*सुंदर हात…*

मागच्या आठवड्यात वर्गात सुंदर हातांच्या स्पर्धा होणार असे सांगितले होते. स्पर्धेची तारीख जवळ येत चालली… गुरुवारी स्पर्धा होणार होत्या माझी तर काहीच तयारी नव्हती… पहाटे लवकर उठले एकदा स्वतः स्वतःच्या हाताकडे पाहिले आणि मनात विचार केला… बाकीच्या माझ्या मैत्रिणीची तयारी झाली असेल का?? ‘सुंदर हातांच्या स्पर्धेसाठी’ …..

क्षणभर विचार केला आणि पटकन उठून अंगणात सडा सारवण टाकण्यासाठी शेण घेऊन आले आणि अंगण स्वच्छ झाडले, शेणाने सारवून घेतले, त्यावर सुंदर रांगोळी रेखाटली…अगदी मनाला हवे तसे मनाला भावतील असे सुंदर रंग रांगोळीत भरले…

आईचे जेवण बनवून झाले होते…चूल उकनली होती. ती व्यवस्थित लिंपली आणि सारवून घेतली. आईने जेवण बनवून खरकटी भांडी बाहेर आणून ठेवली. राखेने भरभर भांडी घासून ,धुवून घेतली… आईलाही मजुरीला जायचे होते. आंघोळ, देवपूजा वगैरे सर्व आवरून झाल्यावर सारवलेल्या चुलीला हळद-कुंकू वाहिले… अंगण किती छान दिसत होते आता..अंगणाच्या बाजूला असणारी चूल साक्षात अन्नपूर्णेचे चे प्रतीक होती….

आवरून, भाकरी – पिठले डब्यात भरून घेतलं.. आईने दोन छान वेण्या बांधून दिल्या चप्पल पायात सरकवली, दप्तर पाठिवर टाकून मी धावतच शाळेत निघाले… मनात विचारांची खूप गर्दी होत होती. स्पर्धेसाठी माझी काहीच तयारी नव्हती.. पंधरा मिनीटात शाळेत पोहोचले … वर्गात जाताच कानावर आवाज पडला… “माझी मेहंदी बघ ना! किती सुंदर आहे? नंबर तर माझाच येणार” वीणा बोलत होती. तोपर्यंत मुग्धा म्हणाली.. “माझे नेलपॉलिश बघ फॉरेन वरून मागवले आहे, माझ्या दीदीने पाचशे रुपयांचे! आहे, किती छान आहे नंबर तर माझाच येणार”!! अशी चर्चा चालू असताना, रोज पहिल्या बाकावर बसनारी मी आज शेवटच्या बाकावर कोपऱ्यात जाऊन बसले….

प्रत्येक मुलीने आपल्या हातावर सुंदर मेहंदी रेखाटली होती. छान नेल पॉलिश लावले होते. मी मात्र माझ्या काळवंडलेल्या हाताकडे बघतच राहिले.. नकळत माझ्या डोळ्यात पाणी उभे राहिले…. बाई वर्गात आल्या आणि त्यांनी स्पर्धा लगेचच होईल असे सांगितले.बाईंनी पहिल्या बाकापासून हात बघायला सुरुवात केली… सर्वांचे हात बघून झाल्यावर बाई माझ्या जवळ आल्या, माझ्या दोन्ही हातांनी मी चेहरा झाकून घेतला आणि स्फुंदू लागले …. बाई म्हणाल्या अनघा तुझे हात दाखव बरं… काय झालं??? मी उभे राहिले बाईनसमोर हात धरले ….माझे उन्हाने काळवंडलेले परिस्थितीने कृश झालेले हात बाईंनी बघितले आणि विचारले,” तू काहीच नाही का तयारी केली सुंदर हातांच्या स्पर्धेसाठी??”

मी धीर एकवटला,डोळे पुसले… मी बोलू लागले, “बाई आम्ही परिस्थितीने खूप गरीब आहोत, आम्ही छपरात राहतो,आई-बाबा मजुरीचे काम करतात. माझी आई मजुरीचे काम करत असल्याने मलाही घरी काम करावे लागते. जिथे आम्हाला पोटभर अन्न मिळत नाही, तिथे या सगळ्या वस्तू आम्ही कशा विकत घेणार?? शाळेत येण्यापूर्वी, शाळेतून गेल्यावर मला कामात मदत करावी लागते..मग अभ्यास करावा लागतो.. सकाळी लवकर आवरून सडा-सारवण करावे लागते. राखेने भांडी घासावी लागतात. परिस्थितीने काळवंडलेल्या सडा-सारवण करणाऱ्या, काम करणाऱ्या माझ्या हातांना लावायला मला कसं मिळणार नेल पॉलिश आणि मेहंदी??”

