनापासून शाळा, लावते लळा ही जशी माऊली बाळा”…जिल्हा परिषद शाळा खरंच माझी माऊली आहे. जिथे शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं ऋणानुबंधाचं असतं, मायेच असतं,आपुलकीचं असतं … विद्यार्थ्यांना सर्वार्थाने घडवणारी शाळा ही जिल्हा परिषद मराठी शाळा आहे ..यात तीळमात्र शंका नाही… म्हणून माझी आनंददायी शाळा ही जिल्हा परिषद शाळा आहे. मराठी शाळा आहे,जिने मला मातृभाषेतून शिक्षण दिलं… मला घडवलं…. ज्ञानरूपी संस्कारांनी वाढवलं….. माझं जगणं समृद्ध केलं… आजही ही मराठी शाळा मुलांवर संस्कार करत आहे… मातृभाषेला जपत आहे….

म्हणून मातृभाषेचा सन्मान करूया आणि आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेतच घेऊया… मातृभाषेला जपूया तिचा सन्मान करूया एक प्रगल्भ माणूस म्हणून जगूया….

– सुसिमा थोरात, रत्नागिरी.

27/08/2023.

@All rights are reserved.

*धोंडा महिना…. पुरुषोत्तम मास*

यावर्षी 18 जुलै 2023 पासून अधिक श्रावण महिन्याला सुरुवात झाली व त्याची सांगता 16 ऑगस्ट 2023 रोजी झाली.या अधिक महिन्याला अधिक मास, पुरुषोत्तम मास, मलमास किंवा मराठवाड्यातल्या भागात या महिन्याला धोंडा महिना असेल म्हटले जाते….या महिन्यात जावयाला वाण देण्याची परंपरा फार वर्षापासून चालत आली आहे….मुलीच्या आई वडिलांना मुलगी व जावई हे लक्ष्मीनारायण वाटतात ,म्हणून त्यांना घरी बोलावून त्यांचा मानसन्मान करून त्यांना चांदीचे वाण दिले जाते ….

अधिकमासात जावई व मुलीला वाण देणे, त्यांना पोषाख घेणे ही परंपरा आजकाल आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते …..काही वर्षांपूर्वी फक्त लग्न झाल्यानंतर पहिल्या अधिक महिन्यातच अधिकवाण दिले जायचे, परंतु आता प्रत्येक अधिक महिन्यात वाण देण्याची परंपरा सुरू झाली आहे….

सध्या लग्न समारंभ, वाढदिवस ,डोहाळे जेवण, बारसे असे अनेक कार्यक्रम समाजामध्ये खूप मोठे साजरे केले जातात..समारंभांमध्ये खूप पैसे खर्च केले जातात ,कपडे ,दागिने यांची वारेमाप खरेदी केली जाते व दिखावा करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात..त्यामुळे या समारंभाचा मूळ हेतूच नष्ट होतो…. लोकांचे, नातेवाईकांचे मानपान रूसवे-फुगवे यातच समारंभ संपून जातो …

आज काल शिकलेल्या, सुशिक्षित लोकांना हे सर्व अवडंबर समजते..पण आपणही त्याचा आवाका किती वाढवावा हे आपल्यावर अवलंबून असते…या सर्व अशा प्रथांमध्ये ज्या चांदीच्या सोन्याच्या वस्तू भेट दिल्या जातात ,त्यांचा आपण किती उपयोग करतो हे प्रत्येकालाच माहीत असते.समाजाची आर्थिक साक्षरता ही वाढवण्याची गरज आहे …भरमसाठ कपडे, दागिने खरेदी करण्यापेक्षा तेच पैसे थोडे काटकसरीने वापरले तर त्यांची बचतही होऊ शकते… गरजेच्या वेळी त्यांचा उपयोग होऊ शकतो…

