* घास भरवते…

*✤______________________________✤*
*╭═══════════════════╮*
*●ओथंबलेले क्षण●*
*╰═══════════════════╯*
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹
* चित्रकाव्य *

*○घास भरवते○*

घास भरवते खाऊन घे दादा,
बहिनीच्या हातचा घास,

पुन्हा मिळेल,
याचा नाही विश्वास.

पोर आपण फुटपाथवरची,
नाही कोणा श्रीमंत घरची,

शिळे तुकडे कचऱ्यातले,
आपली गुजराण करती.

मिळाला आहे एवढाच तुकडा,
दोघं मिळून खाऊ,

अजुन काही कुणाकडून मिळालं,
तर सांजेला जेऊ.

माय आपली भटकत असल,
दारोदर मागण्या भीक,

मिळल की नाही भाकरी तिला,
याची माहिती नाही तीथ.

एवढाच घास म्हणून,
रुसू तू नको,

मतलबी या दुनियेत,
उपाशी राहू नको.

नाही कोणाचा कोण,
या स्वार्थी जगात,

परमेश्वराने धरले मौन,
आताच्या युगात.

डोळे बंद करून,
तो आपली परवड पहात आहे ,

माय मात्र रोज आपली,
आसवात नहात आहे.

खोट्या या फसव्या दुनीयेत,
उभ आपण राहू,

शिळा तुकडा खाऊन तरी,
अस्तित्व आपलं पाहू.

-सुसिमा
. 07/07/2020 https://susima.home.blog/2020/07/07/446/
🍃🌹🍃🌹🍃🌹 🍃🌹🍃🌹🍃
*╰✤▬●❂❃۩▪️S▪️ ۩❃❂●▬✤╯*
╰════════════════╯

नभं उतरु आलं….

*✤______________________________✤*
*╭═══════════════════╮*
*●ओथंबलेले क्षण●*
*╰═══════════════════╯*
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹
*○नभं उतरु आलं….○*

उन्हाने अंगाची लाही होत असताना, अचानक काल आभाळ भरून आलं. दाही दिशांचे काळसर ढग भराभर जमले आणि पावसाच्या जोरदार सरी बेधुंदपणे बरसू लागल्या…. कित्येक दिवसानी एखाद्याने उरात दाबून ठेवलेले अनंत दुःख बाहेर यावं असं वाटलं… तसं पाहता कोकणातला पाऊस खूप हळवा वाटला मला…. कोसळायला लागला की कोणाचेही न ऐकणारा… एखाद्या हळव्या मुलीला अतीव दुःख व्हावे, नी काही केल्या तिचे अश्रू थांबुच नयेत… तसंच काहीसं या कोकणातल्या पावसाचं बरसन… काही औरच आहे…

सहज गॅलरीतून पाहू लागले, तर संततधार पावसाचा धारा कोसळत होत्या. नको, नको म्हणाल, इतका कोसळणारा पाऊस मलाही कळेना, त्याची समजूत तरी कशी घालावी?? तीन-तीन तास हा कोसळतोय… थकतो की नाही ??? पांढऱ्याशुभ्र पावसाच्या सरी सर्व डोंगरमाथ्यावर कोसळताना दिसत होत्या. उन्हामुळे धरणी कासाविस झाली होती, तिचा मात्र उसवा निघत होता… ती अजिबात दुखी नव्हती, उलट गालातल्या गालात हसत होती… पावसाच्या आगमनाची तृप्तता ती अनुभवत होती..