एवढे बोलल्यावर पुन्हा माझ्या डोळ्यातील अश्रुंचे थेंब पटापट माझ्या हातावर पडू लागले…. बाईंनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. खूप आश्वासक स्पर्श होता तो…बाई पुढे गेल्या आणि म्हणाल्या या स्पर्धेचा निकाल आता मी जाहीर करणार आहे. सगळेजण शांत बसले. मुख्याध्यापिका मॅडम वर्गात आल्या सगळ्या मुली आतुरतेने निकालाची वाट पाहू लागल्या. प्रत्येकीला वाटत होते माझाच नंबर येणार ,मी स्पर्धा जिंकणार. मी मात्र यामध्ये कुठेच नव्हते. थोड प्रास्ताविक उरकून बाईनी निकाल जाहीर केला…” या स्पर्धेची विजेती आहे अनघा अनिल जाधव” सगळ्या मुली डोळे विस्फारून, आश्चर्याने पाहू लागल्या.. बाईने मला पुढे बोलावले आणि स्पर्धेचा चषक मुख्याध्यापिका मॅडम कडून मला बहाल केला.

बाई बोलू लागल्या,” नेल पॉलिश आणि मेहंदी लावून हात कधीच सुंदर होत नसतात, सुंदर हात होण्यासाठी कष्ट करावे लागतात… सडासारवण करणारे हात.. सुंदर रांगोळी काढणारे हात.. चूल लिंपणारे हात.. अन्नपूर्णेची पूजा करतात.. सुंदर हस्ताक्षर काढतात.. तेच हात सुंदर असतात.. अशा सुंदर हातांचे स्पर्धेत अनघा विजय ठरली आहे ,तर त्यात नवल काहीच नाही.. तिचे मनापासून अभिनंदन.. आपण प्रत्येकाने सुंदर हात बनवायला हवेत… कष्ट करून… बाई थांबल्या,टाळ्यांचा कडकडाट झाला. आज खऱ्या अर्थाने किंबहुना सर्वार्थाने सुंदर हात कसे असतात ,हे मला समजले होते आणि उमगलेही…..

– सुसिमा थोरात

@Image source – Google

@ All rights are reserved.

https://susima.home.blog/2022/06/17/सुंदर-हात/

*ती अबोली…*

*✤______________________________✤*
*╭═══════════════════╮*
*● *ललित लेख*
*╰═══════════════════╯*
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹

मागच्या पावसाळ्यात मी माझ्या अंगणातल्या परसात अबोलीच एक छान रोप लावलं….परसबागेत अनेक रोपे लावली, पावसाळ्यात त्या रोपट्यांना पाणी देण्याची गरज भासली नाही… पावसाच्या पाण्यावर ती रोपे छान तरारून वर आली… पावसाळा संपल्यावर मात्र त्यांना पाणी घालण्याची गरज भासू लागली..त्यानंतर मात्र एक आड एक दिवस पाणी घातल्यावर ते कुंडीतील रोपटे चांगले वाढू लागले… वाऱ्याची झुळूक आली की ते वाऱ्याबरोबर भुर भुरायचे, वाऱ्याबरोबर डोलायचे…. या वर्षीच्या उन्हाळ्यात त्या अबोलीच्या बारीक कळ्या वर दिसू लागल्या.. काही दिवसातच खूप छान पिवळ्या रंगाची नाजूक फुले त्या रोपट्याला आली…

उन्हाच्या झळा वाढत होत्या.. उन्हानं अंगाची काहिली होत होती… उन्हाच्या झळामुळे ते रोपटे मलूल होऊ लागले.. उन्हाच्या तडाख्याने ती फुलेही कोमेजू लागली… पाने पिवळी पडू लागली.. मी त्या रोपाला हलकासा पाण्याचा शिडकावा दिला…तसे ते रोप एकदम शहारुन निघाले.. गार पाण्याच्या थेंबाच्या होणाऱ्या शिडकाव्याने ते खुप खुप सुखावलं.. पुन्हा टवटवीत झालं ..आणि ते छान गालातल्या गालात हसू लागल…आता मात्र मी ठरवलं होतं त्या रोपाला दिवसातून दोन वेळ पाणी घालायचं…परसातील सर्व झाडांना पाणी घालून झाल्यावर पुन्हा मी त्या रोपाला पाणी घालायचे… दिवसातून दोन वेळा पाणी दिल्यावर ते रोपटे अधिकच तरारू लागलं, बहरू लागलं…. एक दोन म्हणता-म्हणता फुलांनी बहरून गेलं.. सुखावलं.. या रोपालाही आपली फुलं पाहून मनातून खूप आनंद झाला.. ते रोपही आपली फुले पाहून सुखावल…

मनात विचार आला माणसाच्या आयुष्याचही असंच काहीसं असावं नाही का??? माणसाच्या आयुष्याला ही प्रेमरूपी पाण्याचा शिडकावाची मायेची आपुलकीची आणि जिव्हाळ्याची गरज असते.. तरच ते मानवी आयुष्याचे रोपटे बहरेल… आपण लावलेल्या रोपाला आपण दिलेल्या प्रेमरूपी पाण्याने, आपुलकीच्या निगराणीमुळे आलेली सुंदर फुले खरच खूप सुंदर आणि मनमोहक … असतात..आनंद देणारी असतात.. असच काहीसं असतं माणसाच आयुष्य.. त्याला दिलेल्या प्रेमरूपी पाण्याच्या शिडकाव्याने, निगराणीमुळे माणसाच्या आयुष्याचे रोपटे बहरेल.. सर्वांना आनंद देईल..बघणाऱ्यालाही आनंद देईल… दाही दिशांना सुगंधाची उधळण करेल… मनाला प्रसन्न बनवेल… तरच त्या रोपाला सुंदर आणि मनमोहक फुले येतील आणि सर्वांना आनंद देतील.. अबोल आणि शांत राहून ती अबोली किती मदमस्तपणे आयुष्याचा आनंद घेत होती… तसाच आनंद आपल्या आयुष्यात आपल्याला घेता येईल…अगदी मनमुरादपणे… पण त्यासाठी हवे असणारे प्रेम परमेश्वराने कोणाच्या ना कोणाचा रूपाने आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात नक्की पाठवावे.. मग सर्वांचेच आयुष्य किती सुंदर आणि शांत होईल, छान होईल…अगदी त्या मनमोहक अबोलीप्रमाणे…..