समारंभ साजरे करणारे लोक फक्त समारंभ साजरे करत नाहीत, तर त्या सर्व समारंभाचे फोटो व्हाट्सअप, फेसबुक अशा सोशल मीडियावर अपलोड करतात..त्यामुळे स्टेटस बघून लोकांमध्ये मोठे समारंभ साजरे करण्याची स्पर्धा लागते त्यामुळे या गोष्टीचे प्रमाण अजूनच वाढत जात आहे. हे सर्व समारंभ साजरे करण्यासाठी ज्या लोकांची, ज्या मुलीच्या आई-वडिलांची परिस्थिती नसते त्यांना हे सर्व शक्य नसते…त्यावरून मुलीला सासरचे लोकही त्रास देतील, या भीतीपोटी कर्ज काढून मुलीचे आई वडील सासू-सासर्‍यांचे,जावयाचे मानपान करतात…मुलीच्या मनाची अशा पद्धतीने आयुष्यभर कुचंबना होत राहते…म्हणून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी ,सध्या चालू असलेला अधिक मास अशा पद्धतीने न साजरा करता, या पुढचे अधिक मास अशा पद्धतीने साजरे न करता,अधिक महिन्यांमध्ये नात्यातील जिव्हाळा वाढावा, म्हणून मुलीला व जावयाला घरी ब बोलावून त्यांना शुभाशीर्वाद देऊन, त्यांचा माफक प्रमाणात मान सन्मान केला तरी पुरेसा असतो. त्यासाठी 33 अनारसे ,33 बत्तासे तसेच 33 म्हैसूर पाक वड्या अशा सच्छिद्र पदार्थांची व चांदीच्या भांड्यांची ,सोन्याच्या दागिन्यांची,कपड्यांची काहीच अपेक्षा, काहीच गरज नसते….

अधिक मास, धोंडा महिना या नावाने ज्वेलर्स वाल्यांचा, कापड दुकानदारांचा, बिझनेस भरभराटीला येतो. म्हणून अधिक महिना हा व्यवसाय वाढवण्यासाठी बहाणा ठरतो. सध्या चालू असणाऱ्या असणाऱ्या या अधिक श्रावण महिन्यात आपल्या सर्वांच्या जीवनात खूप सुबत्ता येवो..भरभराट होवो…. म्हणून अधिक महिन्यात सर्व अधिक न करता माफक प्रमाणात करावे हीच…हीच माफक अपेक्षा…

– सुसिमा थोरात.

18/08/2023.

@All rights are reserved.

*दिवस पहिला गणवेशाचा… *

शाळा सुरू होऊन एक महिना उलटला होता. नवीन वह्या, नवीन पुस्तके, वर्गात लावलेले रंगीबेरंगी तक्ते, चित्रे, नवे शिक्षक आणि या सर्वांना सामावून घेणारी नवीन शाळा….या सर्वांमध्ये नव्या नवलाईने इयत्ता पहिली मध्ये शिक्षणाच पहिलं पाऊल टाकणारा बालचमू…शाळेत खूपच खुश होता. नवी छत्री, नवा डबा, नवी बॅग सगळच कसं नवीन नवीन आणि छान छान !!!!या सर्व वातावरणात बालचमुचा उत्साह खूप होता. अगदी फुलपाखराप्रमाणे ही लहान मुले शाळेत बागडत होती….कमतरता होती, ती फक्त नवीन गणवेशाची..तो गणवेश मुलांना देण्यात आला .नवीन कोऱ्या गणवेशाची घडी सर्वच मुलांच्या हातावर देण्यात आली. सर्व मुले नवीन गणवेशाचा सुगंध घेऊन तृप्त होऊ लागली..गणवेशाच्या कापडाचा येणारा सुगंध अगदी महागड्या अत्तर पेक्षा सुद्धा खूप सुंदर आणि धुंद करणारा होता.

माझा मुलगा विवान ,त्याच्यासाठी सुद्धा सगळा हा अनुभव नवीनच होता ..अगदी सर्व मुलांप्रमाणे !!!घरी आल्या आल्या वर्दी मिळाली, “आई उद्या गणवेशात शाळेत जायचे आहे, “मलाही ऐकून खूप बरे वाटले,.गणवेश नव्हता तोपर्यंत रंगीबेरंगी कपड्यात शाळेत जाताना त्यालाही अनकम्फर्टेबल वाटणारे ड्रेस, यातून त्याची सुटका होणार होती…गणवेश घालून शाळेत जायचा दिवस उजाडला.. विवानने सातच्या अगोदर सर्व वैयक्तिक उरकले आणि विचारले ,”आई गणवेश घालू ??मी म्हटलं थोडं थांब शाळेत जाताना दहा मिनिट आधी गणवेश घाल.नाही तर तो खराब होईल.तोपर्यंत नेहमीचे कपडे घाल.शाळेत जाताना गणवेश घालायला घेतला, आरशासमोर उभा राहून महाशय गणवेश घालू लागले… सर्व बटणे लावली, आणि मला दाखवली तर सर्व बटनांचे अगदी वरपासून खालीपर्यंत Parajumble झाले होते..मला थोडे बघून हसू आले, त्याने मला सांगितले तू बटण लाव. मी सांगितले, “तुला स्वतःला बटणं लावता यायला हवीत “.मग दहा मिनिटांनी सर्व व्यवस्थित लावलेली बटणे मी पाहिली. बेल्ट बक्कल सर्वांचा सराव सुरू झाला. …डोक्याला तेल लावायला घेतले, तर त्याने मला अलमंड ऑइल लावण्याचा आग्रह धरला..”माझ्या केसांचा छान सुगंध आला पाहिजे ना!!!”.