वातावरण थंड झाले. उन्हाने होणारी जिवाची तगमग थांबली. सगळी झाडेझुडपे, लतावेली, पर्यायाने सर्व सृष्टी न्हाऊन निघाली. फुललेला गुलमोहर पावसात न्हाऊन निघाला होता… तो खूपच मनस्वी , लाघवी आणि प्रसन्न वाटत होता. त्यातून ओघळणारे थेंबही वेगळीच तृप्तता अनुभवत होते… गॅलरीतून अंगावर उडणाऱ्या छोट्या तुषारांनी मीही थोडीशी भिजून गेले. ते पावसाचे थेंब गॅलरीच्या बार वरून अंगावर उडत होते, जणू काही तेच मला भिजायला बाहेर बोलवत होते. दूरवर नजर गेली दूरवरचा सारा परिसर पांढराशुभ्र होऊन धूसर झाला होता. पावसाचं काय? नी माणसाच काय?? पाऊस या धरित्रीला प्रफुल्लित करतो… हिरवा शालू नेसवतो. आपला बळीराजा पावसाची आतुरतेने वाट पाहतो, पण आज त्याच्या मनात वेगळेच काहीतरी होते, अवखळ मुलाप्रमाणे तो नको ,नको म्हणता बरसतच होता. आपण कितीही मोठे झालो तरी , आपल्यालाही कधी वाटतं एखाद्या गोष्टीसाठी छान हट्ट धरावा कोणाजवळ तरी….. असंच काहीसं कोणाजवळ तरी रुसावं, फुगावं, अबोल व्हावं… असाच काहीसा हट्ट याचा… माझ्या मनात आठवणींचा पाऊस दाटत होता… त्यात च मी काही क्षण हरवून गेले….लहानपणीच पावसात भिजणं, येरे येरे पावसा म्हणत गोल गोल स्वतःशीच फिरण….ओठांवर अलगद ते पावसाचे थेंब झेलण… मन नकळत भूतकाळात गेले.. अंगावर वाऱ्याच्या वेगाने, झुळूक आल्यामुळे अचानक पावसाच्या पाण्याचा शिडकावा झाल्याने मी भानावर आले…

उडणाऱ्या तुषारांनी आणि थंडगार वाऱ्याने एक हलकासा शहारा अंगावर येत होता.. पाऊस धारा तनमन फुलवत होत्या.. हवेची हलकेशी झुळूक त्यांना स्पर्श करून गुदगुल्या करत होती… तरीही त्या बरसतच होत्या… वसुंधरा तृप्त होत होती. हे दृश्य सलग दोन-तीन दिवस मी माझ्या मनात साठवत होते….धरित्री पुन्हा नव्याने हिरवा शालू नेसली होती… उचंबळणार्‍या मनाने गाणे गात होती..

“नभं उतरू आलं…

चिंब थरथर वलं…

मन झिम्माड झालं.

हिरव्या बहरात….”

_-सुसिमा

03/06/2020

@All rights are reserved.

*Image source – Google.
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹
*╰✤▬●❂❃۩▪️S▪️ ۩❃❂●▬✤╯*
╰════════════════╯

पोशिंदा जगाचा महान…

*✤______________________________✤*
*╭═══════════════════╮*
*●ओथंबलेले क्षण●*
*╰═══════════════════╯*
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃
*○पोशिंदा जगाचा महान○*

घामामधून ज्याच्या, पिकत मोत्याचे रान,

पोशिंदा जगाचा, तो आहे थोर महान.

तांबडं फुटताच, लगबग सुरू होते त्याची,

घाई असते त्याला, शेतावर जाण्याची.

ऊन नाही, तहान नाही, पाहत कधीच,

जुगार आयुष्याचा, असतो नेहमीच.

पेरलेल्या दाण्यांचा, कधीच भरोसा नसतो,

पीक येईल तरारून, या आशेवर जगतो.

बळीराजा देवाला साकडे घालतो मनी,

सोनं व्हाव दाण्यांच, असते आस ध्यानी.

पांदितली वाट तुडवत, सांजेला येतो घरी,

कस होईल पिकाचे,धाकधूक हीच ऊरी.

लेकरे उपाशी त्याची, दिवस काढतात वेळी,

काळजी वाहे जगाची साऱ्या,तो सर्वकाळी.

पोशिंदा तो लाखांचा, ठरला जगात महान,

माय जमीन त्याची, पडली सावकाराकडे गहाण.

बैलजोडी त्याची, साथ देत राहील,

सुखदुःख आयुष्यातलं, तीच वाटून घेईल.

नाही सोडत धीर,पडला जरी दुष्काळ,

संयमाने होतो आयुष्यात, यशाचा सुकाळ.

-सुसिमा

01/06/2020
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃
*╰✤▬●❂❃۩▪️S▪️ ۩❃❂●▬✤╯*
╰════════════════╯

राधा बावरी…

*✤______________________________✤*
*╭═══════════════════╮*
*●ओथंबलेले क्षण●*
*╰═══════════════════╯*
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃

*○कवितेचे नाव – राधा बावरी..….○*

पैंजनाचा आवाज तुझ्या, येता माझे कानी,

आलीस तू राधा, या विचारात सुखावतो मी मनी.