-सुसिमा थोरात.

*ती अबोली…*

@All rights are reserved

19/04/2022
🍃🌹🍃🌹🍃🌹 🍃🌹🍃🌹🍃
*╰✤▬●❂❃۩▪️S▪️ ۩❃❂●▬✤╯*
╰════════════════╯

*फिरता संसार…*

*✤______________________________✤*
*╭═══════════════════╮*
*● सामाजिक ●*
*╰═══════════════════╯*
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹
*○फिरता संसार○*

रस्त्याकडेला उघड्यावरच त्यांनी आपला संसार थाटला होता. पेटलेला कोळसा त्याला एक सारखा फिरत्या यंत्राने वारा मिळत होता, त्याची उष्णता अजूनही वाढत होती. लोखंडाला त्या कोळशाच्या लालभडक निखाऱ्यावर गरम करून सपाट दगडावर तो ठेवत होता, ती त्याच्यावर तो सांगेल तसे घाव घालत होती. आपले उन्हाने रापलेले चेहरे, काळवंडलेली त्वचा आणि उन्हामुळे घामाच्या वाहणाऱ्या धारा, अशा अवस्थेत ती हातोड्याने त्या लोखंडावर जोर लावून घाव घालत होती. शेजारीच झोळीत एक तान्हं मूल झोपेल होतं… त्याच मोठं भावंड त्याला झोका देत होतं. तेल न लावलेले तांबडे, भूरके, विस्कटलेले केस अंगावर मळलेले, फाटके कपडे .कुपोषण झाल्याने खपाटीला गेलेलं त्या मुलाचं पोट.अशक्तपणामुळे कृश झालेलं त्या मुलाचं शरीर त्याच्यावर असणाऱ्या परिस्थितीची प्रकर्षाने जाणीव करून देत होतं.

त्याची बायको घावावर घाव घालत होती लोखंडाला घडवत होती. डोक्यावर पदर, खाली कमरेपासून घागरा आणि वरती कोपरापर्यंत लांब ब्लाऊज, हातात प्लास्टीकच्या भरपूर बांगड्या, पायात मोठ्या डिझाईनचे पैंजण, तळवे भाजू नयेत यासाठी नावापुरताच असणार तिच चप्पल.. नाकात मोठी अडकवलेली रिंग,त्यामध्ये ओवलेले रंगीत मणी.. काळवंडलेला चेहरा ..असे काहीसे तिचे रूप..

असे असले तरी तिच्या चेहऱ्यावर दुःखाचा बिल्कुल लवलेश नव्हता….उन्हाने रापलेला काळवंडलेल्या चेहर्‍यावर एक विलक्षण समाधान होते, मेहनत करून कष्टाची भाकरी मिळ्वून खाणे.. यात एक विलक्षण सुख असतं समाधान असतं, त्याच समाधानाची पोचपावती मला त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर दिसत होती..

आज या गावी तर थोड्या दिवसांनी दुसऱ्याच गावी, ते फिरत होते.. त्यांना एका जागी स्थिर होऊन जगणेच माहीत नव्हते.. गावोगावी फिरता असा त्यांचा संसार होता.

परिस्थिती कशीही असेल तरी,त्यामध्ये आनंदात आणि समाधानात कसे राहावे याचा सुंदर पाठ ती स्त्री जगाला देत होती…बिकट प्रसंगाला तोंड कसे द्यावे?? हे शिकवत होती… परिस्थिती पुढे हार मानत नव्हती… अशा उन्हाच्या झळांनी होणाऱ्या काहिलीत ती वीतभर पोटाचे खळगे भरण्यासाठी श्रमत होती…. सामान्य माणसाला संदेश देत होती.. मेहनत करा.. आयुष्य सुंदर आहे…

– सुसिमा थोरात

@Image source – Google.
@ All rights reserved.

https://susima.home.blog/2022/03/16/फिरता-संसार/

16/03/2022
🍃🌹🍃🌹🍃🌹 🍃🌹🍃🌹🍃
*╰✤▬●❂❃۩▪️S▪️ ۩❃❂●▬✤╯*
╰════════════════╯

*क्षण एक पुरे प्रेमाचा…*

*✤______________________________✤*
*╭═══════════════════╮*
*●ललित लेख ●*
*╰═══════════════════╯*
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹
*○ क्षण एक पुरे प्रेमाचा ○*