मी विचार केला ,एवढ्या लहान वयात आपण रुबाबदार दिसावं, छान दिसावं, ही भावना लहान मुलांच्या मनात रुजते…किती छान वाटते!!!लहान मुलांची मने व वय संस्कारक्षम असते..”लहान मुल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते. “अशाच कित्येक मूर्ती मी समोर घडताना पाहत होते..ते माझे परम भाग्यच होते .घरी माझ्यासमोर घडणारी ही मूर्ती पाहून मलाही बरे वाटले..

नवीन गणवेश म्हणजे मुलांचा खूप आनंद असतो. सर्वांच्यात समानता, सारखेपणा दिसतो, एकोपा दिसतो, शिस्त दिसते, समूह भावना दिसते, श्रीमंती आणि गरिबी यातील दरी नाहीशी करणारा, हा गणवेश ….सर्वांमध्ये समानता निर्माण करणारा हा शालेय गणवेश, माझ्या लहानपणी सुद्धा माझ्या बालपणाचा खूप मोठा आधार होता …हे मला इथे प्रकर्षाने लिहावेसे वाटते, आवर्जून सांगावेसे वाटते ….

असा हा पहिला दिवस गणवेशाचा…खूप उत्साहाचा आणि आनंदाचा…..

-सुसिमा थोरात. 12/08/2023

@All rights are revesred.

@Image source – Google.

*माणसाने माणसाशी माणसासम वागणे… *

आज खूप दिवसांनी मनातलं काही लिहिण्यासाठी लेखणी हातात घेतली. सहज काहीतरी शोधण्यासाठी म्हणून पंधरा-वीस दिवसांनी बेडचा ड्रॉवर उघडला.पाहून थोडं धक्काही बसला आणि थोडं विचारातही पडले….सहा वर्षांपूर्वी नवीन घेतलेला मोबाईल, सध्या बॅटरी खराब झाली, बंद पडला, म्हणून नवीन मोबाईल घेतला आणि जुना ड्रॉवरमध्ये ठेवून दिला.त्याची अवस्था खूपच वाईट झाली होती.मोबाईलची बॅटरी फुगून त्याचे बरेच पार्ट वेगळे झाले होते. आता माझ्या हातात त्याहीपेक्षा छान आणि नवीन मोबाईल होता. मला त्या मोबाईलची बिलकूल गरज नव्हती..तो अडगळीत पडून होता, मी माझे काम नवीन मोबाईलवर कंटिन्यू करत होते..मनात विचार आला माणसाच्या आयुष्याचे हे असेच असावे नाही का??

कधीकाळी किंवा वीस दिवसांपूर्वीच नवीन मोबाईल घेण्याआधी, त्या जून्या मोबाईलला मी जीवापाड जपायचे ,पावसात भिजू नये ,हातातून पडू नये ,एवढेच काय कोणाच्या हातून चुकून जरी पडला ,तरी खूप चिडचिड व्हायची …..कारण माझे बरीच ऑनलाईन काम मोबाईलवर असायची …त्याला काही होता कामा नये..तो खराब होईल, तर खूप अडचणी येतील, म्हणून मी त्याला जपत होते..तो माझ्या सवयीचा भाग होता….सगळच त्याच्यावाचून अडत होत..

आपल्याला मदत करणारी ,आपल्याला आधार देणारी, माणस आपण जोडून ठेवतो..आपल्याला उपयोगी पडणारी माणसं आपण जपतो…पण जेव्हा आपली एखाद्याकडून गरज संपते किंवा आपली दुसऱ्याकडून गरज संपते तेव्हा आपणही त्याच्यासाठी अशीच एक अडगळ असतो किंवा आपल्या सुखदुःखाचं त्यांना काही देणंघेणं नसतं…आताच्या कलियुगात जग गरजेवर चाललंय..किंबहुना गरजच माणसाला जोडून ठेवते असेच म्हणूया ना..निकडच माणसाला सर्व गोष्टी करायला भाग पाडते ..आजकाल जग चालले ते गरजेवर चालले असं म्हणावं का??