रंगावर गोऱ्या तुझ्या, भाळला श्रीहरी,

आहे तूच सर्वस्व माझे, जपतो तुला उरी.

ओठ तुझे आहेत ग, गुलाबासम,

ओढला जातो मी, तुझ्याकडे प्रत्येक क्षण.

मिठी तुझी वाटे मला, स्वर्ग सुखाहून महान,

राहावे वाटते कवेत तुझ्या, विसरून भूक तहान.

लाडक्या या सख्याची तुझ्या, होऊन जा सखी,

राहशील काळजात माझ्या, काय सांगू आणखी??

स्वभाव तुझा, आहे ग खूपच प्रेमळ,

तना-मनाने सर्वार्थाने, आहेस तू निर्मळ.

किती गुणी आहेस तू, प्रिय सखी छान,

तूच माझे आयुष्य आहेस, वाटतो मला अभिमान.

पारिजात निस्वार्थीपणे, उधळतो जसा परिमळ,

तशीच आयुष्यात माझ्या, घेऊन आलीस दरवळ.

म्हणतात जिंकते जग प्रेमाने, प्रेमाचाच कर कहर,

जिवापाड करतो प्रेम तुझ्यावर, हा वेडा मुरलीधर.

करताना लाड तुझे , उचंबळून येते उरी,

भोळी-भाबडी परी हट्टी, माझी राधा बावरी…

सुसिमा

३०/०५/२०२०

@All rights are reserved.

*Imge source – Google.
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃
*╰✤▬●❂❃۩▪️S▪️ ۩❃❂●▬✤╯*
╰════════════════╯

*मला माझं बालपण परत हवय….

*✤______________________________✤*
*╭═══════════════════╮*
*●ओथंबलेले क्षण●*
*╰═══════════════════╯*
🌷🍃🌹🍃🌷🍃🌹🍃🌷
*○मला माझं लहानपण परत हवंय○*

मला माझं लहानपण परत हवंय…!

दिवस खूप भकास चालला होता. पण वातावरण हळूहळू बदलायला लागलं, पांढरेशुभ्र आकाश पक्षाच्या थव्याप्रमाणे ढगांनी दाटून आलं. मातीचा सुगंध येऊ लागला आणि जाणवलं. आता पाऊस येणार..!

मातीला सुगंध देणारा पहिला पाऊस….! उन्हाळ्याच्या गरमीतून सुटका करून देणारा पहिला पाऊस….! सगळ्यांची तारांबळ उडविणारा पहिला पाऊस…! आणि माझ्या मनाला हवाहवासा वाटणारा पहिला पाऊस…! मग काय!! मी आज मनसोक्त भिजायचं ठरवलं. सर्वकाही विसरून, मी पावसात भिजू लागले. पावसाचे थेंब अंगाला स्पर्श करत होते. माझ्या बागडणाऱ्या मनावर ,शरीरावर अजून आनंदाचा वर्षाव करत होते.

मी पावसात फक्त उभी होते, पण पावसाच्या थेंबांनी मला चिंब भिजवून टाकलं होतं. जसजशी भिजत चालले होते, तस तसे माझे विचारचक्र मला भूतकाळात नेत होतं. माझ्या आठवणीतल्या प्रत्येक पहिल्या पावसाची आठवण करून देत होते. मला आता हे प्रकर्षाने जाणवायला लागलं होतं, की मी आज मुद्दामून पहिल्या पावसात भिजते आहे. असं का?? मला भीती का वाटत नाही?? निसटून पडण्याची, वादळाची व सर्दी होऊन आजारी पडण्याची!!!! आणि याचे उत्तर माझ्या मनाने शोधले होतं. त्याचं कारण असं आहे की मला आनंद घ्यायचा आहे.

जसजसे विचार चक्र फिरत राहिलं, तसे मला आत्तापर्यंतचे पावसाळे आठवत गेले. कधी मी शाळेतून घरी परतत असताना दप्तराचं ओझं चिखलात उड्या मारीत घरी आलेले. कधी शेतात काम करीत असताना पावसात भिजत घर गाठलेले… तर कधी गुर चारायला गेल्यावर पावसात सापडलेले.. असं मला मुळीच आठवत नाही की, मी मुद्दाम पावसात भिजलेले… मग आजच का???