आभाळात खूप मळभ दाटलं होतं.. मनात उदासीनता दाटून आली होती… काय करावे , काही समजत नव्हते.. उगीचच मन खट्टू होऊन गेले आणि भूतकाळात डोकावण्याचा प्रयत्न करू लागले… मी एक मनाशी खूणगाठ बांधली होती…आता जुने दुःख विसरून जायचे…जुन्या, दुःखद आणि वेदनादायी आठवणींचं गाठोडं बांधून मी दूर समुद्रात फेकून दिले होते आणि मला आता तिकडे बघायचंही नव्हतं…. पुन्हा एकदा तो कटू भूतकाळ न आठवण्याचा निर्धार करून मी बाहेर आले…. आभाळाकडे मूक मनाने पाहिले…

शाळा सुटायला थोडा वेळ होता.शाळेच्या प्रांगणात सायंकाळच्या वेळी मुले आनंदात बागडत होती. शाळा सुटण्याची वेळ झाली आणि शाळा सुटली. सगळी पाखरे घराच्या ओढीने आपल्या घरी आपापली दप्तरे घेऊन निघून गेली. शाळेतील पाखरांचा किलबिलाट थांबला… सगळीकडे नीरव शांतता पसरली. मीही घरी जायला निघाले. गाडी गेटमधून बाहेर काढली. गेट बंद करून घेतलं… दहा मिनिटे पुढे गेल्यावर जाणवले, वातावरणात एक वेगळाच थंडावा आहे. मातीचा धुंद करणारा सुगंध आसमंतात पसरून गेला होता…. रस्त्याच्या दोन्ही कडा ओल्या झाल्या होत्या… झाडे शहारली होती….हो! … पाऊस पडून गेला होता…

खूप दिवसांनी… उन्हाच्या झळांनी होरपळलेली तप्त धरणीमाता तिचा उसवा निघाला…एवढ्या दिवस पावसाची वाट पाहणारी तप्त धरणी काही अंशाने का होईना तृप्त झालेली…..थंड झालेली. झाडे ,लता ,वेली चिंब भिजलेल्या, ओल्या झाल्या होत्या. मागच्या दोन दिवसापूर्वी वणव्यामधे पेटलेल्या एका उंच झाडाच्या बुंध्यातून अजून धूर निघत होता… काही झाडे बहरलेली असताना वणव्यात बुंधे जळून मोडून पडली होती…

मी विचार केला, अगदी असंच नाही का माणसाच्या आयुष्यात चिंता माणसाला जिवंत असताना मनाने आतून जाळून टाकते, तर चिता माणसाचे शरीर मृत झाल्यावर जाळून टाकते…. दोन्हीत फक्त अनुस्वाराचा फरक … चिंतेमुळे माणसाचे बहरलेले उभे आयुष्य उन्मळून पडते…अगदी वणव्यात धूपत जाणाऱ्या त्या झाडाप्रमाणे….!सर्वांना गारवा, सावली देणारे, फळे देणारे, बहरलेले झाड क्षणार्धात मोडून पडले… त्या वणव्यामुळे…..

मनाशी मी ठाम निश्चय केला, आता कसलीच चिंता नाही करायची…..काहीच कटू, जुने नाही आठवायचे…

अगदी केशवसुतांनी म्हणल्याप्रमाणे,

” जुने जाऊ द्या मरणा लागुनी,

जाळूनी किंवा पुरूनी टाका”…

आपल्या आयुष्यात जे क्षण येतील ते खूप आनंदाने आणि मजेत जगायचे. अगदी फुलाप्रमाणे…. ते फुल आपल्या छोट्या आयुष्यात इतरांचे आयुष्य आनंदी आणि सुगंधित करण्याचा प्रयत्न करते…. अगदी तसेच.

आणि कोणास माहित कधी वरचे तिकीट निघेल???? आणि सगळेच निशब्द होईल… गोविंदाग्रजांनी म्हटलेच आहे…..

” क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणांचा”

प्रेमाचा एक क्षण माणसाला जगण्याची नवी उमेद देऊन जातो, आशेचा किरण देऊन जातो … सगळी दुःख विसरायला लावतो…प्रेमाच्या दोन गोड शब्दांनी दुःखी माणसाच्या मनातील दुःखाचा वणवा विझून जातो. मनाला गारवा देऊन जातो.म्हणूनच येतील ते क्षण आनंदात जगू या, आणि इतरांनाही त्यांच्या जीवनही आनंदी आणि सुगंधित करण्याचा प्रयत्न करूया…..