आजकाल प्रेम, जिव्हाळा, माणुसकी हरपत चालली आहे…संपलीच म्हणू ना!!!!उरली आहे ती फक्त गरज! एखाद्याला आपली गरज असेल तर ती व्यक्ती आणि प्रेमाने बोलते, वागते, पण गरज संपली, की त्याच व्यक्तीला ओळख ही दाखवायला नकोसे वाटते….हा अडगळीत पडलेला मोबाईल या कलियुगातल्या गरजेचे मूर्तीमंत उदाहरण आहे..विश्वात सर्वच गोष्टींचा जन्म गरजेतून झाला आहे, हे जरी खरे असले तरी माणसाच्या आयुष्यात प्रेम, जिव्हाळा, माणुसकी, आपुलकी या गोष्टी माणसाच्या आयुष्याला जगण्याचं कोंदन देत असतात.भौतिक गोष्टींबरोबरच आयुष्य सावरण्यासाठी प्रेम, जिव्हाळा,माणुसकी या भावनिक गरजा ही खूप महत्त्वाच्या आहेत. या आपल्या भावनिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपल्या जिवाभावाची माणसं असतात..जी आपल्या आयुष्याच्या पाऊलवाटेवर अलवार कुसुमांचा सडा अंथरतात..आपल्याला दुखावत नाहीत..जपतात..अगदी आयुष्यभरासाठी….माणुसकी जपणे महत्त्वाचे आहे, जिव्हाळा जपणे महत्त्वाचे आहे , …

असा विचार करत असतानाच, मला माझ्या जवळच्या शाळेतील प्रार्थना चे शब्द कानावर पडले…

“हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे,

माणसाने माणसाशी माणसासम वागणे”….

अगदी या प्रार्थनेप्रमाणे… आयुष्याच्या शाळेत माणुसकीचा धडा शिकणे महत्त्वाचे…

– सुसिमा थोरात, रत्नागिरी.

15/07/2023

@All Rights are revesred,

@Image source – Google.

शुभेच्छा समारंभ निमित्त पत्र….

आदरणीय वरुडे मॅडम,

खरं तर सुरुवात कशी करावी, हेच समजत नाही.तुमच्या सेवानिवृत्ती, शुभेच्छा समारंभानिमित्त प्रथम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!! तुमचा आलेला एक कॉल हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. प्रत्यक्षात येणे शक्य नसले तरी, मी याक्षणी मनाने तुमच्या सोबतच आहे…

मॅडम, एवढ्या प्रदीर्घ काळ तुम्ही ज्ञानदानाचे पवित्र कार्य केलेत.. अनेक पिढ्या तुम्ही घडवल्यात.. तुमच्या हातून अनेक घडणाऱ्या मडक्यांपैकी मी एक मडके….. तुमची विद्यार्थिनी..तुमची विद्यार्थिनी या नात्याने मला तुमचा सार्थ अभिमान आहे….माझ्या नववीच्या वर्ग शिक्षिका, ‘वरुडे मॅडम’, माझा आदर्श तुम्ही आहात..नववीच्या रिझल्ट दिवशी माझा पहिला नंबर आल्याबद्दल तुम्ही खूप प्रेमाने मला पेढा भरवला, तो जिव्हाळ्याचा क्षण मी अत्तराच्या कुपीत बंद करून ठेवला आहे… त्या सर्व क्षणांचा सुगंध अजुन दरवळत आहे.मनाला सुखावत आहे…

सुकलेल्या निर्जीव रोपट्याला पाणी घातल्याने ते कसे टवटवीत होते.. असच माझ्या कोमेजलेल्या आयुष्यात तुम्ही ज्ञानरूपी , संस्कार रुपी पाणी घातल्याने ते अगदी टवटवीत झाले, सर्वार्थाने ते बहरले.. पुलकित झाले…तुमच्या अनमोल मार्गदर्शनामुळे मी आज एक शिक्षिका झाले, संघर्ष करून उभी राहिले…

मला आठवते मॅडम, माझ्या बालपणी इयत्ता तिसरीत असताना, मी एक भाषण केले होते…….’माझे गुरुजी ‘ …आमच्या गुरुजींची महती सांगणारे ते भाषण आणि मला धपाटे देऊन भागाकार शिकविणारे जाधव गुरुजी… प्रेमळ आणि समजूतदारपणे शिकविणारे मुख्याध्यापक माळी गुरुजी.. आज प्रत्येक क्षणी मी माझ्या विद्यार्थांना शिकवताना मला आठवतात… अगदी तसेच इंग्रजी विषयाचा प्रत्येक घटक शिकवताना , प्रत्येक तासाला मला तुमची आठवण प्रकर्षाने येते….

अजुन एक गोष्ट सांगावीशी वाटते, पुस्तकातले धडे गिरवायला, आशय सगळेच शिकवतात.. पण तुम्ही आम्हाला आयुष्याचा धडा गिर वायला शिकविले. नवीन वहीच्या पहिल्या पानावर एक वाक्य लिहायला तुम्ही नववीत सांगितलेले… “I will be successful in my life…” आजही माझ्या प्रत्येक वहीच्या पहिल्या पानावर हे वाक्य लिहिलेले असते. मी यशस्वी होत आहे मॅडम… अजुन होईल.