बऱ्याचदा मी घरी असतानाही पहिला पाऊस आला, पण त्यानं देखील मला न भिजवता सोडलं नाही.. काहीतरी पसारा आवरण्याचा निमित्तानं का होईना मी पावसात भिजत जायचे आणि मग चिंब भिजायचे. पाऊस चालू असताना चिखलाचा पाण्यात पायांचे ठसे उमटवने, इतरांना पाडण्यासाठी सरका तयार करने, गढूळ पाण्यात उड्या मारणे, जर गारा पडल्या तर त्या वेचून हावरे पणाने वेचणे आणि खाणे… या सर्व गोष्टी मला आठवू लागल्या.

मला आजही त्या सर्व गोष्टी कराव्या वाटताहेत. गढूळ पाण्यात उड्या माराव्या वाटताहेत.. पुन्हा या मातीत पावसाने पावलांचे ठसे उमटवावे वाटताहेत… असं शांत उभा राहून भिजण्यात काहीतरी आनंद कमी झाल्यासारखा वाटतोय… मला पुन्हा पाण्यात बागडायचे आहे ,मला पुन्हा पाण्यात नाव सोडायची आहे. पाण्यात ठिकऱ्या उडवायचे आहेत…
मला पुन्हा पावसात तसेच भिजवायचे आहे… चिखलात ठसे उमटवायचे आहेत… त्यासाठी मला माझं बालपण परत हवंय… मला माझं लहानपण परत हवंय…..

_-सुसिमा

३०/०५/२०२०

@All rights reserved
🌷🍃🌹🍃🌷🍃🌹🍃
*╰✤▬●❂❃۩▪️S▪️ ۩❃❂●▬✤╯*
╰════════════════╯

तो आम्रवृक्ष होता….

*✤______________________________✤*
*╭═══════════════════╮*
*● ऋणानुबंधाच्या गाठी●*
*╰═══════════════════╯*
🌷🍃🌹🍃🌷🍃🌹🍃🌷

*○तोआम्रवृक्ष होता○*

वाटसरूला सुखावून,आशिष घेतले त्याने,

क्षणांची जपत माळ, मी बिलगते त्याला प्रेमाने.

नाही झाली अडचण त्याला, माझ्या सहवासाची,

अनंत दुःखे माझी सोसतो, वर्षानुवर्षाची.

कधी नाही लोटले दुर, दिली मायेची सावली,

देवी ही कोणती इतकी, मला नाही पावली.

माझ्याशी हितगूज करताना, तो आनंदून जायचा,

चुकले पाहून कधी, तर पदरात घ्यायचा.

म्हणाला सदैव आहे, मी तुझ्यासोबत,

एकटे राहण्याची तुला, नाही येणार नोबत.

वाटलं कधी एकट तरी, ये मला भेट,

नाही घेतले समजून कोणी, बिलग मला थेट.

भल्याबुऱ्या आयुष्यातील घटनांचा, ठरला साक्षीदार,

सुखदुःख माझ ऐकणारा, प्रामाणिक साथीदार.

सतत बळ देत राहिला, मला लढण्याचे,

आयुष्यातील संघर्षांना, तोंड देण्याचे.

त्याची शिकवण, छाया ठरली पित्रवत माझ्यासाठी,

आठवण त्याचीच छळते, मला दर दिवसाकाठी.

घरापासून माझ्या जवळच, तो वसला होता,

त्याला भेटल्या वाचून, सांज सकाळ जात नव्हता.

म्हणाल तुम्ही कोण असे, तो तुझा जिवलग सखा,

दुसरे तिसरे कोणी नसून, तो एक आम्रवृक्ष होता…

_-सुसिमा

२९/०५/२०२०

© All rights reserved.

Image source- Google.
🌷🍃🌹🍃🌷🍃🌹🍃🌷
*╰✤▬●❂❃۩▪️S▪️ ۩❃❂●▬✤╯*
╰════════════════╯

*नाती ऋणानुबंधाची….*

*✤______________________________✤*
*╭═══════════════════╮*
* ●ओथंबलेले क्षण●*
*╰═══════════════════╯*
🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷
*○नाती ऋणानुबंधाची○*