– सूसिमा थोरात.
@All rights are reserved.
@Image source – Google.

https://susima.home.blog/2022/03/11/क्षण-एक-पुरे-प्रेमाचा/

11/03/2022
🍃🌹🍃🌹🍃🌹 🍃🌹🍃🌹🍃
*╰✤▬●❂❃۩▪️S▪️ ۩❃❂●▬✤╯*
╰════════════════╯

*चाहूल वसंताची…*

*✤______________________________✤*
*╭═══════════════════╮*
*●चाहूल वसंताची●*
*╰═══════════════════╯*
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹
*○○*

सूर्योदयाची वेळ कशी सर्वांनाच आवडणारी…, हवीहवीशी वाटणारी…कोकिळा आर्त स्वरात गात होती.. धूक्याची मऊशार पांढरी दुलई सृष्टीने पांघरली होती… सकाळचा धुंद करणारा थंड वारा अंगाला हळुवार, अलगद,स्पर्श करून गुदगुल्या करून जात होता… माडाची झाड हातात हात घालून निर्विकार पणे उभी होती… सुर्याचे लालभडक बिंब पुर्वेकडून हळूहळू वर डोकावत होते, खूप अविस्मरणीय,रमणीय आणि विलक्षण दृश्य होते ते. बगळ्यांच्या माळा उडत उडत पूर्वेला जात होत्या. मधेच कबुतरांचा एखादा थवा गोल गिरकी घेऊन उंच उडत होता.पक्षांचा किलबिलाट मनाला खूप सुख देत होता.सूर्याचे तेज वाढेल, तसे चंद्राचे तेज कमी होत होते. चंद्र परतीच्या प्रवासाला निघाला होता नि सूर्य उगवतीच्या…हा अनंताचा सोबती वर्षानुवर्षे अखंडितपणे या जगाचे सेवा करतो आहे.. उगवणे आणि मावळणे हाच त्याचा धर्म. किती प्रामाणिकपणे सेवा करत होता तो जगाची आणि करतच आहे.

परमेश्वराने निर्मिलेल्या कितीतरी छान गोष्टी पैकी एक सुंदर,मनोहर गोष्ट म्हणजे वसंत ऋतू… वसंत ऋतूची चाहूल होती ही… झाडे मोहरण्याच्या तयारीत होती, हिरवी , कोवळी पालवी प्रत्येक झाडाच्या शेंड्याला डोकावण्याचा प्रयत्न करत होती. आंबे, काजू मोहरले होते… त्या मोहराचा सुवास धुंद करून टाकत होता. कुंदाची फुलेही पानातून आडून बघत होती.. पारिजातकाच्या फुलांचा सडा रस्त्यावर पडला होता. असं मनापासून वाटत होतं हा फक्त माझ्यासाठीच फुलला आहे..पळसाच्या फुलानी पाकळ्यांचा सुंदर गालीच्या पायवाटेवर अंथरला होता ..मनात वाटलं फुलांना झाडापासून गळून पडताना दुःख तर होत नसेल?? फुलांचे जगणेच मुळी दुसऱ्यासाठी.. निस्वार्थी, निरपेक्ष भावनेने ती फुलतात आणि कोमेजून ही जातात…

पांढर्‍याशुभ्र धुक्यातली ती पहाट, झाडाला फुलणारी ती कोवळी, पोपटी, तपकिरी पालवी अक्षरशः मनाला मोहून टाकते… वसंताची वाट पाहण्याचा चाहुलीचा काळ सुद्धा किती छान असतो नाही का?? तर तो किती छान असेल!!! सृष्टीचं स्वरूप पूर्णतः पालटून जाते.. चैत्राची सुरुवात होण्याआधी सृष्टी एवढी नयनरम्य दिसते… जणू पुन्हा नव्याने तिचा जन्म होतो.. हे सुंदर क्षण अत्तराच्या कुपीत बंद करून ठेवावे वाटतात… अगदी कायमस्वरूपी साठी.. एवढे अविस्मरणीय असतात.

माणसाच्या आयुष्यातील सहा ऋतूंचे सहा सोहळे असेच असतात नाही का??कधी सुख तर ,कधी दुःख. माणसाच्या आयुष्यात बहरणारा हा वसंत ऋतू असतो. तसेच काहीसे क्षण असतात… जीवनाला बहर आणणारे ते सुंदर क्षण अत्तराच्या कुपीत अगदी घट्ट बंद करून ठेवावे असे वाटतात. ते सुंदर क्षण आपल्याला जगण्याची उमेद देतात, जाणीव करून देतात, “सुख आहे… असेल..जगण्यावर, जीवनावर प्रेम कर … सुंदर आहे जीवन…”

अगदी मंगेश पाडगावकर यांनी म्हटल्याप्रमाणे,

“या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे…..”

– सुसिमा थोरात.

24/02/2022.

@Image source – Google

https://susima.home.blog/2022/02/24/चाहूल-वसंताची/

🍃🌹🍃🌹🍃🌹 🍃🌹🍃🌹🍃
*╰✤▬●❂❃۩▪️S▪️ ۩❃❂●▬✤╯*
╰════════════════╯

गझल

*माणुसकीचा झरा*

*नको बंगला ना संपत्ती फक्त मला आसरा पाहिजे*
*हृदयामध्ये खळखळणारा माणुसकीचा झरा पाहिजे*

*हसता हसता सोसत असते काळजात मी हजार जखमा*
*पण जीवनभर कायमस्वरुपी सोबतीस तो चेहरा पाहिजे*

*सिद्ध कराया गुन्हा पाशवी अमानुष अशा त्या लोकांचा*
*न्याय आंधळा असेल जरिही साक्षिदार तर खरा पाहिजे*

*क्षुधा शमवते माय लेकरू भीक मागुनी रस्त्यावरती*
*हातावरती रोज भाकरी देणाराही बरा पाहिजे*

*दिसायला ती शोभुन दिसते सदाफुली ही अंगणातली*
*नाजुक रूपडे तरी जरासा सुवास पण साजरा पाहिजे*

*सुसिमा थोरात*

https://susima.home.blog/2021/07/23/गझल/

* बहावा *

*✤______________________________✤*
*╭═══════════════════╮*
* ●ओथंबलेले क्षण●*
*╰═══════════════════╯*
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹
*○ बहावा○*

मंद ,धुंद ,गार वारा, पहाटे जसा वहावा,
फुलतो सखे तसा ग, ग्रीष्मातुनी बहावा.