तुम्ही एक विद्यार्थिनी नव्हे, तर एक शिक्षिका घडवली आहे…जी पुढील येणाऱ्या प्रत्येक पिढीला तुमच्या ज्ञानाचा व संस्कारांचा वारसा देत राहील… तुम्ही दिलेले ज्ञान अमृत मी माझ्या विद्यार्थ्यांना देईल.. ती रोपे बहरतील यासाठी नक्की प्रयत्न करेन… अशी खात्री देते…तुम्ही खूप चांगले संस्कार माझ्यावर केलेत.. ..माझ्यात जे काही चांगले आहे ते सर्व तुमचे आहे…. खूप मोठ्या मनाच्या आहात तुम्ही… तुम्ही मला परिस्थितीच जाणीव करून दिलीत… आयुष्याची संकल्पना स्पष्ट केलीत…आज माझ्या आयुष्याचे रोप तुमच्या मुळे बहरले आहे… यामध्ये सिंहाचा वाटा तुमचा आहे… आज तुमचा सेवानिवृत्ती समारंभ आहे…ऐकून डोळ्यात पाणी तरळले….तुमच्या सोबत विद्यार्थिनी म्हणून केलेला सर्व प्रवास आपसूकच डोळ्यासमोरून गेला….

तुम्ही फक्त माझ्या मॅडमच नव्हे एक छान मैत्रीण झालात ,एवढच काय प्रसंगी एक आई झालात..यापलीकडे अजुन कोणता मोठा आनंद असणार आहे,???माझ्या आयुष्याला दिशा दिलीत. तुमचा पाठीवरून फिरणारा हाताचा आश्वासक स्पर्श मला खूप मोठे बळ देऊन गेला …

फक्त अध्यापन न करता आयुष्यातल्या बऱ्या ,वाईट परिस्थितीत एक चांगल्या मार्गदर्शिका तुम्ही बनलात…त्याच बरोबर प्रत्येक संकट क्षणी मला खूप आधार दिला , ऊर्जा दिलीत, कधीही न संपणारी संस्कार शिदोरी दिलीत.आयुष्यात ज्या वळणावर कलाटणी मिळते, तो क्षण तुमच्या मुळे माझ्या जीवनात आला…मला परिस्थिती ची जाणीव झाली… तो क्षण तुम्ही सावरला… त्याचमुळे मी आज कोणत्याही संकटात कोलमडून न जाता, सामर्थ्याने उभी आहे , उभ्या वादळात पाय रोवून धीराने न डगमगता उभी आहे…

तुमचे आभार कसे मानू,??? मी तुमच्या ऋणात राहणं पसंत करेन…ते जास्त आवडेल मला..तुमच्या सारख्या मार्गदर्शिका मिळाल्या… मी खूप भाग्य वान आहे.

“लाभले गुरु तुम्हासम मला या जन्मी,

आहे भाग्यवान मी राहीन तुमची ऋणी…”

आजही एवढेच सांगेन, आजही तुमचा आधार हवाच वाटतो…संकट खूप येतील , संघर्ष खूप आहे.. तुमचे मोलाचे मार्गदर्शन मिळत राहो.. अगदी याच जन्मी नाही, तर पुढचे सर्व जन्म मला तुम्ही शिक्षिका असाव्यात हीच एक आकांक्षा…

“आहात तुम्ही थोर, उपकार अनंत तुमचे,

लाभाल तुम्हीच शिक्षिका, हेच सदभाग्य माझे…”

तुमच्या विषयी किती लिहावे .. शब्द अपुरे पडतील…. यापुढे सेवानिवृत्ती नंतर जीवनात एक छान नवी सुरुवात असते.. तुम्हाला खूप दीर्घायुष्य लाभो.. आरोग्य ,सुख, समृद्धी, समाधान लाभो..आनंद लाभो… हीच ईश्वर चरणी प्रार्थना…

तुमची विद्यार्थिनी ,

सुसिमा थोरात.

28/01/2023

शुभेच्छा समारंभ निमित्त पत्र….

@ All rights are reserved.

श्रावण मासी हर्ष मानसी…

“श्रावण मासी हर्ष मानसी,

हिरवळ दाटे चोहिकडे,

क्षणात येते सरसर शिरवे,

क्षणात फिरुनी ऊन पडे.”