दिवसभर उन्हामुळे घराबाहेर पडता येत नव्हते. मात्र सायंकाळी उन्हाच्या झळा थोड्या कमी झाल्या,असं वाटलं.नी गच्चीवर मी फिरायला गेले…असा माझा नियम होऊन गेला होता. पश्चिमेला लक्ष गेलं सुर्यास्त होण्यास अजुन वेळ होता.. मंद वारा वाहत होता. उन्हं बरीच कलंडून गेली होती. आकाशात थोडीशी लालिमा पसरली होती.. कुठेतरी एखादा ढग येत होता नी सूर्याला पाठीमागे लपवत होता.पुन्हा सूर्यदर्शन होत होते. सहज क्षितिजापर्यंत नजर गेली अखंड पसरलेला सह्याद्री चारी बाजूंनी खुणावत होता, सूर्याचा प्रकाश त्या दूरवर पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगेवर अलगत पसरला होता. थोडा वेळ जाईल तसे, आकाशाची लालीमा अजून गडद होत होती. घरट्याच्या ओढीने पाखरे थव्यांनी परतत होती. अशा वातावरणाने मन पुलकित होऊन गेले. तरीही कातरवेळ होती ती.

माझ्याही मनात या कातरवेळी विचारांचे काहूर निर्माण झाले. मन कधी भूतकाळात जात होते, तर कधी वर्तमानात येत होते,मी दूर उभी होते, माझा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांचा खेळ दुरूनच पाहून मी समीक्षण करू लागले…

आपल्या आयुष्यात आजपर्यंत कितीतरी माणसे आली. वेगवेगळ्या स्वभावाची वेग वेगळ्या विचारांची आणि वेगवेगळे पैलू पाडलेली-सुद्धा….. आपली रक्ताची नाती ही काही वेळेस साथ देत नाहीत, पण रक्ताची नसतानाही आपलेपणाने आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साद घालणाऱ्या नात्यांनी माझ्या आयुष्याच्या रोपट्याचे रुपांतर एका सुंदर वृक्षात होत आहे…हे प्रकर्षाने जाणवले. त्यांना कदाचित नाव नसेलही, पण अशी नाती प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्त्वाची भूमिका निभावतात. त्यांना ‘ऋणानुबंधाची नाती’अस आपण म्हणतो.

कोणताही स्वार्थ न ठेवता, एक निर्मळ, निखळ आणि पराकोटीचा प्रेम देणार, आधार देणार, प्रसंगी धीर देणारे, सुखदुःखात साथ देणारे, उभ्या वादळातही आपल्याला कोलमडून न देणार नातं….. या नात्याला कोणत्याही नात्याची सर नाही, कोणत्याही नात्याची तोड नाही.. आपसूक जोडले गेलेले हे नातं, कधीच आपल्याला परक करत नाही.. साथ ही सोडत नाही. मग ते मित्राचे असेल, मैत्रिणीचे असेल.. तिथे वयाचे बंधन नसते असतो तो फक्त विश्वास, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, नी प्रेम…. नसतो तिथे कोणताच स्वार्थ..मागच्या जन्मीचं पूर्वसंचित म्हणून ती आपल्या आयुष्यात ती नाती आलेली असतात..

ऋणानुबंधाची ही नाती जपता येण्यासाठी प्रारब्धाही तेवढे चांगले असावे लागते, तर ती नाती फुलतात, बहरतात, उन्हाळ्यात गुलमोहर कसा बहरतो बघा!!!! अगदी तशी…. मोगऱ्याच्या झाडाला बहर आल्यावर त्याचा सुवास सर्वत्र पसरतो, तशीच ही नाती सुद्धा आपले जीवन सुगंधित करतात… रणरणत्या उन्हात भाजून तप्त झालेल्या धरणीला जसा पाऊस सुखावतो आणि दाही दिशांत त्या मातीचा मृगंध दरवळतो, तशी नाती ऋणानुबंधाची…..

संचिते मिळती नाती ऋणानुबंधाची,

जपून त्यास सफल करू कसोटी नात्याची…”

_-सुसिमा

@ All rights are reserved.