झळाळी सोन्याची लेऊन, शालू पिवळा नेसे,
नव्या ऋतूची, नवी नवलाई, रूपात त्याच्या दिसे.

फुलला जणू बेभान होऊन, रंग सोनेरी त्याला,
असेल का येत आठवण, त्याच्या सखीची त्याला?

श्रीमंतीची तुलना त्याच्या, होतं नसे कोणाशी,
देई शांतता पाहणाऱ्या अन, हसेल तो स्वतःशी.

रूप देखणे बहाव्याचे, क्षणोक्षणी बहरावे,
रंगा गंधातुनी पिवळ्या, अलगदपणे लहरावे.

वर्षा ऋतुची देई चाहूल, उन्हाळ्याला विसावा,
हात पसरुनी कवेत घेण्या, उभा दिसे बहावा….

– कवयित्री सुसिमा थोरात

13/05/2021

@All rights reserved.

@ Image source – Google.

https://susima.home.blog/2021/05/13/बहावा/
🍃🌹🍃🌹🍃🌹 🍃🌹🍃🌹🍃
*╰✤▬●❂❃۩▪️S▪️ ۩❃❂●▬✤╯*
╰════════════════╯

गझल

वृत्त – अनलज्वाला

*आदर*

*करू कुणाचा आदर आता मनात माझ्या*
*जो तो करतो दिवसा चोरी घरात माझ्या*

*वेड्या मनास समजावू मी कसे कळेना*
*प्रेयसीचीच दारी आली वरात माझ्या*

*गांगरले मन साधे भोळे दुभंग झाला*
*जो-तो पाही प्रेमभंग हा जनात माझ्या*

*विसरूच कशा अमुच्या भेटी दोन मनांच्या*
*वाहत होत्या त्या आठवणी नसात माझ्या*

*जो तो फसवी तसे फसविले तिनेच मजला*
*नाही उरले आता काही करात माझ्या*

*- कवयित्री सुसिमा थोरात*

12/05/2021

@All rights reserved.

https://susima.home.blog/2021/05/12/532/

*जान है, तो जहाँ हैं|….*

*जान है, तो जहाँ हैं|….

वसंत ऋतूची सुरुवात होऊन नुकताच एक आठवडा आठवडा लोटला होता .. वातावरण कसं प्रफुल्लीत करणारे होते… कोकिळेच्या सुरेल कुंजनाने मन सुखावत होते…. पहाटेची पाखरांची किलबिल, अंगावर सुखद,अलगद हळुवार अशी फुंकर मारणारा सकाळ आणि सायंकाळ चा थंड वारा… दिवसभराच्या रखरखीत उन्हामध्ये सुद्धा नव्याने पल्लवलेली सारी सृष्टी हसत होती…. तो नवा साज लेऊन स्वतःशीच लाजत होती… जणू काही साऱ्या निसर्गाला भाळून टाकत होती….

अशा सगळ्या नयनरम्य वातावरणात, माणूस मात्र पार जायबंदी झाला होता .. तो कोरोना विषाणू च्या संकटामुळे….

तिन्हीसांजेला बाहेर कुठे पडता येणार नाही, पण आपण गच्चीवर नक्की जाऊ शकतो… थोडफार पाय मोकळं करायला.. …असा विचार करून निर्विकार मनाने पायऱ्या चढून गच्चीवर गेले.. पश्चिमेला सूर्यास्त दर्शन होत होते… थोड्याच वेळात तो सूर्य मावळणार. आजचा सूर्यास्त मला वेगळाच भासत होता.अस्ताला जाणारा तो दिनमणी मला उदास वाटत होता…. आंब्याची ,सुपारीची, फणसाची, सागाची, माडाची झाडे निःशब्द उभी होती… सूर्यास्ताच्या वेळी, सूर्याच्या किरणांनी सह्याद्रीची रांग सोनेरी किरणे अंगावर पांघरूण स्तब्धपणे उभी होती.. झाडे सुद्धा या सूर्याची सोनेरी किरणे किरीट प्रमाणे शिरावर धारण करून शांत उभी होती… तरी ती उदासच वाटत होती. आकाशाची लालिमा मन मोहून घेत होती…पाखरांचे थवेच्या थवे घरट्याकडे परतत होते. कोकिळा आर्त कुंजन करत होती….