असे श्रावण मासाचे विलोभनीय व सुंदर वर्णन बालकवींनी केले आहे.. श्रावणमास आहेच असा.. सर्वत्र सृष्टी हिरवागार शालू नेसून अगदी नववधूप्रमाणे लाजून उभी असते.. संपूर्ण धरतीवर हिरवा गार गालीचाच अंथरलेला असतो जणू…. श्रावण मास म्हणजे सणांची रेलचेल असणारा महिना.अगदी सगळ्याच आबाल वृद्धांना हवाहवासा वाटणारा….

सृष्टी हिरवळीच्या नव्या नव्याने नटलेली असतानाच, त्या हिरवळीवर उमललेली निळसर, पिवळसर,लाल – गुलाबी,विविधरंगी फुलं मनमोहून घेतात.प्राजक्त, रातराणी, अनंत अशी कित्येक फुले मनापासून उमलतात …. पावसाच्या सरीवर सरी झेलून ती फुले अगदी लाजून चूर होऊन जातात… ती नाजूक लाघवी फुलं, गालातल्या गालात हसताना पाहून मन सुखावून जाते… त्याच नाजूक नाजूक, रंगबिरंगी फुलांवर विविधरंगी फुलपाखरे अगदी आनंदाने बागडताना पाहून मनाला एक विलक्षण सुख मिळते….

फुललेल्या पारिजाताकाचा सुंदर सडा अवनीवर पसरलेला असतो. पावसाच्या सरी वर सरी अंगावर झेलून तो प्राजक्तही अगदी धुंद होऊन जातो… पावसाच्या हलक्या सरी नंतर पडणारे कोवळे ऊन आणि त्या कोवळ्या उन्हासोबत अंगावर, तनामनावर शहारा आणणारी, वाऱ्याची अल्लड झुळूक मनाला किती सुखावून जाते ना!!!! ऊन पावसाचा सुंदर लपंडाव चालू असतो… निर्झर खळाळून वाहत असतात, आनंदाचे गाणे गात असतात…. खुल्या मनानं वाहतात…उंचावरून कोसळणारे फेसाळते,पांढरे – शुभ्र धबधबे मनातील भावना उचंबळून आणतात…मन तृप्त करतात.

पानाफुलांना फुटलेला हा बहर आणि पावसाच्या तुषारां बरोबर आकाशात साकारलेले, सप्तरंगी इंद्रधनु म्हणजे, एक अलवार नात्याची सप्तरंगी सुरुवातच नाही का??! सृष्टीचा हिरवा पेहराव अगदी मनाला मोहून टाकतो. याचवेळी उमललेली सुंदर, निरागस फुले गालातल्या गालात खुदकन हसताना पाहून किती निरागस वाटतात… अगदी पाळण्यात हसणाऱ्या निरागस बाळासारखी..!!.

सणसमारंभाची रेलचेल असणाऱ्या या महिन्यात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, स्वातंत्र्य दिन, गोपाळकाला, गणपती उत्सव असे सण पाठोपाठ येतात.. याच महिन्यात माहेरवाशीनी मंगळागौरीची पूजा देखील करतात. सौंदर्याने आणि लावण्याने नटलेल्या या श्रावण महिन्यात निसर्गाची प्रीती अशी फुलून येते की निशब्द भाव दिसतो… मन स्तब्ध होते, सृष्टीचे सौंदर्य पाहण्यातच दंग होते…..

निळसर रंगाचा बरसणारा निळा घन मनाला खूप आनंद देऊन जातो…. रंगांची उधळण करणारा रंगारी श्रावण महिना अगदी हवाहवासा वाटतो.. वर्षा ऋतूत आनंदाची उधळण करणारा श्रावण , ओल्या धुंद सरी बरसवून सृष्टीला अक्षरशः प्रेमाने आणि वात्सल्याने न्हाऊ घालतो…. म्हणूनच मंगेश पाडगावकर म्हणतात,…

” श्रावणात घननिळा बरसला,

रिमझिम पाऊस धारा…”

– सुसिमा थोरात.

11/08/2022.

@All rights are reserved.

@Image source – Google.