Image source- Google
🎋🌾🎋🌾🎋🌾🎋🌾
२४/०५/२०२०

*╰✤▬●❂❃۩▪️S▪️ ۩❃❂●▬✤╯*
╰════════════════╯

रांगोळी समृद्ध जीवनाची…

*✤_______________________________✤*
*╭════════════════════╮*
* ●ओथंबलेले क्षण●*
*╰════════════════════╯*

*○रांगोळी समृद्ध जीवनाची○*

आज जरा लवकरच जाग आली… सूर्योदयाला थोडा वेळ होता. विचार केला चला सडा टाकून घेऊ… अंगणात छान सडा टाकला. कुंडीतील रोपांना अगदीं मनसोक्त पाणी दिलं… कुंडातील चीनी गुलाब, कोरफड, शेवंती पाणी दिल्यावर बिचारी शहारून गेली.. आणि गालातल्या गालात हसू लागली. त्यांना पाणी दिलं आणि माझ्या मनाला एक वेगळच समाधान मिळालं..

तुळशीवृंदावनासमोर रांगोळी रेखाटायला घेतली. रांगोळी रेखाटण्याचा माझा नित्यनियम. ठिपक्यांची छान रांगोळी काढली, या रांगोळीला वेली आणि पाने- फुले यांनी सजवली. ती पांढरी रांगोळी फार आकर्षक वाटत नव्हती. काहीतरी उणेपणा मला तिच्यात जाणवत होता. रंग उचलले रांगोळीत भरलेही हिरवा, केशरी, निळा, पिवळा, गुलाबी. रंग भरल्यावर ती खूप सुंदर दिसू लागली. मी समाधानाने पुन्हा एकदा रांगोळीकडे पाहिलं. आता माझ्या मनासारखी झाली होती… सूर्योदयानंतर सूर्याची किरणे पडल्यावर ती अधिक सुंदर दिसू लागली.

मनात विचार आला आयुष्यही असंच असावं नाही का??? आपल्या आयुष्यात ओकेपणा येऊ नये म्हणून काही माणसं आयुष्यात रंग भरतात.. जीवनाची रांगोळी अशी पांढरी असेल तर थोडी उदासीनता येत असेलही कदाचित, पण त्यामध्ये रंग भरले तर तिला एक वेगळाच आकर्षकपणा येतो. ती सगळ्यांचेच मन मोहून घेते….

आपल्या आयुष्यात आपल्यावर प्रेम करणारी, आपल्याला समजून घेणारी, आपल्या जीवनाच्या रांगोळीत रंग भरणारी माणसं खूप महत्त्वाची असतात. मग ती व्यक्ती कोणीही असेल!! आपले आई-वडील, आपल्या मित्र-मैत्रिणी, आपला जोडीदार किंवा आपली बहिण -भाऊ. अशा व्यक्ती आपले आयुष्य खूप आकर्षक आणि हवहवसं बनवतात. अशा प्रेम करणाऱ्या ,आपल्या सुखदुःखात सोबत उभा राहणाऱ्या माणसांमुळे, आपल्या जीवनाची रांगोळी नक्कीच सुसंस्कृत, समृद्ध बनते. त्यामध्ये असणाऱ्या रेषा, फुले, पाने, विविध आकार हे, आपल्या आयुष्यात येणारे वेगवेगळे प्रसंग आणि हे सगळे विविध रंग म्हणजे त्यामध्ये आपल्या जिवलग माणसांनी दिलेली साथ असते.

आपण बोलतच नाही मूक राहतो, पण जीवनाची रांगोळी सर्व काही बोलून जाते, त्यामुळे ती रांगोळी रंगीबेरंगी,आकर्षक ,छान व समृद्ध करण्याचा प्रयत्न करायला हवा,

समृद्ध रांगोळीचा ठेवा जपायला हवा तरच जगणं समृद्ध होईल….

*”रांगोळी सुंदर जीवनाची रेखाटू,

रंग त्यात प्रेम – चैतन्याचे भरू.”

_- सुसिमा

@All rights are reserved.

२३/०५/२०२०

*╰✤▬▬●❂❃۩▪️S▪️ ۩❃❂●▬▬✤╯*
╰══════════════════╯

पण ती जपून ठेवा…

अगं मिने! अग, अगं शिवलीस का भांड्याला??? तुला कितींदा सांगितलं पूरीच्या जातीन भाईर बसल्यावर कशाला शिवूनी.. सगळा इटाळ झाला बघ!! कालवलीस सगळ. माती हुती अशान घराची….माणूस उगाच म्हणत न्हाई..

” श्यात गेल कटाळ्यान आन घर गेल इटाळान….’

“देवाच्या चालीरिती पहिल्यापस्न पाळाया पाहिजे…” “अग आये! काय हुतय त्याला???? देवीला नव्हतं का? तुझ आपलं कायतरी… देवी देवी हाय!आपूण माणूस, जा घरात, बस् कोपऱ्यात एका.. शिवू नको कशाला.”