रस्त्यावर मात्र नेहमीप्रमाणे वाहनांची माणसांची वर्दळ, गर्दी नव्हती. क्वचित एखादी व्यक्ती दिसत होती. एरवी गजबजलेले असणारे बस स्थानक, आज स्मशानाप्रमाणे ओस पडले होते.. सारा निसर्ग मानवाच्या या अवस्थेला कुत्सितपणे हसत आहे… असंच मला जाणवले. पर्यावरणावर प्रदूषकांचा मारा करून साऱ्या पशु – पक्षांचे, प्राण्यांचे, पक्षांचे जीवन धोक्यात आले. त्यांना हैराण करणारा माणूस आज स्वतः जायबंदी झाला होता…

आठवा…. पाण्याचे प्रदूषण केल्याने समुद्राच्या काठाशी मरून पडलेले हजारो मासे…. विषारी पाणी पिऊन मरणारी हजारो जनावरे…. हवा प्रदूषणाने, बॉम्बस्फोटाने मरणारी हजारो पाखरे … जी आज आनंदाने गगनात भरारी घेत आहेत, मात्र आज या विषाणू मूळे माणसे पाखराप्रमाणे मरत आहेत…जीव मुठीत धरून, माणसे घरातच बंदिस्त झाली आहेत… एवढी मोठी शिक्षा आज निसर्गाने मानवाला दिली आहे..

आज दाही दिशातून फक्त आपल्याला जिवलग, आप्तेष्ट, मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या मृत्यूच्या बातम्या वाऱ्यासारख्या येऊन धडकत आहेत.. त्या ऐकून उरात धडकी बसल्यावाचून राहत नाही ..आज घडीला फक्त आपला जीव वाचवणे, तेही माणसाला कठीण होऊन बसले आहे. या सर्व कोविड परिस्थितीमध्ये आणखीन एक प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे, ‘ऑक्सिजनचा तुटवडा’… याच माणसाने स्वतःच्या सोयीसाठी हजारो झाडांची निर्दयपणे कत्तल केली, त्याच माणसाला आज निसर्गाकडे ऑक्सिजनची भीक मागावी लागते…

आपल्या एका श्वासाची किंमत काय आहे????? हे माणूस पूर्णपणे विसरला. एका दिवसात एक माणूस तीन सिलेंडर भरतील इतक्या प्राणवायूचे (ऑक्सिजन) श्वसन करतो.. एका ऑक्सिजन सिलिंडरची किंमत 700 रुपये आहे.दिवसाला एका माणसाला 2100 रुपयाचा ऑक्सिजन लागतो,दरवर्षाला एका माणसाला 7 लाख 65 हजार 500 या हिशोबाने, सरासरी माणूस 65 वर्ष जगला, तर त्याला 5 कोटी रुपयांचा ऑक्सिजन लागतो… हा ऑक्सिजन झाडे माणसाला फुकट देतात… एकही रुपया न मागता.. आज 22 एप्रिल वसुंधरा दिनाच्या निमित्ताने एवढेच सांगावेसे वाटते,…आता याच्यापुढे प्रत्येक माणसाने आपल्या आणि समाजाच्या हितासाठी, आपण सर्वजण ‘एक तरी झाड लावू, आणि जगवू ‘ही एकच माफक अपेक्षा..

आज माणसासाठी मरण एवढं स्वस्त झाल आहे आणि जगणं खूप महाग झाल आहे.. माणसाची दयनीय स्थिती झालीय.. त्याला फक्त आणि फक्त माणूस जबाबदार आहे.. या परिस्थितीतून सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी माणसाला थोडी माघार घ्यावी लागेल.. थोडं थांबावं लागेल आणि थोड सोसाव लागेल… या विश्वावर अधिराज्य करणाऱ्या माणसाला जायबंदी व्हावं लागेल.. घरीच राहून सुरक्षित राहाव लागेल … या विषाणूचा पराभव करावा लागेल.. तरच माणसाला या जगात पुन्हा नव्याने , मुक्तपणे भरारी मारता येईल… “या विषाणूचा समूळ नायनाट, लवकरात लवकर व्हावा”, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!! सर्वांनी त्यासाठी काळजी घेतली पाहिजे. “घरी रहा, सुरक्षित रहा, मास्क आणि सोशल डिस्टंसिंग वापर करा, सॅनिटायझर चा वापर करा.” जगायचं असेल तर काही बंधनं आपली आपण स्वतःवर घातली पाहिजेत….आणि एक गोष्ट लक्षात ठेवा..” Always keep it in mind, जान है तो जहाँ हैं|…”…

– सुसिमा

22/04/2021

@All rights reserved.

@Image source – Google.

*जान है, तो जहाँ हैं|….*

*प्रतिबिंब ज्याचे त्याचे….*

*✤______________________________✤*
*╭═══════════════════╮*
*● *○प्रतिबिंब ज्याचे त्याचे○* ●*
*╰═══════════════════╯*
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹

शिशिरातल्या दुपारचे ऊन रखरखून गेले. उन्हाने, घामानं अंगाची काहिली होऊन गेली. दुपारची उन्हे कलंडल्यावर सायंकाळची चाहुल देणारा मंद वारा वाहु लागला…. मनात वाटलं अशा सायंकाळी सोबत तर हवीच.. म्हणून घरातून बाहेर पडले, जायचं कुठे असं काहीच ठरवलं नव्हतं, पण जायचं होतं हे नक्की…. जाऊ दूर कुठे असं मनात ठरवलं, गाडी काढली.. मी निघाले…. गावाबाहेरच्या रस्त्याने सरळ बराच वेळ मंद वाहणाऱ्या वाऱ्याची छान सोबत होती… थोड्या वेळात एका टेकडीजवळ पोहोचले. गाडी एका झाडाच्या सावलीत पार्क केली..