*हरवलेली अंगणं*

*हरवलेली अंगणं*

आज माझ्या आजीचे एकविसावे पुण्यस्मरण.. आजीच्या आठवणीने डोळ्यात नकळत अश्रू तरळले….. त्याचबरोबर प्रकर्षाने आठवण झाली ती घरासमोरच्या अंगणाची… माझी आजी आणि आमचा नातवंडांचा बराचसा वेळ अंगणात जात असे. आमची आजी आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी- गाणी या अंगणात बसून शिकवायची… स्वभावाने कडक शिस्तीची आणि करारी असणारी आजी, पूर्ण कुटुंबासाठी, घरादारासाठी राबली..नातवंडांवर संस्कार करायला राबली. अंगणात वेगवेगळी झाडे कडेने लावली होती… झाडांच्या सावलीत आम्ही खेळत असू.एकत्र कुटुंब पद्धतीमुळे, आम्ही आठ जण भावंड होतो. या अंगणाचा सहवास आम्हाला खूप काळ मिळाला. शाळेचा वेळ सोडला तर बराच काळ… उन्हाळ्यात जेवायला,अगदी झोपायला सुद्धा घरचे सारे लोक अंगणात असत.. छान शेणाने सारवलेल्या अंगणात मऊ स्पर्श आजही मला जाणवतो..अंगावर शहारे आणतो.या सुंदर अंगणात पावित्र्याचे प्रतीक असणारी सुंदर रांगोळी,माझी आई रोज तुळशी वृंदावना समोर रेखाटत असे… नंतर कित्येक दिवस ते काम मी खूप आनंदाने करत होते….कदाचित या रांगोळीत रंग भरण्याच्या सवयीमुळे मी माझ्या आयुष्यात छान रंग भरू शकले…

आज फ्लॅट संस्कृती आली, नोकरी कामाच्या निमित्ताने शहरात स्थायिक व्हावे लागते. तिथे कुठून येणार अंगण??? आजकाल म्हणून अंगणं हरवत चालली आहेत… काही वर्षांपूर्वी अंगण हे घराची शोभा असायचं.. खेडेगावात अजूनही अंगणाचे महत्त्व तेवढेच आहे. घरातील गृहिणी लवकर उठून सडा – रांगोळी करतात…

“फूठे क्षितिज तांबडे जोन थोडे,

तोच जागे होतसे सर्व खेडे,

उठून गृहिणी लगबग अंगणात,

सडा-सन्मार्जन करीत राहतात..”

या उक्तीप्रमाणे अंगणाचे महत्त्व आहे… पहाटे उठून सर्व मंडळी आपले आन्हिक उरकून कामाला लागतात. शहरात मात्र सूर्य केव्हा उगवतो? हेच समजत नाही.

बालपणीचे माझ्या अंगणाच्या आठवणी माझ्यासाठी अविस्मरणीय आहेत. मी त्या आठवणी अत्तराच्या कुपीत बंद करून ठेवल्या आहेत. माझ्या या अंगणाच्या आठवणींचा सुगंध नेहमी आयुष्यभर माझ्याभोवती दरवळत राहील.. वेगवेगळे खेळ आम्ही अंगणात खेळत असू. चंद्रप्रकाशात गाणी, गप्पा होत असतात. गाण्याच्या भेंड्या, कथा,पाढे पाठांतर, अशा किती आठवणी आमच्या अंगणा सोबत आहेत…. आमची आजी आम्हाला विविध संस्कार कथा सांगत असे. अंगणात छान तुळशी वृंदावन होते. त्याच तुळशी वृंदावनातील दिव्यासमोर आम्ही शुभंकरोती, गणपती स्त्रोत, मारुती स्त्रोत, पसायदान आणि रामरक्षा म्हणत असू. माझ्या घरच्या अंगणाने मला किंबहुना आम्हाला खूप काही दिले… माझ्यावर संस्कार केले, मला सोबत दिली. आमचं अंगण आमच्यासाठी एक शांत विसावा होतं…अंगण हे घराचं आभूषण होत…

आताच्या काळात ना एकत्र कुटुंब पद्धती राहिली, ना अंगणं…. फ्लॅट संस्कृतीत होणार कोंडमारा असह्य होत आहे.. तिथेच गॅलरीत छोट्या कुंड्या ठेवून, तुळस लावून,आम्ही अंगण शोधण्याचा प्रयत्न करतो.. पण घरच्या त्या अंगणातले सुख होते, ते जगातल्या कोणत्या फ्लॅटमध्ये मिळणार नव्हते.. हे कळून चुकले मला….

भविष्यात अंगणं किती उरतील?? हा ही एक संशोधनाचा प्रश्न!! पण अंगण हरवत चालले आहे! हे मात्र निश्चित.ती व्यक्ती खरच नशिबान असेल जिच्या घराला छान अंगण आहे….. तिच्यासाठी असणारा तो शांत विसावा आहे… घराची आणि कुटुंबाची सोबत असणारे,घराची शोभा असणारे व घराचे पावित्र्य जपणारे हे अंगण, प्रत्येकाच्या नशिबी असो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!….

– सुसिमा थोरात.

28/07/2022.

@Image source – Google.

@All rights are reserved.

*हर घर तिरंगा*

*हर घर तिरंगा*

राष्ट्रध्वज आहे राष्ट्रीय प्रतीक, भारत देशाचे,

सन्मान राखून तिरंग्याचा, महत्त्व वाढवू तयाचे.