हा संवाद मी दुरूनच ऐकत होते.अगदी माळावरच एका बाजूला झोपडीवजा घर होतं झोपडीत मीनाचे आई-वडील आणि तिचा छोटा भाऊ राम राहत होते. मी पुढे गेले, आणि म्हणाले ” मीनाची आई एम. सी. ही नैसर्गिक बाब आहे तिच्यासाठी एवढा अंधश्रद्धा पाळू नका.”.

” अहो बाई, कसल्या अंधश्रद्धां न कसलं काय??परक्याच धन ती!!! लोका घरी जायाची तर तिला वळण लागाया नको का?? लोक पुन्हा आमच्या तोंडात शान घालतील..”.

मुलगी परक्याचे धन म्हणता तुम्ही!!आणि मुलगा वंशाचा दिवा , पण मुलगी दोन्ही घर उजळून टाकते सुखा- समाधानाने आणि आनंदाने…

“एक तरी मुलगी बरी, प्रकाश देई दोन्ही घरी”

“गोठ्यात गाय जन्माला आली की आनंद मानतात तुम्ही… अंड्यातून कोंबडी बाहेर आली देव पावला म्हणता… शेळीला करडू शेळी झाली आनंदित होता, घरी मुलगी का नसावी??? आज तुम्ही रामला शाळेत पाठवतात मीनाला मात्र घरीच बसवले आहे. तिला शिक्षणाची गरज आहे. एम.सी. आली म्हणून शिक्षण बंद करणं बरं नाही,तिला शाळेत पाठवा आता उद्यापासून..”

“बाई तुमचं सगळं खरं हाय! म्या मान्य करते.. पोरीची जात ही.. समाज कसा लांडग्यावणी लचक तोडाय बसलाया!! पोरीला नको वाटत पाठवायला.. आई म्हणून मलाबी वाटतं की.. म्या शिक्षान घेतलं न्हाई, पोरींन तरी घ्याव… पण तिचा बा म्हणतो कुठे शिकून कलेक्टरिन व्हायची हाय?? या दिवाळीत तिचं लगीन लावून देऊ तिचं… करलं संसार न्हवऱ्याचा..नकुच हूत लेक, पोटातच मिली अस्त बर झाल अस्त… आता लगीन लाऊन दीवू….”

मी म्हणलं, “मीनाची आई, अजून तिचं वय खूप लहान आहे. 18 वर्षापर्यंत तुम्ही तिचे लग्न नाही करू शकत. तिला शाळेत पाठवा इतर मुलांबरोबर, राम बरोबर घरी येईल ती भीती नाही राहणार तिला.. आम्ही आहोतच की! मीना शिकली तर मोठी बनेल स्वतःच्या पायावर उभी राहिल.. तिच्या मुलांना शिकवेल..”.

” तेवढ्यात मीना बाहेर आली म्हणाली, “बाई मी साळत यील उद्यापस्न.., मला बी शिकून मोठे हुयाच हाय.”

मी म्हणाले, “हो नक्की ये.””मुलगा जरी वंशाचा दिवा असला, तरी मुलगी वंशाची पणती आहे. दोन्ही घरी प्रकाश देणारी तिला जपून ठेवा. तीच आपली वाट प्रकाशित करेल.”

” पणती जपून ठेवा, अंधार फार झाला”

“पण ती.. म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून आज समाजाचा बेबंद फासात अडककेली मुलगी आहे…”

“तिला जपा, तिला शिकवा… तिला माया द्या..प्रेम द्या..”

“लेक वाचवा, लेक शिकवा..”

– सुसिमा.

All rights are reserved.

Image source – Google.

२१/०५/२०२०.

तिमिरातुनी तेजाकडे….

दोन मिनिट डोळ्यांच्या पापण्या बंद करून बघा… आपल्याला अंधार दिसतो, हीच अवस्था आपण थोडा काळ सहन करू शकतो, पण ती जर आयुष्यभर असेल किती भयानक कल्पना आहे ही???