थोडा वेळ पुढे चालल्यावर टेकडीच्या बाजूला एक छोटी नदी वाहत होती.. उन्हाच्या तडाख्याने पाणी आटत आले होते, तळ स्वच्छ दिसत होता. मनात विचार आला कोकणातल्या नद्या अशा उथळ आणि छोट्या, पण नजरेची तहान तृप्त करणाऱ्या….. तेवढ्यात माझी नजर स्थिरावली ती नदीच्या काठी निशब्द पणे उभा राहिलेल्या, निश्चल काटेरी झुडपावर.. नदीतल्या निर्मळ संथ पाण्यात अगदी आरशाप्रमाणे स्पष्ट त्या झुडुपाची प्रतिबिंब दिसत होती.

वाऱ्याचा अवखळपणा थोडा कमी झाला होता, त्यामुळे जवळ बरीच झाडे असून झाडाचे पानही हलत नव्हते. काटेरी झुडपे शांतपणे त्या संत आणि स्थिर पाण्याच्या प्रवाहात स्वतःला पाहत होती…त्याच क्षणी एक विचार मनाला स्पर्श करून गेला, माणसाचेही असेच असावे नाही का??? माणसाचा स्वभाव त्याच्या विचारांची वर्तवणुकीची प्रतिबिंबे त्याच्या आयुष्यात पडते, असे वाटते नाही का ?? ज्याचे जसे विचार तशी त्याची प्रतिमा… तसे त्या व्यक्तीचे प्रतिबिंब. काही काटेरी झुडूप प्रमाणे इतरांना त्रासदायक होणारी, काही छान मोगऱ्याप्रमाणे मोहक सुवास उधळणारी, एखाद्याच्या आयुष्यात आनंद उधळणारे.. तर काही अगदी बाभळी प्रमाणे सतत बोचत राहून दुःख देणारी, तर काही अगदी निर्मळ, नितळ गुलाबाप्रमाणे काट्यात राहून धुंद करणारा सुगंध देणारी…. सदाफुली प्रमाणे सदा बहरणारा स्वभाव असणारी… या सगळ्या कडू-गोड भावनांचे पर्यायाने, स्वभावाचे प्रतिबींब प्रत्येक माणसाच्या जीवनात पडलेली असतात.. ..ज्याप्रमाणे वाऱ्याच्या झुळकीने पाण्यावर तरंग उमटतात आणि प्रतिबिंब शहारून जाते, थरथरते , तसेच काही दुःखद आणि वाईट प्रसंगामुळे आपले प्रतिबिंब थरथरते, विस्कटते.. याचा परिणाम म्हणजे कधी कडू, रागीट स्वभावाची माणसे प्रेमळ बनतात. गोड आणि प्रेमळ स्वभावाची माणसे रागीट आणि चिडखोर बनतात.

हे सगळे असले तरी आपल्या स्वभावाचे वागण्याचे प्रतिबिंब प्रत्येकाच्या जीवनात पर्यायाने, प्रत्येकाच्या सामाजिक जीवनात पडते, हेच खरे!! ते कसे उमटवायचे हे ज्याच्या त्याच्या हातात असते.. आपण शंभर टक्के आपला स्वभाव बदलू शकत नसलो,तरी तटस्थ राहून आपल्या आयुष्यात काय चालले?? आपण कसे वागतो?? आपल्या वागण्यामुळे पुढच्या व्यक्तीला काय वाटेल?? याचा सारासार विचार करून आत्मनिरीक्षण करण्याची प्रकर्षाने गरज आहे….

ग. दि.माडगुळकर यांच्या ‘एका तळ्यात होती’या गाण्यातील स्वतःला कुरूप समजणाऱ्या राजहंसाला जेंव्हा तो राजहंस आहे , याची जाणीव झाल्यावर जो निर्भेळ आनंद होतो , असाच आनंद आपल्या जीवनातील ध्येय गवसल्यावर आपल्याला होतो. प्रत्येक व्यक्तीत एक राजहंस दडलेला आहे, जेंव्हा त्याला स्वतःची ओळख होते, तेंव्हा त्याला खूप हलक हलक जाणवत आणि जीवन आनंदाने जगावस वाटत. आपल्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला होते….आपण तयार होतो , गगनात उंच भरारी घेण्यासाठी…. पुन्हा एक नवे आयुष्य जगण्यासाठी…नवे ध्येय गाठण्यासाठी,.. नवी क्षितीजे शोधण्यासाठी…..

– सुसिमा

@All rights reserved.

@image source – Google.

17/03/2021
🍃🌹🍃🌹🍃🌹 🍃🌹🍃🌹🍃
*╰✤▬●❂❃۩▪️S▪️ ۩❃❂●▬✤╯*
╰════════════════╯