तिरंगा ध्वज संहितेचे, पालन आपण करूया,

झेंडा फडकविण्याचे नियम, सगळे मिळून पाळूया.

केशरी रंग प्रतीक त्यागाचे, वरती सर्वात असावा,

चुरगळलेला, फाटलेला तिरंगा कधीच नसावा.

सन्मानाने फडकवू तिरंगा, सलाम तयाला करूया,

सूर्योदयापासून – सूर्यास्तापर्यंत, फडकता ध्वज ठेवूया.

तिरंगा ध्वज आहे, सन्मान आपल्या भारताचा,

नका करू अच्छादनासम इमारतीच्या, वापर तयाचा.

‘हर घर तिरंगा’ अभियान आपूले, अभिमान तिरंगा आपूला,

राष्ट्रभक्ती अंगी बाणविने, आहे बाणा आपुला.

आदर्श या अभियानात, सामील सगळे होऊया,

उंचावेल भारताची जगात मान, कार्य असे करूया.

प्रत्येक घराघरात तिरंगा, अभिमानाने फडकवू या,

अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा, साजरा आनंदाने करूया.

– सुसिमा थोरात.

24/07/2022

@Image source – Google.

@ All Rights are reserved.

*सांजवात*

*✤______________________________✤*
*╭═══════════════════╮*
*●सांजवात ●*
*╰═══════════════════╯*
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹
*○सांजवात○*

तिन्हीसांज झाली होती. घरातल्या देवाला निरांजन लावले आणि मी गॅलरीत थोडा वेळ जाऊन उभी राहिले. अंधार पडायला सुरुवात झाली होती. गॅलरीतून समोर एक बंगला दिसत होता, त्या बंगल्यासमोर एक सुंदर वृंदावन होते. एवढ्या मोठ्या बंगल्याची शोभा ते वृंदावन वाढवत होते. छोटेसे असूनही रुबाबात उभे असणारे वृंदावन; त्या बंगल्याच्या असण्याला अर्थ प्राप्त करून देत होते.

दररोज वृंदावनासमोर एक दिवा तेवत असायचा… वाऱ्याची झुळूक आली की, त्याची ज्योत हळुवार हलत होती… रोज तिन्ही सांजेला तो दिवा पाहत राहणे; हा माझा नियमच झाला होता.. एवढ्या वाऱ्या- पावसातही आडोशाला तो तेवत होता… मला त्याच्या या गुणाचे कौतुक वाटले… दिव्यातील तेल असेपर्यंत अगदी निस्वार्थीपणे, निर्विकारपणे तो जळत होता.. आणि वृंदावनाची शोभा वाढवत होता.. अंधाराचे साम्राज्य नष्ट करून प्रकाश आणत होता….

माणसाच आयुष्य काहीस असच असावं नाही का? इतरांच्या आयुष्यात सुख- समाधान आणण्यासाठी अखंड प्राणज्योत मालवेपर्यंत कष्ट करावे, त्याच वेळी माणसाचा जन्म सार्थकी लागतो. जन्म आणि मृत्यू या दोन क्षणांमधील आयुष्य आपण स्वतःपेक्षा जास्त इतरांसाठी जगावं… अगदी या दिव्याप्रमाणे…. इतरांच्यासाठी आयुष्य वेचणारे कित्येक जण आज देशाच्या किंबहुना, जगाच्या इतिहासात अजरामर झालेत…असेच आयुष्य असाव इतरांच आयुष्य प्रकाशित करणारं….. स्वतःसाठी सारे जगतात, पण थोडं इतरांसाठी जगून पाहिलं, तर तो आनंद काही वेगळाच असतो… त्यासाठी अंतरीचा दिवा सतत ठेवायला हवा..

तुकाराम महाराजांनी म्हटलेच आहे नाही का..

” जे का रंजले गांजले,त्यासी म्हणे जो आपुले,

तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा.”

अंधार पडल्यावर प्रकाश आणण्यासाठी दिव्याप्रमाणे तेवणारे जीवन असावे… जसे की ‘बाबा आमटे’ ,’मदर तेरेसा , सिंधुताई सपकाळ…..अशी कितीतरी नावे आपल्याला सांगता येतील.. आपण आपल्या परीने प्रयत्न करत राहायचे, करता करविता परमेश्वर आपल्या प्रयत्नांना यश दिल्याशिवाय राहणार नाही…..

-सुसिमा थोरात.
12/07/2022.
@Image source – Google.
@All rights reserved.

🍃🌹🍃🌹🍃🌹 🍃🌹🍃🌹🍃
*╰✤▬●❂❃۩▪️S▪️ ۩❃❂●▬✤╯*
╰════════════════╯