पण काहींना मात्र दैवानं हे सुंदर जग पाहण्यापासून कायमच वंचित ठेवले आहे… आपण कवी होतो, लेखक होतो, लेख लिहितो, कविता करतो, ललित लिहितो, पद्य लिहितो, वर्णन करतो, रसग्रहण करतो…”डोळे हे जुलमी गडे”.. अस म्हणतो ही, हे सार करण्यासाठी देवाने दिलेली एक तेजस्वी देणगी म्हणजे दृष्टी!!!!

हे डोळे सगळं जग पाहतात, मनीचे भाव सांगून जातात. ते भाव सांगण्यासाठी कधी शब्दांचीही गरज नसते. पण हे डोळे एकमेकांना कधीच पाहू शकत नाहीत…मात्र सगळे जग पाहतात.. पण ज्यांनी हीच दृष्टी गमावली, त्यांना हातातल्या काठीचा आधार हे जग पादाक्रांत करण्यासाठी पुरेसा असतो का??? धडधाकट हात-पाय त्या काठीच्या साह्याने उभे आयुष्य जगतात.. अगदी निर्विकारपणे…कोणतीच तक्रार न करता. कारण, त्यांना माहित असतं आता हे असच जगावं लागेल …

आपण रेल्वेमध्ये सर्वजण प्रवास करतो, या प्रवासात हमखास भेटणारी व्यक्ती म्हणजे अंध व्यक्ती. आपल्या अंगावर वेगवेगळ्या वस्तूंचे दुकान थाटून, गाणी गाऊन, काही तरी कला सादर करून आपला उदरनिर्वाह त्या चालवतात…या सर्वांमध्ये अत्यंत जमेची बाजू म्हणजे लाचार पणाने लोकांपुढे भीक न मागता स्वकष्टाने आणि स्वाभिमानाने पैसा कमवून ही लोकं उदरनिर्वाह करतात…

काही माणसं देवाने एवढे सुंदर डोळे दिले असताना, हात पाय दिले असताना, मंदिरासमोर भीक मागताना दिसतात… या विधात्याने हे सुंदर जग ज्यांच्या प्रारब्धातून पुसून टाकले, त्यांचे पूर्वसंचित ते काय असावे बरं???

पण अशी माणसे खूप भावनाप्रधान असतात. वाऱ्याची मंद झुळूक ते खूप तन्मयतेने अनुभवतात. स्पर्शाची भाषा आत्मीयतेने समजून घेतात. तेजस्वी किरणांनी विश्वाची शोभा वाढविणारे हे लोभसवाणी रम्य सकाळ पाहणे त्यांच्या प्रारब्धात नसते…. नसतात त्यांच्या नशिबी रंगीबिरंगी फुले.. नसते सप्तरंगी इंद्रधनुष्य, नसतात ढगांचे वेडेवाकडे आकार, नसतो हिरवागार निसर्ग, नसत पाहण समुद्राच्या फेसाळत्या लाटा, नसत पाहण टिपूर चांदणं, नसतो पौर्णिमेचा चंद्र, नसते वसंतातील सृष्टीचे बहरणे, नसते मयुराचे सुंदर नृत्य पाहणे, नसतो कृष्णवर्ण आणि गौर वर्ण हा भेद, नसतो तो दृष्टी स्तब्ध करणारा सूर्यास्त, नसतं ठरवण रंगांची आवड नी निवड, आणि नसत पाहण जिवलगाच्या डोळ्यातील भाव जाणं न …….

त्यांना कळतो स्पर्श फक्त आधाराचा, प्रेमाचा, विश्वासाचा, पावित्र्याचा आणि कटू तेचा…. कधी त्यांच्या नशिबी असतो आवाजातला गोडवा… परमेश्वराने एक जरी गोष्ट त्यांच्याकडून काढून घेतली असली, तरी सुद्धा दुसऱ्या बाजूला बऱ्याच गोष्टी परमेश्वर त्यांना भरभरून देतो… जगणं सुसह्य करतो…. जगण्याची उमेद देतो….

म्हणून भाग्यविधात्याला एवढेच मागणे ते मागत असतात,हे अंधकारमय आयुष्य त्यानेच सावरावे, आयुष्य उजळवावे…. एक आशेचा नंदादिप त्यांच्या जीवनात परमेश्‍वराने जरूर लावावा…. म्हणूनच म्हणावेसे वाटते..

“तिमिरातुनी तेजाकडे प्रभु आमुच्या ने जीवना…..”

– सुसिमा.

@All rights are reserved.

Image source – Google.

19/05/2020